Arunachal Rapist Lynching : अरुणाचल प्रदेश आणि ओडिशा येथे वेगवेगळ्या घटनांमध्ये जमावाकडून बलात्कार्‍यांची हत्या !

अरुणाचल प्रदेश येथे जमावाकडून बलात्कार्‍यांची हत्या

ईटानगर (अरुणाचल प्रदेश)/भुवनेश्वर (ओडिशा) – अरुणाचल प्रदेश आणि ओडिशा येथे २ वेगवेगळ्या घटनांमध्ये मुली आणि महिला यांच्यावर बलात्कार करून त्यांचे लैंगिक शोषण करणार्‍या वासनांधांची जमावाने हत्या केली.

अरुणाचल प्रदेशमध्ये पोलीस ठाण्यात घुसून बलात्कार्‍याची हत्या

१. अरुणाचल प्रदेशमधील लोअर दिबांग व्हॅलीमध्ये एका बलात्कारी तरुणाला मारहाण करण्यात आली. ही संपूर्ण घटना रोइंग शहरातील पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांच्या उपस्थितीत घडली.

२. या तरुणावर २० हून अधिक मुलींवर बलात्कार आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. तो मुलींच्या वसतीगृहात जाऊन त्यांच्याशी गैरवर्तन करायचा. काही पीडित मुलींनी पोटदुखीची तक्रार केली, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले.

३. पोलिसांनी सांगितले की, आरोपीला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर शेकडो लोकांचा जमाव पोलीस ठाण्यात घुसला आणि त्या तरुणाला बाहेर खेचून मारहाण केली. पोलिसांनी सांगितले की, तरुणाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ओडिशामध्ये पीडित महिलांनी बलात्कार्‍याची हत्या करून त्याचा मृतदेह जंगलात जाळला

ओडिशा राज्यातील गजपती जिल्ह्यात ६० वर्षीय बलात्कार्‍याची हत्या करून त्याचा मृतदेह जाळण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी ८ महिला आणि २ पुरुष, अशा १० जणांना अटक केली. गावापासून अनुमाने २ किमी अंतरावर असलेल्या जंगलाजवळील एका टेकडीवरून पोलिसांनी मृताची हाडे आणि राख जप्त केली. पकडलेल्या सर्व महिला लैंगिक अत्याचाराच्या बळी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विधवेवर बलात्कार केल्यानंतर वासनांधाला मारण्याचा महिलांचा निर्णय

पोलिसांनी सांगितले की, ज्या पुरुषाची हत्या करण्यात आली, तो बर्‍याच काळापासून महिलांचे लैंगिक शोषण करत होता. ३ जून या दिवशी त्याने ५२ वर्षीय विधवेवर बलात्कार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर महिलांनी बैठक घेऊन आरोपीला मारण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी सांगितले होते की, या सर्व महिला आरोपीच्या घरी गेल्या. त्या वेळी तो झोपला होता. त्यानंतर महिलांनी आरोपीवर कुर्‍हाडीने वार करून त्याची हत्या केली आणि त्यानंतर त्याचा मृतदेह जंगलात नेऊन जाळला.

संपादकीय भूमिका

भारतात बलात्कार्‍यांना तात्काळ आणि कठोर शिक्षा मिळत नसल्यामुळेच अनेक ठिकाणी जमावाकडून कायदा हातात घेऊन बलात्कार्‍यांना ठार मारण्याचे प्रकार वाढत आहेत ! याची नोंद घेऊन सरकार बलात्कार्‍यांच्या विरोधात जलद गतीने खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी पावले उचलणार का ?