AC Locals In Mumbai : भाडेवाढ न करता वातानुकूलित रेल्वेगाड्या आणणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

राज्य आणि केंद्र सरकार यातून मार्ग काढेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंब्रा (जिल्हा ठाणे) : या रेल्वे स्थानकाजवळ ९ जून या दिवशी सकाळी रेल्वेमधून प्रवासी पडल्याच्या घटनेनंतर रेल्वेमंत्री श्री. अश्‍विनी वैष्णव माझ्यासमवेत अडीच घंटा चर्चा करत होते. वातानुकुलित गाड्या द्यायच्या आणि त्या भाडेवाढ न करता द्यायच्या, असे नियोजन (‘मास्टर प्लान’) सरकारकडे आहे; मात्र कालच्या घटनेतून आपल्याला शिकावे लागेल. राज्य आणि केंद्र सरकार यासाठी प्रयत्न करून मार्ग काढेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. शासकीय कार्यालयांच्या वेळा मागे-पुढे करण्याची अनुमती आहे. खासगी कार्यालयांच्या संदर्भात अडचण येते. सार्वजनिक वाहतुकीची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.

मेट्रोचे जाळे न झाल्याने रेल्वे स्थानके मोठ्या गर्दीची ठिकाणे झाली !

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सरकारला कळते की, गाड्यांना दारे केली, तर वायूविजनाची (‘व्हेंटिलेशन’ची) सोय करावी लागेल. तेवढे संरचनात्मक (‘डिझाईन’) डोके सरकारकडे आहे. उपनगरांतील सर्वाधिक वाढ मोदी सरकारच्या काळात झाली आहे. मेट्रोचे जाळे न झाल्याने रेल्वे स्थानके मोठ्या गर्दीची ठिकाणे झाली आहेत.

असंवेदनशील रेल्वेमंत्री !

रेल्वेमंत्री श्री. अश्‍विनी वैष्णव

एरवी समाजमाध्यमांवर सक्रीय असलेले केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्‍विनी वैष्णव यांनी या अपघाताच्या संदर्भात काहीही म्हटले नाही. त्यांच्याकडून मृत प्रवाशांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली नाही. त्यांनी मृतांचे नातेवाईक, घायाळ यांना काही साहाय्य मिळण्याविषयीही माहिती दिलेली नाही, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. (मुंबईच्या संदर्भात सर्वपक्षीय रेल्वेमंत्र्यांची भूमिका नेहमी अशीच राहिलेली आहे. याच्या संदर्भात मुंबईकरांनी पक्षभेद विसरून सरकारवर दबाव निर्माण करणे आता आवश्यक झाले आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

अपघात झाल्यानंतर आणि काही जणांचा मृत्यू झाल्यानंतरच सरकार, प्रशासन का जागे होते ? ते आधीच उपाययोजना का काढत नाही ? असे प्रश्‍न जनतेच्या मनात नेहमीच येतात !