थोडक्यात महत्त्वाचे (२४.७.२०२५)

डोंबिवली येथे २ आस्थापनांना आग !

डोंबिवली – डोंबिवली एम्.आय.डी.सी.मधील ‘एरोसेल’ आणि ‘विश्वनाथ गारमेंट’ या २ आस्थापनांना भीषण आग लागली. या वेळी मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उसळत होते. अग्नीशमन विभागाने घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळवले. शॉर्टसर्किट किंवा कपड्यावर प्रक्रिया करतांना तांत्रिक कारणामुळे आग लागली असण्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.


अपघातात महिलेचा जागीच मृत्यू

खोपोली – मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर खोपोलीहून लोणावळ्याकडे जातांना बोरघाटात ट्रक चढत नसल्याने चालकाने ट्रक परत खोपोलीकडे वळवला. सायमाळ जवळ तीव्र उतारावरील वळणावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने त्याने चारचाकीला धडक दिली. या अपघातात महिला जागीच ठार झाली तर अन्य ३ जण गंभीर घायाळ झाले.


वीटभट्टी व्यावसायिकावर प्राणघातक आक्रमण !

धुळे – कुरापत काढून वीटभट्टी व्यावसायिक संदीप देवरे (वय ३२ वर्षे) यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. काठीचा खांद्यावर वार होऊन ते घायाळ झाले. आक्रमणकर्त्यांकडून बंदुकीने त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली; मात्र त्यातून ते वाचले. या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात ८ ते १० जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका : कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा !


नव्या भुयारी मार्गाचे नियोजन

नाशिक – आग्रा आणि नाशिक-पुणे महामार्ग यांचा संगम होणार्‍या द्वारका चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होते. ती सोडवण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळा’च्या वतीने नव्या भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. उड्डाणपुलाचे खांब, जलवाहिनी आणि सांडपाणी वाहिन्या सांभाळून हे काम करणे आव्हानाचे आहे.


कसारा रेल्वे स्थानकाजवळ लोकलवर दरड कोसळली !

ठाणे – मुंबईहून कसारा येथे येणारी लोकल २२ जुलैला रात्री ९.३० वाजता कसारा रेल्वेस्थानकाजवळ आली. त्या वेळी रेल्वे रुळांजवळ असलेल्या डोंगरावरून दगड आणि मातीचा ढीग लोकलवर कोसळला. त्यातील काही दगड आणि माती दरवाजांमधून डब्यात शिरली. त्या वेळी दरवाजाजवळ उभ्या असलेल्या प्रवाशांपैकी २ प्रवासी घायाळ झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.


रेल्वे रुळाला तडा गेल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत !

मुंबई – मालाड ते कांदिवली दरम्यान रुळाला तडे गेल्याने चर्चगेट ते बोरीवली आणि विरार मार्गावरील लोकलची वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने रेल्वे प्रशासनाकडून अनेक गाड्या रहित करण्यात आल्या. सकाळी कामाला निघण्याच्या वेळेतच लोकलसेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.