Samoohik Tarpan : धर्मरक्षणार्थ प्राणार्पण करणार्‍या ८० कोटी हिंदूंसाठी हरिद्वार येथे सामूहिक तर्पण !

‘अयोध्या फाऊंडेशन’च्या प्रखर हिंदुत्वनिष्ठ मीनाक्षी शरण यांच्या पुढाकाराने मोहिमेचे नववे वर्ष !

हरिद्वार येथे झालेल्या सामूहिक तर्पणाच्या संकल्पाच्या वेळी १. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, २. मीनाक्षी शरण, ३. निशीथ शरण

हरिद्वार (उत्तराखंड) – सनातन धर्मासाठी आपले प्राणार्पण करणार्‍या लाखो हिंदूंच्या स्मृतीप्रीत्यर्थ येथील पवित्र चंडी घाटावर नववे ‘सामूहिक जल तर्पण’ करण्यात आले. या आध्यात्मिक कार्यक्रमात भारत आणि परदेशातील हिंदू अन् हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. २१ सप्टेंबरला सर्वपित्री अमावास्येला झालेल्या या कार्यक्रमाचे नेतृत्व ‘अयोध्या फाऊंडेशन’च्या संस्थापिका मीनाक्षी शरण यांनी केले. गेल्या ९ वर्षांपासून सर्वपित्री अमावास्येलात्या हे कार्य करत आहेत.

पूर्वजांच्या बलीदानामुळेच आज गौरवशाली हिंदु संस्कृती टिकून राहिली ! – मीनाक्षी शरण

मीनाक्षी शरण

या प्रसंगी मीनाक्षी शरण यांनी प्रसारमाध्यमांनी सांगितले की, गेल्या १४ शतकांमध्ये हिंदु धर्म, श्रद्धा, ओळख आणि संस्कृती यांचे रक्षण करण्यासाठी अनुमाने ८० कोटी हिंदूंनी आपले प्राण दिले. या शूर योद्ध्यांनी लढतांना मृत्यू स्वीकारला; परंतु कधीही धर्मांतर केले नाही. या बलीदानामुळेच आज हिंदु समाजाला स्वतःची ओळख आणि गौरवशाली संस्कृती टिकवून ठेवण्याचा बहुमान मिळू शकला. हे ऋण फेडण्यासाठी सामूहिक तर्पण करणे, ही काळाची आवश्यकता आहे. हे धार्मिक आचरण आपल्याला आपल्या गौरवशाली इतिहासाशी जोडते.

शरण पुढे म्हणाल्या की…,

१. जर भारताला त्याची शाश्वत सभ्यता आणि संस्कृती जिवंत ठेवायची असेल, तर हिंदूंना त्यांचा धर्म, परंपरा अन् इतिहास यांची जाणीव असणे आवश्यक आहे. या लाखो पूर्वजांच्या संघर्षाचा सन्मान करण्यासाठी सामूहिक तर्पण केवळ त्यांच्या स्मृती जिवंत ठेवत नाहीत, तर भावी पिढ्यांनाही प्रेरणा देतात.

२. यामध्ये राजकीय सल्लागार निशीथ शरण, ब्रँड बिल्डर्स शिवानी सोही आणि गुरुप्रताप सिंह सोही, चंडीगड येथील ‘शाश्वत भारत ट्रस्ट (डेहराडून)’चे संस्थापक तिर्लोक सिंह सोही, डॉ. कुलदीप दत्ता, निवृत्त कर्नल विवेक गुप्ता, ‘सीआयआय उत्तराखंड’चे अध्यक्ष अशोक कुमार विंडलास, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे, श्री. श्रीराम लुकतुके, ‘हिंदु रक्षा मंच’ हिमाचल प्रदेशचे अध्यक्ष कमल गौतम, डॉ. महेंद्र ठाकूर, माजी गुप्तचर अधिकारी कर्नल हनी बक्षी, कर्नल राजीव कोतवाल, अमृतसरचे रणजित सिंह कालरा, गढ सेना देहराडूनचे विमल उनियाल, ‘सनातन रक्षा बोर्डा’चे शैलेंद्र डोवाल, सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता अमिता सचदेव आणि जवळजवळ १०० मुले यांचा समावेश होता. हे सर्वजण चंडी घाटावर जमले आणि धर्मासाठी बलीदान देणार्‍या लाखो हिंदूंना श्रद्धांजली वाहिली.

३. यंदा भारतासह केनिया, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, ऑस्ट्रेलिया, लंडन, दुबई, कॅनडा आणि सिंगापूर येथील लाखो हिंदूंनी आपापल्या भागात सामूहिक तर्पणाचे आयोजन केले.

४. ही सेवाभावी मोहीम प्रतिवर्षी मोठी होत आहे. ती आता हिंदु जागृतीसाठी एक मोठी चळवळ बनली आहे.

५. हिंदु जनजागृती समिती, सनातन प्रभात, हिंदु रक्षा मंच (हिमाचल प्रदेश), प्रयागराजचे संत अशोक जी महाराज, हिंदु जागरण मंच (उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड), गढ सेना (डेहराडून), शाश्वत भारत ट्रस्ट, हिंदु युवा मोर्चा, हिंदुस्थान (छत्तीसगड) आदी देश-विदेशातील असंख्य संघटनांचा या मोहिमेत सहभाग होता. उज्जैन, ‘इटर्नल हिंदु फाऊंडेशन’ (देहली-मुंबई), पनून कश्मीर जम्मू, सारस्वत काश्मिरी ब्राह्मण फाऊंडेशन, अरुंधती फाउंडेशन (पुणे), देवदेवेश्वर संस्थान (पुणे), संवेदना संस्था (हिमाचल प्रदेश), सिद्ध विद्या असोसिएट्स (मुंबई), अमिता सचदेव अँड असोसिएट्स (देहली) आदी या मोहिमेत प्रतिवर्षी सहभागी होतात.