Himachal Heavy Rain : मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशमधील जनजीवन विस्कळीत  

  • ६ जिल्ह्यांना अतीदक्षतेची चेतावणी

  • ४ राष्ट्रीय महामार्गांसह एकूण ६६२ रस्ते बंद

  • अनेक भागांत भूस्खलन, मोठ्या प्रमाणात वित्तहानी

  • एका आठवड्यात सरासरीपेक्षा २९१ टक्के अधिक पावसाची नोंद

शिमला (हिमाचल प्रदेश) – राज्यात पडणार्‍या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन जीवित आणि मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे. राजधानी शिमला परिसरात गेल्या २४ घंट्यांपासून मुसळधार पाऊस चालू आहे.

१. राज्य सरकारने खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर ६ जिल्ह्यांना अतीदक्षतेची चेतावणी दिली आहे. शिमला, सोलन, सिरमौर, बिलासपूर, कुल्लू, चंबा, कांगडा, उना आणि हमीरपूर या ९ जिल्ह्यांमध्ये सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

२. शिमला येथील जंगा भागात भूस्खलनामुळे एक घर कोसळले आणि त्याखाली दबून वीरेंद्र कुमार (वय ३५ वर्षे) आणि त्यांची १० वर्षांची मुलगी यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या वेळी त्यांची पत्नी घराबाहेर असल्याने सुदैवाने ती वाचली. दुसर्‍या घटनेत कोटखाईमधील चोल गावात भूस्खलनामुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.

३. राज्यातील अनेक भागांत पावसामुळे ४ राष्ट्रीय महामार्गांसह एकूण ६६२ रस्ते बंद झाले आहेत. वाहतूक ठप्प झाली असून अनेक ठिकाणी वीज आणि पाण्याची सुविधा खंडित झाली आहे. अनुमाने ९८५ वीज ‘ट्रान्सफॉर्मर’ आणि ४९५ पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडल्या आहेत.

४. हवामान खात्याच्या माहितीनुसार २४ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत हिमाचल प्रदेशात सरासरीपेक्षा २९१ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. विशेषतः चंबा जिल्ह्यात ५८९ टक्के, कुल्लू येथे ४५८ टक्के, शिमला येथे ३४९ टक्के आणि लाहौल-स्पितीमध्ये ३६९ टक्के अधिक पाऊस पडला आहे. संपूर्ण ऑगस्ट महिन्याचा विचार करता, हिमाचलमध्ये यावर्षी ४४० मिमी पाऊस पडला आहे, जो सरासरीपेक्षा ७२ टक्के अधिक आहे.

५. पावसामुळे डोंगराळ भागांत भूस्खलन झाल्याने वाहने अन् बसगाड्या यांच्यावर डोंगराचे ढिगारे कोसळले. काही गाड्या गाडल्या गेल्या, तर एका चारचाकीवर विजेचा खांब कोसळला. सुदैवाने चालकाला इजा झाली नाही.

६. पावसामुळे नद्यांची पातळी वाढल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कांगड्यातील पोंग धरणातून १ लाख क्युसेक्स पाणी सोडावे लागले.

७. कुल्लू जिल्ह्यातील नग्गर नाल्यात २ लोक अडकले होते. त्यांना यशस्वीरीत्या वाचवण्यात आले; मात्र पांगी परिसरात रस्ते बंद असल्याने महिलांसह ३२ लोक सध्या त्रिलोकीनाथ मंदिराच्या धर्मशाळेत अडकून आहेत. अनेक गावांत घरांवर डोंगर कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून भूमी खचण्याच्या घटनाही घडत आहेत.

८. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. बचाव आणि पुनर्बांधणी कार्य चालू असले तरी, पावसाचा जोर ओसरल्याविना परिस्थिती पूर्ववत होण्याची शक्यता अल्प आहे.