Pandit Dhirendrakrishna Shastri :  देशातील प्रत्येक मंदिर, मशीद आणि चर्च यांमध्ये राष्ट्रगीत लावले पाहिजे !

बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे मत

छतरपूर (मध्यप्रदेश) – राष्ट्रगीत गाण्याची परंपरा चांगली आहे. प्रत्येक मंदिर, मशीद आणि चर्च यांमध्ये राष्ट्रगीत लावले पाहिजे. धर्मभक्तीसमवेत देशभक्तीही असली पाहिजे. आठवड्यात किमान एकदा तरी राष्ट्रगीत झालेच पाहिजे, जेणेकरून राष्ट्राविषयीच्या कर्तव्यांसाठी आपण एकत्र राहू, असे विधान येथील बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी केले. ते येथे एका धार्मिक कार्यक्रमात बोलत होते.

भटक्या गायींसाठी सरकारने प्रत्येक तालुका आणि जिल्हा येथे गोशाळा उभाराव्यात !

भटक्या गायींविषयी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी म्हटले की, केंद्र आणि विशेषतः मध्यप्रदेश सरकारने गायींसाठी तातडीने ‘अभयारण्य योजना’ राबवून प्रत्येक तालुका किंवा जिल्ह्यात ५ गोशाळा उभाराव्यात. प्रत्येक गोशाळेत ५ ते १० सहस्र गोवंश ठेवण्याची व्यवस्था असावी. असे झाल्यास प्रत्येक जिल्ह्यातील सहस्रो गोमाता रस्त्यांवरून हटून त्या अभयारण्यात सुव्यवस्थित रहातील.