सावरकरद्रोह्यांवर कारवाईसाठी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा भक्त मंडळा’ चे वर्धा पोलिसांना निवेदन

‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’च्या अधिवेशनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मानहानी करणारी कविता सादर !

जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांना निवेदन देतांना सावरकरप्रेमी

वर्धा, ११ जून (वार्ता.) – मुंबई उच्च न्यायालयाने कोणत्याही प्रकारे देशातील राष्ट्रपुरुषांची मानहानी करणे, हा दंडनीय अपराध समजला जाईल, असा निर्णय दिला आहे. असे असतांनाही १७ फेब्रुवारी २०२५ या दिवशी ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’च्या (‘एस्.एफ्.आय.’च्या) देहली येथील अधिवेशनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची मानहानी करणारी कविता वाद्यवृंदासह सादर करण्यात आली. त्यानंतर त्याची चित्रफीत सिद्ध करून ती ‘इंस्टाग्राम’सह अन्य सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आली. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नि:स्वार्थपणे केवळ भारतियांसमोरच नव्हे, तर जागासमोर राष्ट्र्रभक्तीचा सर्वोच्च आदर्श ठेवला, त्यांच्या मानहानीचा असा प्रयत्न होणे, निषेधार्थ आहे. त्यामुळे सावरकरांवर मानहानीकारक कविता लिहिणारा कवी, ती गाणारा गायक आणि त्याला साथ देणारे वाद्यवृंद या सर्वांवर प्रथमदर्शनी माहिती अहवाल (एफ्.आय.आर.) नोंदवून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वर्धा येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा भक्त मंडळा’च्या वतीने येथील जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी विश्व हिंदु परिषदेचे मंत्री अनिल कावळे, अतुल देशपांडे, स्वातंत्र्यवीर सावरकर समितीचे अध्यक्ष श्याम देशपांडे, संस्कार भारतीचे जिल्हा सचिव मकरंद उमाळकर, विवेक विचार मंचचे प्रांत संयोजक अतुल शेंडे, भाजपचे श्रीधर देशमुख, विश्व हिंदी विद्यापिठाचे डॉ. अश्विन कुमार, शुभम चिखलकर, पुरोहित मंडळाचे सचिन लिखितकर, रवी सातदेवे, अनिल पाखोडे, कुमार लिखितकर आदी सावरकरप्रेमी उपस्थित होते.

स्वातंत्र्यवीर सावरकरांची मानहानी करणार्‍यांवर कठोर कारवाई न केल्यास आंदोलन करू ! – स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा समिती, वर्धा

‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’ कडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मानहानी करणारी चित्रफीत सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे. हा सामाजिक गुन्हा आहे. यातून सामाजिक स्तरावर तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. या घटनेचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा समिती’ने निषेध नोंदवला असून ही चित्रफीत बनवणार्‍यांच्या विरोधात कठोर करावाई करावी, अशी मागणी केली आहे. या घटनेकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन उभारण्यात येईल, अशी चेतावणी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा समिती वर्धा’चे अध्यक्ष श्री. श्याम देशपांडे यांनी पत्रकाद्वारे दिली.