Shafqat Ali Khan : (म्हणे) ‘डोवाल यांनी खोटेपणा केला असून चुकीची माहिती पसरवली !’ – शफकत अली खान, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते

‘ऑपरेशन सिंदूर’वरून पाकची अजित डोवाल यांच्यावर टीका

वर्तुळात शफकत अली खान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारतीय सैन्याने पाकमधील ९ आतंकवादी ठिकाणे अचूकपणे उद्ध्वस्त केली. विशेष म्हणजे या संघर्षात भारताची कुठलीही हानी झाली नाही. इतकेच नव्हे, तर भारतात एक काचेचा तुकडाही फुटलेला नाही, या भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केलेल्या विधानावर पाकने टीका करत ‘डोवाल यांनी खोटेपणा केला असून चुकीची माहिती पसरवली आहे’, असा आरोप केला.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी सांगितले की, डोवाल यांचे वक्तव्य जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. ही एका उत्तरदायी देशाने आंतरराष्ट्रीय नियमांची केलेली पायमल्ली आहे. डोवाल यांचे वक्तव्य राजनैतिक वर्तनाच्या निकषांचेही उल्लंघन करते. भारताने अशा सैनिकी कारवाईचे केलेले गौरवगान संयुक्त राष्ट्रांच्या सनदांचे गंभीर उल्लंघन आहे. भारताने ज्या ठिकाणांना लक्ष्य केले, ती ठिकाणे सामान्य नागरिकांची वस्ती असलेली क्षेत्रे होती आणि त्यामुळे निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. भारताच्या या आक्रमक भूमिकेकडे आंतरराष्ट्रीय समुदायाने गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे. शाश्वत शांततेचा मार्ग संवाद, परस्पर आदर आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन, यांमध्येच आहे.