शरद पवार यांच्याकडून शेतकर्‍यांना साहाय्य करण्याविषयी सरकारला सूचना 

मुंबई –  राज्यातील पूरग्रस्तांना साहाय्य करण्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शरद पवार यांनी सरकारला काही सूचना केल्या आहेत. राज्य सरकारने आपत्ती निवारणाची काही महत्त्वपूर्ण कामे तातडीने हाती घ्यावीत, असे त्यांनी म्हटले आहे.

१.  अभूतपूर्व आपत्तीमध्ये पंचनामे वेळेत उरकणे अशक्य असल्याने पंचनामा प्रक्रियेसाठी ठरावीक मुदतीचे बंधन नसावे. अतीवृष्टीनंतर काही दिवसांनी ऊन पडल्यावर भिंती-छप्पर यांना भेगा जाऊन पडझड होते. पाणी ओसरल्यानंतर पिके आणि पशूधन आदींची हानी निदर्शनास येते. या सर्वांचे पंचनामे व्हावेत.

२. हानीभरपाईसमवेत पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा आराखडा तयार करावा. यात पिकांच्या पुनर्पेरणी आणि पुनर्लागवड, फळबागांच्या पुनरुज्जीवन आदींसाठी विशेष साहाय्य यांचा समावेश करावा. भूमी सुधारण्यासाठी विशेष आराखडा करावा. बंधारे, सिंचन कालवे, विहिरी, पंपिंग यंत्रणा आणि इतर सिंचन साधनांची दुरुस्ती आणि गाळ काढण्याची तसेच शेतकर्‍यांच्या बांध-बंदिस्तीची कामे हाती घ्यावीत. शाळा, आरोग्य, वीज, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा तयार करावा.

३. शालेय साहित्य, चारा आणि शेतीची साधने, व्यवसायिक साहित्य यांच्या वाटपाचा कार्यक्रम हाती घ्यावा.

४. पीक विमा योजनेतील पात्रतेचे निकष शिथिल करावेत. वित्तीय संस्था आणि   व्यावसायिक यांच्याकडून होणारी वसुली तात्काळ तहकूब करावी आणि संपूर्ण कर्जमाफी घोषित करावी.

५. आपत्तीग्रस्तांना मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी समुपदेशन शिबिरे आयोजित करावीत.