NCERT Introduces Emergency : ‘एन्.सी.इ.आर्.टी.’च्या इयत्ता ९ वीच्या पुस्तकात आणीबाणीची माहिती समाविष्ट

(एन्.सी.इ.आर्.टी. म्हणजे नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद)

नवी देहली – ‘एन्.सी.इ.आर्.टी.’ने प्रथमच इयत्ता ९ वीच्या सामाजिक विज्ञान पुस्तकात वर्ष १९७५-७७ मधील आणीबाणीच्या माहितीचा समावेश केला आहे. परिषदेच्या एका अधिकार्‍याने याला दुजोरा दिला आहे. ‘अंडरस्टँडिंग सोसायटी : इंडिया अँड बियॉन्ड’ या नवीन पुस्तकात याचा समावेश आहे. यात आणीबाणीचे ‘भारतीय लोकशाहीसमोरील सर्वांत मोठ्या आव्हानांपैकी एक’, असे वर्णन करण्यात आले आहे.

आणीबाणीत लोकशाही संस्थांवर दबाव वाढला आणि लोकांचे स्वातंत्र्य मर्यादित झाले !

या पुस्तकात लिहिले आहे की, १९७० च्या दशकाच्या प्रारंभी इंदिरा गांधी सरकारच्या विरोधात लोकांमध्ये अप्रसन्नता वाढत होती. बेरोजगारी, महागाई आणि गैरव्यवस्थापन यांच्या आरोपांमुळे अनेक ठिकाणी निदर्शने झाली. त्यानंतर जून १९७५ मध्ये अंतर्गत अशांततेच्या आधारावर राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली. या काळात बहुतेक मूलभूत अधिकार रहित करण्यात आले, वर्तमानपत्रांवर निर्बंध लादण्यात आले आणि अनेक राजकीय नेते अन् कार्यकर्ते यांना अटक करण्यात आली. या काळात लोकशाही संस्थांवर दबाव वाढला आणि लोकांचे स्वातंत्र्य मर्यादित झाले.

जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाचाही उल्लेख !

पुस्तकात लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्याविषयी म्हटले आहे की, त्यांनी विद्यार्थी आणि सामान्य लोक यांना संघटित केले अन् बिहार, तसेच गुजरात राज्यांमध्ये मोठे जनआंदोलन उभे राहिले. वर्ष १९७७ मध्ये आणीबाणी संपल्यानंतर सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. जनतेने मतदानाच्या माध्यमातून मत व्यक्त केले आणि सत्ताधारी सरकार निवडणूक हरले.

लोकशाहीसमोरील इतर आव्हानेही समाविष्ट !

आणीबाणीच्या व्यतिरिक्त पुस्तकात लोकशाहीसमोर असलेल्या इतर आव्हानांवरही चर्चा केली आहे. यात ‘फेक न्यूज’ (खोट्या बातम्या), चुकीची माहिती, सार्वजनिक मालमत्तेची हानी, नियमांचे उल्लंघन, गरिबी, प्रादेशिकता, सामाजिक भेदभाव आणि लैंगिक असमानता यांचा समावेश आहे.
‘एन्.सी.ई.आर्.टी.’ने प्रथमच ‘डेमोक्रेसी अँड यू’ नावाचा नवीन विभागही जोडला आहे. याचा उद्देश विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेतील त्यांची भूमिका समजावून सांगणे, हा आहे.