संबंधित अधिकार्‍यांवर भारतीय न्याय संहितेप्रमाणे कठोर कारवाई करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

श्री तुळजाभवानी मंदिरातील प्राचीन ब्रह्मदेवाची मूर्ती भंग केल्याच्या प्रकरणी निवेदन देऊनही अद्याप कोणतीही कारवाई नाही !

तहसीलदार अरविंद बोळंगे यांना निवेदन देतांना मंदिर महासंघाचे पदाधिकारी आणि संत-महंत

निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या…

१. संबंधित उत्तरदायी अधिकार्‍यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे.

२. भविष्यात मंदिरातील कोणत्याही प्रकारच्या स्थलांतर, जीर्णोद्धार, पुनर्स्थापना किंवा तत्सम धार्मिक आणि ऐतिहासिक कामकाज केवळ अन् केवळ स्थानिक जाणकार नागरिकांच्या (भाविक प्रतिनिधींच्या) उपस्थितीतच पार पाडण्यात यावे. त्यामुळे पारदर्शकता राहील आणि भाविकांच्या श्रद्धेला धक्का बसणार नाही.

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – श्री तुळजाभवानी मंदिरातील प्रत्येक मूर्ती आणि वास्तू धार्मिक अन् ऐतिहासिक दृष्टीने अत्यंत मौल्यवान आहेत. १४ मे २०२५ या दिवशी श्री तुळजाभवानी मंदिरामधील उपदेवता श्री ब्रह्मदेवांची प्राचीन मूर्ती प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मूळ ठिकाणाहून स्थलांतराच्या वेळी भंग पावल्याची गंभीर घटना घडली आहे. यामुळे सर्व भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी निवेदन देऊनही कोणतीच कारवाई झालेली नाही. या घटनेस उत्तरदायी असलेल्या अधिकार्‍यांवर भारतीय न्याय संहितेप्रमाणे कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले, हे निवेदन तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी स्वीकारले.

या वेळी ‘दशावतार मठा’चे महंत मावजीनाथ महाराज, ‘सोमवार गिरी मठा’चे महंत इच्छागिरी महाराज, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट, ‘तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळा’चे अध्यक्ष श्री. अमरराजे कदम, ‘पाळीकरी पुजारी संघटने’चे माजी अध्यक्ष किशोर गंगणे, ‘उपाध्ये पुजारी मंडळा’चे अध्यक्ष श्री. अनंत कोंडो, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी बोधले, महाराष्ट्र राज्य भारतीय व्यवस्था परिवर्तन (निर्माण) चळवळीचे श्री. संजय सोनवणे, महाराष्ट्र मंदिर महासंघ जिल्हा संघटक श्री. विनोद रसाळ, श्री. सर्वोत्तम जेवळीकर, तसेच सर्वश्री अमोल कुतवळ, शाम पवार, बाळासाहेब शामराज, परीक्षित साळुंखे, संजय मैंदंर्गे, श्रीराम अपसिंगकर, सुदर्शन वाघमारे, नागेश शास्त्री अंबुलगे, तानाजी कदम, महेश चोपदार आदी उपस्थित होते.

‘निवेदनातील मागण्यांवर त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा; अन्यथा आम्हाला महाराष्ट्र राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याविना पर्याय रहाणार नाही’, अशी चेतावणीही महाराष्ट्र मंदिर महासंघाने दिली आहे.

संपादकीय भूमिका

  • अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वत: कारवाई केव्हा करणार ?
  • हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी संवेदनशीलता न दाखवणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाईच हवी !