कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत रस्त्यांवर पडलेले खड्डे

ठाणे, ९ सप्टेंबर (वार्ता.) – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. गणेशोत्सवात तरी खड्डे बुजवले जातील, अशी अपेक्षा नागरिकांना होती; मात्र नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले. गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी मूर्ती खड्ड्यांतून नेतांना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागली. त्यामुळे प्रशासनाच्या कारभाराविषयी नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

१. कल्याण येथील गोविंदवाडी बायपास येथून दुर्गाडी किल्ल्याजवळ जाणारा रस्ता, आणि अन्य डांबरी रस्ते, डोंबिवली पूर्व-पश्चिम येथील डांबरी रस्ते, ठाकुर्ली पूर्व रेल्वेस्थानक परिसरातील रस्ता, ठाकुर्ली येथून कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाणारा रस्ता यांसह अन्य रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत.

२. महानगरपालिकेच्या हद्दीतील काही रस्ते सिमेंट काँक्रीटचे असले, तरी काही रस्ते अद्याप डांबराचे आहेत. या डांबरी रस्त्यांवर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यातून कसरत करत प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांच्या वाहनांची हानी होत आहेत, तर बर्‍याच जणांना शारीरिक दुखणी चालू झाली आहेत.

३. काही ठिकाणी रस्त्यावरील डांबराचा थर निघून गेल्याने तेथे बारीक खडी रस्त्यावर पसरली आहे. ही लहान खडी पादचार्‍यांना आणि दुचाकी स्वारांना त्रासदायक ठरत आहे. या निसरड्या रस्त्यावरून खड्डयांचा अंदाज न आल्यामुळे दुचाकी घसल्याने दुचाकीस्वार घायाळ झाल्याच्या घटना घडत आहेत.

संपादकीय  भूमिका 

आणखी किती जण घायाळ झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार ? नागरिकांच्या जिवावर बेतूनही खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न न करणार्‍यांना कठोर शिक्षा करा !