लव्ह जिहाद, ऑपरेशन सिंदूर, महागाई, भ्रष्टाचार यांवरील बडगे झाले आकर्षणाचे केंद्र !

नागपूर येथे मारबत मिरवणूक

मारबत मिरवणुकीत लव्ह जिहाद आणि डॉनल्ड ट्रम्प’ यांचे पुतळे

नागपूर – येथे २३ ऑगस्ट या दिवशी मारबत मिरवणूक काढण्यात आली. हा उत्सव धार्मिक आणि पारंपरिक असला, तरी यामध्ये सामाजिक संदेशही दिला जातो. त्यामुळे  मारबतींचे दर्शन घेण्यासाठी आणि मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी अलोट गर्दी झाली होती. या मिरवणुकीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प, तसेच लव्ह जिहाद, ऑपरेशन सिंदूर, आतंकवाद, महागाई, भ्रष्टाचार, व्यसनाधीनता आदी विषयांवर निघालेल्या प्रतीकात्मक पुतळ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

१. ‘महागाईच्या राक्षसाचा वध करा’, ‘पिवळी मारबत बोलते, ‘शहराची स्वच्छता करा’,
‘भ्रष्टाचार करणार्‍यांना जनता सोडणार नाही’, ‘वाहतुकीचा गोंधळ थांबवा’, ‘नागरिकांना दिलासा द्या, पाणी टंचाईवर उपाय करा, नाहीतर जनता सवाल करील’, अशा घोषणा मिरवणुकीत देण्यात आल्या.

२. ‘जागनाथ बुधवारी’ येथून तेली समाजाच्या पिवळी, तर बारदाणा मार्केट येथून ‘काळ्या मारबती’ची मिरवणूक निघाली. इतवारीतील नेहरू पुतळा चौक येथे दोन्ही मारबतींचे मिलन झाले.

३. अनुचित घटना घडू नये, यासाठी ३ सहस्र पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. काळ्या मारबतीला १४४ वर्षांचा, तर पिवळ्या मारबतीला १४५ वर्षांचा इतिहास असून दोन्ही मारबतीच्या मिरवणुका एकाच वेळी निघाल्या.

‘पिवळी मारबत’ आणि ‘काळी मारबत’ काय आहे ? 

लोकांच्या रक्षणासाठी उभारली जाणारी पिवळी मारबतची मिरवणूक  

विदर्भात बैल पोळ्यानंतर दुसर्‍या दिवशी मारबत उत्सव साजरा केला जातो. १४५ वर्षांची परंपरा लाभलेला हा उत्सव केवळ धार्मिक सोहळा नसून समाजातील वाईट प्रवृत्तींचा निषेध आणि जागृतीचे साधन म्हणून आजही तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. वर्ष १८८५ मध्ये ‘जागनाथ बुधवारी’ परिसरातील तेली समाजाने पिवळी मारबत काढण्याची परंपरा चालू केली. लोकांच्या रक्षणासाठी उभारली जाणारी ‘पिवळी मारबत’ हा देवीचा पुतळा असतो. या वैशिष्ट्यामुळे ‘पिवळी मारबत’ ही केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून मातृत्व आणि लोककल्याणाचीही भावना जपते. मिरवणुकीनंतर तिचे दहन केले जाते, ज्यातून वाईट प्रवृत्तींचा नाश आणि चांगल्या विचारांचे स्वागत करण्याचा संदेश दिला जातो. तिच्या मिरवणुकीच्या वेळी महिला मोठ्या संख्येने लहान मुलांना घेऊन दर्शनासाठी उपस्थित राहतात.

‘काळी मारबती’च्या मिरवणुकीचा आरंभ १४४ वर्षांपूर्वी झाला. श्रीकृष्णाला मारण्यासाठी आलेल्या पुतना मावशीचे प्रतीक म्हणून काळ्या रंगाचा पुतळा उभारला जातो. ‘काळी मारबत’ समाजातील अन्याय, दुष्ट प्रवृत्ती आणि अंधश्रद्धांचा विरोध करते.