CDS Anil Chauhan On Operation Sindoor : युद्धात हानीपेक्षा निकाल महत्त्वाचा असतो ! – संरक्षणदल प्रमुख जनरल अनिल चौहान

संरक्षणदल प्रमुख जनरल अनिल चौहान

पुणे – सैन्य म्हणून आम्हाला हानी आणि अपयश यांचा त्रास होत नाही. आपण आपल्या चुका समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या सुधारल्या पाहिजेत. युद्धात हानीपेक्षा निकाल महत्त्वाचा असतो, असे विधान भारताच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख (सीडीएस् – चीफ ऑफ डिसेंफ स्टाफ) जनरल अनिल चौहान यांनी केले. ते पुणे विद्यापिठात ‘भविष्यातील युद्ध आणि युद्धकला’ या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. ‘पाकिस्तानने भारतात आतंकवादी कारवाया करता कामा नये. ‘ऑपरेशन सिंदूर’मागचा मूळ विचार पाकिस्तानमधून होणारा सरकारपुरस्कृत आतंकवाद थांबवणे, हा होता’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अनिल चौहान यांनी मांडलेली सूत्रे –

१. पहलगाममध्ये जे घडले ते अमानुष होते. डोळ्यांदेखत कुटुंबातील सदस्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांना धर्माच्या नावाखाली मारण्यात आले. भारत सर्वाधिक आतंकवादी कृत्यांचा बळी ठरला आहे. आतापर्यंत जवळपास २० सहस्र लोक आतंकवादी आक्रमणात मारले गेले आहेत. (असे असतांनाही भारताने गेल्या ३५ वर्षांत हा आतंकवाद मुळासह नष्ट करण्यासाठी काहीही केले नाही, हे आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक)

२. भारत आतंकवादाच्या छायेत रहाणार नाही आणि आण्विक धमकीला बळी पडणार नाहीत. दोन्ही राष्ट्रांनी (भारत आणि पाकिस्तान) वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे यात धोका होता, हे स्पष्ट आहे. संघर्षाच्या वेळी  नेहमीच जोखीम असते; पण तुम्ही जोखीम घेतली नाही, तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही, असे म्हटले जाते.

३. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे युद्ध रणनीतीचे एक उदाहरण होते. याच काळात युद्ध आणि राजकारण समांतर पातळीवर चालू होते.

४. आतंकवादी तळांना भारताकडून लक्ष्य केल्यानंतर ५ मिनिटांनी पाकिस्तानला याची माहिती देण्यात आली. पाकला दूरभाष दूरभाष करून ‘जर तुम्ही प्रतिआक्रमण केले, तर पुढच्या वेळी याहून मोठ्या क्षमतेने उत्तर देऊ. आमच्याकडे पाकिस्तानपेक्षा कित्येक पट धोकादायक शस्त्रे आहेत,’ असे बजावले. भारताचे लक्ष्य केवळ आतंकवाद्यांना संपवणे, इतकेच होते.

५. भारताने पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे यांची आक्रमणे अयशस्वी केली. आम्हाला ठाऊक होते, आमच्याकडे उत्तम ड्रोनविरोधी यंत्रणा आहे; परंतु आपली जेवढी क्षमता आहे, तेवढी युद्धाच्या मैदानात वापरण्यात आलीच नाही.

६. आजचे युद्ध केवळ पारंपरिक शक्तीच्या वापरापुरते मर्यादित नाही, तर ते विविध राजनैतिक, माहितीपर, सैनिकी आणि आर्थिक साधने यांद्वारे राजकीय उद्दिष्टे साध्य करण्याची प्रक्रिया आहे.