मंदिरे ही धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्रे व्हायला हवीत ! – श्री आनंद जीवन स्वामी, स्वामीनारायण मंदिर

  • धुळे येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ‘मंदिर – न्यास जिल्हा अधिवेशन’ !

  • ३५० हून अधिक मंदिरप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग !

व्यासपिठावर उपस्थित डावीकडून श्री. सुनील घनवट, श्री. दिलीप देशमुख, सद्गुरु नंदकुमार जाधव, श्री आनंद जीवन स्वामी, प्राध्यापक प्रकाश पाठक आणि श्री. सोमनाथ गुरव

धुळे – मंदिरे ही धर्माची आधारशिला आहेत. तेथून समाजाला चैतन्य आणि शांती यांची अनुभूती होते. मंदिरात येणार्‍या भाविकांना भारतीय संस्कृती, धार्मिक आचरण यांची माहिती देणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी मंदिरे ही धार्मिक अन् सांस्कृतिक केंद्रे बनायला हवीत, असे मार्गदर्शन स्वामीनारायण मंदिर, धुळे येथील श्री आनंद जीवन स्वामी यांनी केले. ते येथे आयोजित मंदिर अधिवेशनात बोलत होते. श्री स्वामीनारायण मंदिर, देवपूर, श्री एकविरादेवी मंदिर, देवपूर, श्री नरसिंह मंदिर, आग्रा रोड, कान्हादेश वारकरी सेवा मंडळ, महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास जिल्हा अधिवेशन’ पार पडले. अधिवेशनाचा शुभारंभ सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, श्री आनंद जीवन स्वामी, प्रा. प्रकाश पाठक, एकविरा देवीचे श्री. सोमनाथ गुरव, माजी सहधर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या संदेशाचे वाचन श्री. वसंत पाटील यांनी केले. अधिवेशनाला ३५० हून अधिक विश्वस्त, प्रतिनिधी, पुजारी आणि अधिवक्ते उपस्थित होते.

मंदिरांचे रक्षण आणि संघटन करण्यासाठी मंदिर महासंघ कटीबद्ध ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

मंदिरांचे सरकारीकरण आणि त्या मंदिरांत भ्रष्टाचार, पैसे घेऊन अतीमहनीय दर्शन, मंदिरांची भूमी बळकावणे यांसह ‘वक्फ बोर्डा’चे अतिक्रमण चालू आहे. यामुळे मंदिर रक्षणासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ कार्यरत आहे. मंदिरांच्या समस्या सोडवतांनाच महासंघ मंदिरांचे संघटन करण्यासाठी कटीबद्ध आहे.

मंदिरांमधून धर्मशिक्षण दिल्यास राष्ट्रभक्ती असणारी पिढी निर्माण होईल ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था 

मंदिर हा हिंदु संस्कृतीचा वारसा असून तो जतन करायला हवा. धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचे कार्य मंदिरांमुळे झालेले आहे. मंदिर संस्कृतीचा देशाच्या विकासात मोठा वाटा आहे; पण आज तीर्थक्षेत्रे पर्यटन क्षेत्रे झाली आहेत. त्यामुळे तेथील आध्यात्मिक शक्तीचा लाभ होत नाही. मंदिरांमधून धर्मशिक्षण दिल्यास श्रद्धा वाढून सशक्त राष्ट्रभक्ती असणारी पिढी निर्माण होऊन ती राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात योगदान देईल !

‘नॅरेटिव्ह वॉर’चा (खोट्या कथानकाचा) सामना करण्यासाठी वैचारिक सामर्थ्य वाढवा ! – प्रा. प्रकाश पाठक, धुळे

मंदिर संस्कृतीला अपकीर्त करण्यासाठी अनेक चुकीच्या गोष्टी पसरवण्याचे षड्यंत्र आंतरराष्ट्रीय स्तरावरून केले जात आहे. हिंदूंना जागतिक स्तरावर अपकीर्त करण्याचा प्रयत्न चालू आहे. हे सर्व प्रयत्न आपले खच्चीकरण करण्यासाठी पद्धतशीरपणे चालू आहेत. याचा सामना करण्यासाठी आपणही धार्मिक अभ्यास करून आपले वैचारिक सामर्थ्य आणि शुद्धता वाढवणे आवश्यक आहे.

या वेळी माजी सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख यांनी न्यास नोंदणी, तसेच मंदिरांच्या अडचणीसंदर्भात मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन श्री. पीयूष खंडेलवाल यांनी, तर ठरावाचे वाचन श्री. मयूर बागुल यांनी केले.

मंदिर अधिवेशनाला उपस्थित विविध मंदिरांचे प्रतिनिधी !

धुळे येथे मंदिर महासंघाच्या कार्यकारिणीची घोषणा !

१ वर्षासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या धुळे जिल्हा कार्यकारिणीची औपचारिक घोषणा करण्यात आली. यात सर्वश्री अक्षय मुंडके, चंदन सोनार, विकास राजपूत, चेतन जगताप, अजय कासोदेकर, प्रमोद सैंदाने, सुनील वाघ, शंकर शर्मा, राजीव कुमार झा महाराज यांचा समावेश असून त्यांना अधिवक्ता अमित दुसाने आणि अन्य अधिवक्ते कायदेशीर मार्गदर्शन करणार आहेत. मार्गदर्शक म्हणून श्री. आनंद जीवन स्वामी, प्रा. प्रकाश पाठक, सोमनाथ गुरव आणि ह.भ.प. भाऊ महाराज रुद्र यांचे मार्गदर्शन लाभेल.