संपादकीय : ‘राफेल’ पडल्याचे रडगाणे !

‘सी.डी.एस्.’ जनरल अनिल चौहान

भारताचे तिन्ही संरक्षणदलांचे प्रमुख अर्थात् ‘सी.डी.एस्.’ जनरल अनिल चौहान यांनी सिंगापूर येथे आयोजित केलेल्या ‘शांग्री ला सिक्युरिटी डायलॉग’ येथे ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी केलेल्या विधानामुळे भारतात गदारोळ माजला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारताने लढाऊ विमाने गमावली’, अशी स्वीकृती त्यांनी दिली आहे. ‘एकूण किती विमाने गमावली’, ‘ती राफेल होती कि अन्य कुठली ?’, याचा त्यांनी खुलासा केलेला नाही. असे असले, तरी त्यांच्या या वक्तव्यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशामुळे बिळात जाऊन लपलेले काँग्रेसवाले, बुद्धीजिवी आणि अन्य राष्ट्रघातकी मंडळी यांच्यात १०० हत्तींचे बळ संचारले आहे. त्यांनी विविध माध्यमांचा आधार घेत सरकारवर टीका करण्यास आरंभ केला आहे. ‘भारताने किती विमाने गमावली ?, याची आकडेवारी सरकारने द्यावी’, असा तगादा त्यांनी लावला आहे. काहींनी ‘हे ऑपरेशन राबवतांना ते नियोजनबद्धरित्या केले होते का ?’, याविषयी शंका उपस्थित केली आहे. काही जण तर ‘भारताने ६ ‘राफेल’ गमावली’, असे छाती ठोकून सांगत आहेत. हे अल्प म्हणून कि काय, प्रा. ब्रह्मा चेलानी, प्रवीण स्वामी आदी संरक्षणविषयी तज्ञ मंडळींनी जनरल चौहान यांच्यावरच टीका केली आहे. ‘त्यांनी संबंधित वक्तव्य करण्यासाठी निवडलेले स्थळ आणि वेळ योग्य नव्हती’, असे या सर्वांचे म्हणणे ! जनरल चौहान यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रप्रेमींमध्येही चिंतेचे वातावरण आहे. ‘जनरल चौहान यांनी असे वक्तव्य का केले ?’, ‘याचा जागतिक स्तरावर भारताच्या प्रतिमेवर परिणाम होणार’, आदी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जनरल चौहान यांच्या वक्तव्यांवर सामान्य जनतेने काही टीकाटिपणी करावी, एवढी आपली पात्रता आहे का ? जनरल चौहान ४० वर्षांपेक्षा अधिक काळ सैन्यात सेवारत आहेत. ‘विशिष्ट सेवा मेडल’, ‘अतीविशिष्ट सेवा मेडल’, ‘उत्तम युद्ध सेवा मेडल’ आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी किंवा त्यांना शहाणपण शिकवण्याचे दुःसाहस सामान्यांनी न केलेलेच बरे. ‘कुठे काय बोलायचे किंवा बोलू नये आणि कुठे काय कृती करायला हवी ?’, हे ते नक्कीच जाणत असतील. सध्या एक प्रवाह असाही आहे की, जनरल चौहान यांनी असे वक्तव्य करण्यामागे खेळीही असू शकते. असो. यामुळे विदेशी प्रसारमाध्यमे भलतीच जोशात आली आहेत. जनरल चौहान यांना विमाने पडल्याचे सूत्र भारतीय प्रसारमाध्यमांना नव्हे, तर विदेशी प्रसारमाध्यमांना सांगावेसे वाटले. यावरून म्हणे भारतीय प्रसारमाध्यमांचा दर्जा लक्षात येतो, असे विदेशी प्रसारमाध्यमांचे म्हणणे ! एकंदरीत जनरल चौहान यांच्या वक्तव्यावरून काही तरी खुसपट काढून विजयी भारताला पराभूत दाखवण्याचा अश्लाघ्य खेळ भारतद्वेष्ट्यांनी आरंभला आहे. काही राष्ट्रप्रेमी भारतीयही यात वहावत जात आहेत, हे खेदजनक आहे. येथे शत्रूबोध लक्षात घेणे आवश्यक आहे. या युद्धात पाकिस्तान नाकावर आपटला, तरी त्याचे सैन्यप्रमुख असीम मुनीर यांना तेथील लोकांनी डोक्यावर घेतले. एवढेच कशाला, त्यांना ‘फील्ड मार्शल’ हे सैन्यातील सर्वाेच्च पद देऊन बढती देण्यात आली. जगाच्या पाठीवर युद्धात पराभव झाल्यानंतर संबंधित देशाच्या सैन्यप्रमुखाला अशा प्रकारे बढती देण्याचे हे ऐतिहासिक उदाहरण म्हणावे लागेल. जर पाकिस्तान त्याच्या पराभूत सैन्यप्रमुखाचा असा सन्मान करतो, तर ज्यांनी हे युद्ध जिंकण्यात हातभार लावला, त्या भारतीय संरक्षणदलाच्या प्रमुखांविषयी आपल्या भावना कशा हव्यात ? त्यांचा हेतू किंवा कर्तृत्व यांविषयी आपण शंका का घ्यावी ?

युद्धात हानी होणारच !

अमेरिकेला त्याच्या ‘एफ्-१६’, ‘एफ्-३५’ या लढाऊ विमानांचा अतिशय अभिमान आहे. येमेनमधील कोण कुठले हुती आतंकवादी ! त्यांनी कुठलीशी क्षेपणास्त्रे वापरून ही विमाने भुईसपाट केली, तरीही अमेरिका ‘नाक वर’ करून मिळेल त्या व्यासपिठावरून या विमानांचे गुणगान करत असते. चिनी बनावटीचा माल कसा असतो, हे सर्वश्रुत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी या चिनी युद्धसामुग्रीचे भारतीय क्षेपणास्त्रांनी जे वस्त्रहरण केले, ते जगजाहीर आहे. तरीही चीन ‘संरक्षणक्षेत्रात आमच्यासारखे आम्हीच’ असे जगाला सांगून स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. असे असतांना ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारताची विमाने पडली, तर त्यामुळे हिरमोड होण्याचे काय कारण आहे ? हे युद्ध आपण जिंकले आहे; मात्र जगभरातील आपल्या विरोधकांना याचा आस्वाद आपल्याला घेऊ द्यायचा नाही. हे षड्यंत्र लक्षात घेऊन आपण वेळीच सावध होणे आवश्यक आहे.

दुसर्‍या महायुद्धात अमेरिका आणि रशिया यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. असे असतांना ‘अमेरिका आणि रशिया नव्हे, तर जर्मनीने युद्ध जिंकले’, असे आपण म्हणतो का ? मग भारताची ४, ५ अथवा ६ किंवा कितीही विमाने पडली असतील, तर त्यामुळे आपण युद्ध हरलो, असे होते का ? आपण युद्धाला जात आहोत, तर आपण काहीही गमावणार नाही, असे कधी होईल का ? युद्ध म्हटले की संहार, जीवित आणि वित्त हानी ही होणारच; मात्र त्याचा अंतिम लाभ कुणाच्या पदरात पडतो, हे महत्त्वाचे आहे.

स्वातंत्र्यानंतर अनेक दशके ‘भारत गरीब आहे’, ‘देशात अन्नधान्याची वानवा आहे’, असे चित्र विदेशींनी आपल्यासमोर रेखाटले. भारतियांमध्ये निर्माण झालेली ही नकारात्मकता हा त्याचाच परिपाक आहे. आज चित्र काय आहे ? भारत जगातील चौथी अर्थव्यवस्था आहे. आपली अर्थव्यवस्था ही ४ ट्रिलियन डॉलर्सची आहे. आपण पाकप्रमाणे पैशांसाठी भीक मागत फिरत आहोत का ? त्यामुळे युद्धात विमाने गमावली असली, तरी त्यांची कमतरता भरून काढणे किंवा ती परत विकत घेण्याची क्षमता भारतामध्ये नक्कीच आहे. हे युग आपले आहे. त्यामुळे गरिबासारखा नव्हे, तर राजासारखा विचार करायला भारतियांनी शिकायला हवे !

अनेक विजय साजरे करायचे आहेत !

सैन्यदलप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी जगद्गुरु रामभद्राचार्य यांच्याकडून दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून ‘पाकव्याप्त काश्मीर’ मागितले. त्यावर जनरल द्विवेदी यांनी ‘पाकव्याप्त काश्मीर लवकरच परत घेऊ’, असे वचन दिले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही एक झलक होती. भारतीय सैन्य केवळ पाकव्याप्त काश्मीरच नव्हे, तर अक्साई चीनही परत मिळवेल, यात वाद नाही. त्यामुळे भविष्यात आनंदोत्सव साजरे करण्याचे बरेच क्षण भारतियांच्या वाट्याला येणार आहेत. हे लक्षात घेऊन ‘राफेल’ लढाऊ विमाने पडली’, असे रडगाणे गात बसण्यापेक्षा ‘ऑपरेशन सिंदूर’च्या निर्भेळ यशाचा आनंद लुटूया आणि पुढील आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सिद्ध होऊया !

‘ऑपरेशन सिंदूर’विषयी भारतियांच्या मनात हीन भावना निर्माण करून त्यांना विजयाचा आनंद लुटू न देणार्‍या भारतद्वेष्ट्यांचा डाव हाणून पाडा !