Idol Vandalization Khajuraho : सर्वाेच्च न्यायालयाचा देवालाच काहीतरी करायला सांगण्याचा याचिकाकर्त्याला सल्ला !

खजुराहो (मध्यप्रदेश) येथील भंगलेली श्रीविष्णु मूर्ती पालटण्याची मागणी केल्याचे प्रकरण

शिर तोडण्यात आलेली श्रीविष्णूची मूर्ती

(हे छायाचित्र कुणाच्या धार्मिक भावना दुखाण्यासाठी नव्हे, तर वस्तूस्थिती लक्षात येण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे.)

खजुराहो (मध्यप्रदेश) – येथील श्री वामन मंदिरात भगवान विष्णूची ७ फूट उंच तुटलेली मूर्ती पुनर्स्थापित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने असेही स्पष्ट केले की, मूर्ती सध्या ज्या स्थितीत आहे, त्याच स्थितीत राहील. जर भाविकांना पूजा करायची असेल, तर ते दुसर्‍या मंदिरात जाऊ शकतात. ही केवळ प्रसिद्धीसाठी केलेली याचिका आहे. जा आणि देवालाच काही तरी करायला सांगा. तुम्ही स्वतःला भगवान विष्णूचे परम भक्त म्हणवता, तर मग देवालाच प्रार्थना करा आणि ध्यान करा’, असा सल्लाही न्यायालयाने याचिकाकर्त्याला या वेळी दिला. सरन्यायाधीश बी.आर्. गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन् यांच्या खंडपिठाने याचिकाकर्ता राकेश दलाल यांच्या याचिकेवर विचार करण्यास नकार दिला.

न्यायालयाने पुढे म्हटले की, भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत हे प्रकरण येते. ही जागा एक जागतिक वारसा आहे. जर तुम्ही शैव पंथाचे विरोधक नसाल, तर तुम्ही तिथे जाऊन पूजाअर्चना करू शकता. तिथे भव्य असे शिवलिंग आहे. खजुराहोमधील सर्वांत मोठ्या लिंगापैकी ते एक आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण ?

मोगलांच्या आक्रमणात श्री वामन मंदिरातील भगवान श्रीविष्णूच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली होती. तेव्हापासून ती याच स्थितीत आहे. मंदिराच्या गर्भगृहात स्थापित केलेल्या भगवान श्रीविष्णूच्या मूर्तीचे डोके तोडण्यात आले आहे. अनेक सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिक यांनी तिच्या जीर्णोद्धाराची मागणी केली आहे. भाविकांच्या पूजा करण्याच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी आणि मंदिराचे पावित्र्य पुनरुज्जीवित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाची याचिकाकर्त्याने मागणी केली होती. याचिकाकर्ते राकेश दलाल यांनी मूर्तीच्या जागी नवीन मूर्ती बसवण्याची मागणी केली होती. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर निराशा व्यक्त केली. ते म्हणाले की, भाजप सत्तेत असूनही ही परिस्थिती दुःखद आहे.

‘राष्ट्रीय वीर किसान मजदूर संघ दिल्ली’चे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश दलाल राकेश दलाल यांनी देहलीतील जंतरमंतर येथे निदर्शनेही केली होती आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन सादर केले होते. दलाल यांनी या मंदिराबाहेर अनेक वेळा उपवास केला आणि स्थानिक लोकांना जागृत व्हावे; म्हणून धार्मिक विधीही केले होते.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या धर्मभावना लक्षात घेऊन भारत सरकारनेच पुढाकार घेऊन भंगलेली मूर्ती विसर्जित करून नवीन मूर्ती स्थापित करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !