(म्हणे) ‘भारताला बळजोरीने लोकांना आमच्या देशात पाठवू देणार नाही !’ – Bangladesh Home Minister

बांगलादेशाचे गृहमंत्री सलाहुद्दीन अहमद यांचे भारतद्वेषी विधान

बांगलादेशाचे गृहमंत्री सलाहुद्दीन अहमद

ढाक (बांगलादेश) – कोणत्याही व्यक्तीला बेकायदेशीरपणे ढकलून (‘पुश-इन’द्वारे) बांगलादेशात प्रवेश करण्याची अनुमती देण्यात आलेली नाही. ‘बॉर्डर गार्ड बांगलादेश’ने स्थानिक लोकांच्या साहाय्याने आतापर्यंत असे सर्व प्रयत्न यशस्वीरित्या हाणून पाडले आहेत. काही लोक अवैधपणे देशात पोचले होते; परंतु अधिकार्‍यांनी त्या प्रकरणांमध्ये कारवाई केली आहे, अशी माहिती बांगलादेशाचे गृहमंत्री सलाहुद्दीन अहमद यांनी दिली. ढाका येथील पिलखाना येथील बॉर्डर गार्ड बांगलादेशाच्या मुख्यालयाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. त्यांनी हे विधान भारताच्या संदर्भात केले आहे. भारताकडून बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात कडक कारवाई केली जात आहे. भारतीय सीमेवरून बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवले जात आहे आणि बॉर्डर गार्ड बांगलादेश त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे.

(म्हणे) ‘भारताने आम्हाला सूची द्यावी !’

गृहमंत्री अहमद पुढे म्हणाले की, आमचे सरकार बंगालच्या नव्याने निवडून आलेल्या सरकारच्या ‘राजकीय हालचालीं’ना उत्तर देण्याऐवजी या सूत्रावर भारताच्या केंद्र सरकारशी चर्चा करेल. जर कोणताही बांगलादेशी नागरिक भारतात रहात असेल, तर भारतीय अधिकार्‍यांनी ठरलेल्या प्रक्रियेनुसार परराष्ट्र मंत्रालयाद्वारे त्यांची सूची दिली पाहिजे. आम्ही नागरिकत्वाची पडताळणी करू. जर दावा योग्य आढळला, तर आम्ही त्या व्यक्तीला योग्य कायदेशीर प्रक्रियेद्वारे परत आणू. आम्ही कुणालाही इतर कोणत्याही मार्गाने आत येऊ देणार नाही.

भारताने सूची देऊनही कारवाई नाही !

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने नुकतेच म्हटले होते की, भारताने २ सहस्र ६८० हून अधिक घुसखोर नागरिकांची एक सूची बांगलादेशाला सोपवली आहे; परंतु बांगलादेश सरकारने अद्याप त्यांची ओळख पटवलेली नाही. अनेक प्रकरणांमध्ये पडताळणीची प्रक्रिया ५ वर्षांहून अधिक काळापासून प्रलंबित आहे. द्विपक्षीय करारांच्या आधारे या स्थलांतरितांच्या मायदेशी परतण्याच्या प्रक्रियेला सुरळीतपणे पूर्ण करता यावे, यासाठी बांगलादेशाने त्यांच्या राष्ट्रीयत्वाच्या पडताळणीला गती द्यावी, असे आवाहन मंत्रालयाने केले आहे.

संपादकीय भूमिका

भारतात घुसखोरी करणार्‍या स्वतःच्या देशांच्या नागरिकांना न रोखता वर भारताला धमकावणार्‍या बांगलादेशाला भारताने कठोर शब्दांच प्रत्युत्तर दिले पाहिजे !