Chhattisgarh Conversion : दुर्ग (छत्तीसगड) येथे प्रार्थना सभेच्या नावाखाली कामगारांचे धर्मांतर : दोघा पाद्र्यांना अटक

हिंदूंच्या देवतांविषयी करण्यात येत होती आक्षेपार्ह वक्तव्ये

दुर्ग (छत्तीसगड) – येथील बोरसी येथील न्यू मन्नम नगर परिसरात एका घरात चालू असलेल्या प्रार्थनासभेत कामगारांचे बलपूर्वक धर्मांतर केले जात असल्याचे उघड झाले. हिंदु संघटनांनी हा प्रकार उघड केला. यानंतर परिसरात गोंधळ निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोचले आणि त्यांनी मनोहर तांडी अन् आकाश बसेरा या २ पाद्र्यांना अटक केली. त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हिंदु संघटनांच्या म्हणण्यानुसार ओडिशाहून आलेल्या कामगारांना अन्न आणि औषधोपचार यांचे आमिष दाखवून प्रार्थनासभेत नेण्यात आले. या वेळी हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात येत होती. यासह कामगारांवर दबाव आणून त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त केले जात होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर तहसीलदार प्रफुल्ल गुप्ता आणि पोलीस अधीक्षक सुखनंदन राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. पोलीस निरीक्षक राजेंद्र लहारे यांनी सांगितले की, धर्मांतराच्या तक्रारीनंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई चालू आहे. या प्रकारामुळे राज्यात धर्मांतरावरील नियंत्रणासंदर्भातील मागणीने पुन्हा जोर धरला आहे.

दोन वर्षांपासून चालू होती प्रार्थनासभा

स्थानिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात गेल्या दोन वर्षांपासून या प्रार्थनासभा चालू आहेत. पूर्वी विरोध झाल्यानंतर काही काळ त्या बंद करण्यात आल्या होत्या; मात्र नंतर पुन्हा चालू करण्यात आल्या. रविवार, ३१ ऑगस्टला झालेल्या प्रार्थनासभेला हिंदु संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

संपादकीय भूमिका

  • सरकारला खरोखरच देशातील धर्मांतराचे प्रकार बंद करायचे असतील, तर धर्मांतर करणार्‍यांची पाळेमुळे खणून त्यांना कोण आणि किती पैसा पुरवतो ?, त्यांचे जाळे कसे कार्यरत असते ? त्यांना स्थानिक कुणाकुणाचे साहाय्य मिळते ? आदी गोष्टी जनतेसमोर आणल्या पाहिजेत आणि दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे !
  • देशात हिंदू बहुसंख्य असूनही अल्पसंख्य त्यांचे धर्मांतर करतात, हे हिंदूंना लज्जास्पद ! हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन स्वतःतील धर्माभिमान वाढवणे, हाच त्यांचे धर्मांतर टाळण्याचा प्रभावी उपाय आहे !