NCERT New Book : बाबर, औरंगजेब आदी मोगलांनी हिंदूंची मंदिरे तोडली, त्यांचे धर्मांतर केले !

एन्.सी.ई.आर्.टी.च्या ८ वीच्या समाजशास्त्राच्या नवीन पुस्तकातील माहिती

(एन्.सी.ई.आर्.टी. म्हणजे नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग अर्थात् राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद)

नवी देहली – एन्.सी.ई.आर्.टी.च्या ८ वीच्या समाजशास्त्राच्या नवीन पुस्तकात मोगल शासक बाबर अत्यंत क्रूर आणि निर्दयी होता. त्याने अनेक शहरांमध्ये हिंदूंची अत्यंत क्रूरपणे हत्या केली, त्यांचे धर्मांतर केले. अकबराच्या राज्यात क्रौर्य आणि सहिष्णुता दोन्ही होते, तर औरंगजेबाने मंदिरे आणि गुरुद्वारा तोडले, अशा प्रकारची नवीन माहिती देण्यात आली आहे. मोगल आणि मराठे यांच्या इतिहासाचा यात समावेश करण्यात आला आहे. ‘इतिहासातीले काळे अध्याय’ असा उल्लेख करत ही माहिती देण्यात आली आहे. ‘इतिहासात घडलेल्या घटनांसाठी आज कुणाला उत्तरदायी ठरवता येणार नाही’, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

१३ व्या शतकापासून ते १७ व्या शतकापर्यंतच्या इतिहासाची माहिती

Reshaping India’s Political Map (भारताचा राजकीय नकाशा पालटत आहे) नावाचा भाग या पुस्तकात आहे. त्यात १३ व्या शतकापासून ते १७ व्या शतकापर्यंत काय घडले, त्या प्रमुख घटनांचा उल्लेख आहे. देहली साम्राज्य, विजयनगर साम्राज्य, मोगल शासन, शिखांचे आगमन या सगळ्या विषयांचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. ‘त्या काळात खेडेगावांची रचना आणि शहरांची रचना कशी होती ?’, यावरही यात माहिती देण्यात आली आहे. मोगलांच्या सैन्याने अनेक गावे आणि शहरे येथे  कशी लूटमार केली, मंदिरे, धार्मिक स्थळे कशी तोडली ?, हेदेखील यात सांगितले आहे.

पुस्तकातील काही महत्त्वाची माहिती

१. बाबर हा अत्यंत क्रूर शासक होता. त्याने शहरांवर आक्रमणे करून सहस्रो लोकांना ठार केले, तर महिला आणि लहान मुले यांना कारागृहात टाकले.

२. अल्लाउद्दीन खिलजी याचा सेनापती मलिक काफूर याने श्रीरंगम्, मदुराई, चिदंबरम्, रामेश्वरम् यांसारख्या मंदिरांवर आक्रमणे केली.

३. औरंगजेबाने मथुरा, सोमनाथ येथील हिंदूंची मंदिरे, तसेच जैन मंदिरे पाडली. त्याने शिखांच्या गुरुद्वारांवरही आक्रमणे केली.

४. मोगलांनी हिंदु, बौद्ध आणि जैन धर्मियांची मंदिरे, तेथील मूर्ती यांची तोडफोड करत लूटमार केली.

५. हिंदूंवर जिझिया कर लावण्यात आला होता. मोगलांकडून हिंदूंचा अवमान करत त्यांना ‘तुम्ही धर्मांतर करा आणि इस्लाम स्वीकारा’ असे सांगितले जात होते.

संपादकीय भूमिका

हे इतिहासाचे ‘भगवेकरण’ नसून इतिहासाचे झालेले ‘हिरवेकरण’ हटवून सत्य इतिहास सांगण्याचा प्रयत्न आहे. हा प्रारंभ आहे, अजून पुष्कळ गोष्टींची माहिती देणे शेष आहे, असेच म्हणावे लागेल !