देवता, भारतमाता आणि राजकीय हुतात्मा यांच्या नावाने शपथ घेतली जाऊ शकत नाही ! – Kerala High Court

केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय

थिरूवनंतपूरम् (केरळम्) – स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडून आलेले प्रतिनिधी शपथ घेतांना कायद्यात ठरवून दिलेल्या शब्दांच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत; म्हणजेच शपथ ईश्वराच्या नावाने घेतली जाऊ शकते किंवा ईश्वराचे नाव न घेता गांभीर्यपूर्वक (सत्यनिष्ठेची) प्रतिज्ञा केली जाऊ शकते. त्यामध्ये देवता, भारतमाता, एखादी संघटना, राजकीय हुतात्मा किंवा कोणत्याही व्यक्तीचे नाव जोडणे ग्राह्य धरले जाणार नाही. स्वतःच्या बाजूने कोणताही नवीन शब्द जोडणे पूर्णपणे चुकीचे मानले जाईल, असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. यासाठी न्यायालयाने केरळम् महानगरपालिका अधिनियम आणि केरळम् पंचायत राज ॲक्ट यांचा संदर्भ दिला.

१. थिरूवनंतपूरम् महानगरपालिकेच्या २० नगरसेवकांनी शपथ घेतांना हिंदूंच्या देवता, ‘भारतम्बा’, ‘भारतमाता’, गुरुदेव’, स्वतःच्या राजकीय चळवळीतील हुतात्मा यांच्या नावांचा उल्लेख केला. तसेच पालक्कड जिल्ह्यातील वडक्कनचेरी ग्रामपंचायत सदस्याने ‘ईश्वराच्या कृपेने उम्मन चांडी’ यांच्या नावाने शपथ घेतली होती. या दोन्ही प्रकरणांचा विचार करून उच्च न्यायालयाने विचारले की, कायदा शपथेच्या ठरवून दिलेल्या प्रारूपाच्या बाहेर जाण्याची अनुमती देतो का ?

२. न्यायालयाने म्हटले की, शपथ ही केवळ एक औपचारिकता नाही. निवडून आलेला प्रतिनिधी राज्यघटनेचे पालन करील, कायद्यानुसार काम करील आणि प्रामाणिकपणे जनतेची सेवा करील, असे जनतेला दिलेले ते एक गंभीर वचन आहे. म्हणूनच कायद्यात लिहिलेल्या पद्धतीने घेतलेली शपथच वैध मानली जाईल. लोक भगवंताला वेगवेगळ्या नावांनी पुकारत असले, तरी कायदेशीररित्या शपथ केवळ ईश्वराच्या नावाने किंवा गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञेनेच घेतली जाऊ शकते. यामध्ये स्वतःच्या बाजूने कोणतेही नाव जोडणे योग्य नाही.

पुन्हा घ्यावी लागणार शपथ !

उच्च न्यायालयाने सांगितले की, शपथ चुकीच्या पद्धतीने घेतली गेली होती, त्यामुळे ती वैध मानली जाऊ शकत नाही; परंतु केवळ याच कारणासाठी निवडून आलेल्या प्रतिनिधींचा कौल (जनादेश) रहित केला जाणार नाही. न्यायालयाने आदेश दिला आहे की, थिरूवनंतपूरम् महानगरपालिकेचे नगरसेवक आणि वडक्कनचेरी पंचायत सदस्य यांनी ४ आठवड्यांच्या आत पुन्हा एकदा योग्य पद्धतीने शपथ घ्यावी. या लोकांनी कदाचित् स्वतःची पद्धत कायदेशीररित्या योग्य आहे, असे समजून असे केले असावे. त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही शिक्षा किंवा दंड आकारला जाणार नाही.

पंचायत सदस्याने केलेली कामे रहित होणार !

थिरूवनंतपुरम् महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या संदर्भात न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, आतापर्यंत त्यांनी केलेली कामे केरळम् महानगरपालिका कायद्याच्या कलम ५३१ अंतर्गत सुरक्षित रहातील. म्हणजेच, त्यांची आतापर्यंतची कारवाई केवळ शपथेच्या चुकीच्या आधारावर रहित होणार नाही; परंतु वडक्कनचेरी ग्रामपंचायत सदस्याच्या संदर्भात चित्र वेगळे आहे.  पंचायत राज कायद्यामध्ये अशा सुरक्षेचे प्रावधान नाही. त्यामुळे त्या सदस्याने आतापर्यंत केलेली कामे अमान्य मानली जातील; मात्र त्यालाही पुन्हा शपथ घेण्याची संधी देण्यात आली आहे.