Covid Tablighi Jamat : कोरोना काळात तबलीगी जमातच्या विदेशी नागरिकांना आश्रय देणार्‍यांवरील गुन्हे रहित

देहली उच्च न्यायालयाचा निर्णय

नवी देहली – कोविड महामारीच्या पहिल्या लाटेच्या वेळी येथील तबलीगी जमातच्या मुख्यालयातील शिबिरात सहभागी झालेल्या परदेशी नागरिकांना स्वतःच्या घरात आश्रय देणार्‍या भारतीय नागरिकांवर प्रविष्ट (दाखल) करण्यात आलेल्या खटल्यांवर देहली  उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. न्यायालयाने ७० भारतीय नागरिकांवरील १६ गुन्हे रहित करण्याचा आदेश दिला. न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, या प्रकरणात प्रविष्ट करण्यात आलेले आरोपपत्र रहित केले जात आहेत; कारण सध्याच्या परिस्थिती आणि उपलब्ध पुरावे पहाता हा खटला चालवणे न्यायाच्या हिताचे ठरणार नाही.

काय होता आरोप ?

या प्रकरणात आरोप होता की, ७० भारतीय नागरिकांनी जवळपास १९० परदेशी नागरिकांना स्वतःच्या घरात आश्रय दिला होता. हे नागरिक मार्च २०२० मध्ये देहलीतील निजामुद्दीन येथील तबलीगी जमातच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. देहली पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान, साथीचे रोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि परदेशी नागरिक कायदा यांच्या विविध कलमांखाली गुन्हे नोंदवले होते. पोलिसांचे म्हणणे होते की, दळणवळण बंदीच्या (लॉकडाऊनच्या) काळात सरकारचे आदेश डावलून या आरोपींनी परदेशी नागरिकांना घरी थांबवणे, हे नियमांचे उल्लंघन होते.

आरोपींच्या अधिवक्त्यांनी युक्तीवादात म्हटले की, आरोपींची कुठलीही गुन्हेगारी इच्छा नव्हती आणि अशा स्वरूपाचे कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत, जे त्यांना दोषी ठरवू शकतील.

तबलीगी जमात म्हणजे काय ?

तबलीगी जमात एक धार्मिक समूह आहे, ज्याचा उद्देश इस्लामचा प्रचार-प्रसार करणे, हा आहे. भारतासह जगभरात ही जमात सक्रीय आहे. त्यांच्या सदस्यांचे छोटे-मोठे गट देश-विदेशात फिरणे, हा त्यांच्या कार्यपद्धतीचा भाग असतो. विशेष म्हणजे ‘मुसलमान आक्रमकांनी भारतात हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर केल्यानंतर त्यांना इस्लामच्या चालीरिती शिकवण्यासाठी या गटाची स्थापना करण्यात आली’, असे म्हटले जाते.