(म्हणे) ‘भारत आणि पाक यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या साहाय्याने काश्मीरचा प्रश्न सोडवावा !’ – Turkish President Erdogan

तुर्कीयेचे राष्ट्रपती एर्दोगान यांचे संयुक्त राष्ट्रांत फुकाचे आवाहन

तुर्कीयेचे राष्ट्रपती एर्दोगान

न्यूयॉर्क (अमेरिका) – भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एप्रिलमध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर युद्धबंदी झाली आहे, याचा आम्हाला आनंद आहे. काश्मीरमधील आपल्या बंधू-भगिनींच्या लाभासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या साहाय्याने हा प्रश्न सोडवला पाहिजे, असे फुकाचे आवाहन तुर्कीयेचे राष्ट्रपती रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ८० व्या अधिवेशनात केले.

गाझावरील इस्रायलच्या आक्रमणांचा एर्दाेगान यांच्याकडून निषेध

काश्मीरसमवेतच एर्दोगान यांनी गाझाचेही सूत्र उपस्थित केले. ते म्हणाले की, आपण इथे बसून बोलत असतांना गाझामध्ये नरसंहार चालू आहे. गेल्या २३ महिन्यांपासून गाझामध्ये प्रत्येक घंट्याला एक मूल मरत आहे.  (इस्रायलने आतंकवाद्यांना लक्ष्य करतांना मुले मरत असल्यावर एर्दाेगान यांना ती निष्पाप जीव वाटतात; मात्र जिहादी आतंकवादी इस्रायल, भारत यांसह जगभरात अनेक वर्षांपासून निरपराध लोकांना आणि मुसलमानांनाही ठार करत असतांना ती त्यांना निष्पाप का वाटत नाहीत ? – संपादक)

एर्दोगान यांनी जगाला पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ उभे रहाण्याचे आणि मानवतेच्या नावाखाली त्याला मान्यता देण्याचे आवाहन केले. पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देणार्‍या देशांचे त्यांनी आभार मानले. एर्दोगान यांनी सीरिया, इराण, येमेन, लेबनॉन आणि कतार देशांवर इस्रायलने केलेल्या आक्रमणांवर टीका केली. या देशांतील हमासच्या नेत्यांना इस्रायलने लक्ष्य केले होते. (इस्रायलवर आक्रमण करणारे या देशांमध्ये लपून बसले असल्याने इस्रायलने आक्रमण करणे योग्यच आहे. असे आक्रमण होऊ नये, असे या देशांना वाटत असेल, तर त्यांनी या आतंकवाद्यांना आश्रय देऊ नये, यासाठी एर्दाेगान यांनी या देशांना सांगावे ! – संपादक)  

संपादकीय भूमिका

काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे. त्यामुळे पाकने त्याच्या कह्यातील काश्मीरला भारताकडे सोपवावे, ही एकच कृती केल्यावर हा प्रश्न सुटणार असल्याने एर्दाेगान यांनी पाकला काश्मीर देण्यास सांगावे !