वर्ष २०२५ मधील गुरुपौर्णिमा महोत्सवात रत्नागिरी जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती

१. श्री. नागेश टेमकर, दापोली

‘दिवसभर सेवा करूनही मला थकवा जाणवला नाही. दिवसभर चंदनाचा सुगंध येत होता.’

२. श्री. सचिन आग्रे, दापोली

‘आरती करत असतांना ‘प.पू. भक्तराज महाराज झोपाळ्यावर बसले आहेत’, असे मला जाणवले. त्यांच्या हातात काठी होती आणि त्यांच्याभोवती प्रकाशाचा गोळा दिसत होता.’

३. सौ. सुहासिनी डोंगरकर, दापोली

‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजेची सिद्धता करतांना मला पुष्कळ चैतन्य आणि आनंद जाणवत होता. ‘प.पू. डॉक्टर तेथे बसले आहेत’, असे मला जाणवत होते.’

४. सौ. शारदा मांडवकर, दापोली

‘संतसेवा करतांना ‘पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते. प.पू. भक्तराज महाराज यांचे डोळे खरेे असल्याप्रमाणे जाणवले. ‘प.पू. गुरुदेव प्रत्यक्ष येथे आहेत’, असे वाटून माझी भावजागृती झाली.’

५. सौ. अपर्णा कुलकर्णी, दापोली

‘सभागृहाची अनुमती उशिरा मिळूनही प्रतिवर्षीपेक्षा या वर्षी सिद्धता वेळेत पूर्ण झाली. सेवा करत असतांना माझे मन पुष्कळ शांत आणि स्थिर होते. कार्यक्रमात श्रीरामाचा नामजप चालू झाल्यावर माझी पुष्कळ भावजागृती झाली. ‘व्यासपिठावरील आसंदीत प.पू. गुरुदेव श्रीरामाच्या रूपात बसले आहेत’, असे मला जाणवत होते. ‘सर्व सेवा गुरुदेवच करून घेत आहेत’, असा भाव जाणवत होता.’

६. श्रीमती मंजिरी बेडेकर, रत्नागिरी

‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळच्या सत्रात कार्यक्रमाला आरंभ झाल्यापासून माझी भावजागृती होत होती. सद्गुरु सत्यवान कदम यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी मला अश्रू अनावर झाले. ‘आरतीच्या वेळी प्रत्यक्ष गुरुमाऊली आली आहे’, असे वाटले. नंतरच्या सत्रात शंखनाद महोत्सवातील चित्रफित पहातांना ‘पुन्हा आपण त्या स्थळी आहोत’, असे वाटले. श्रीरामाच्या नामजपाच्या वेळी माझे ध्यान लागले होते. ‘नामजप कधी संपला’, ते कळलेच नाही. ‘अशी अनुभूती परत परत घेता येऊ दे’, अशी गुरुमाऊलीच्या चरणी प्रार्थना !’

(सर्व सूत्रांचा दिनांक १०.७.२०२५)