Maharashtra ATS Raid : पडघा (ठाणे) येथे आतंकवादविरोधी पथककडून इस्लामिक स्टेटच्या साकिब नाचन याच्या घरावर धाड  

२ वेळा कारागृहातून सुटलेला नाचन इस्लामिक स्टेटच्या महाराष्ट्र प्रदेशाचा प्रमुख

इस्लामिक स्टेटचा आतंकवादी साकिब नाचन

मुंबई – येथे वर्ष २००२-२००३ मध्ये ३ वेळा झालेल्या साखळी बाँबस्फोटांचा मुख्य सूत्रधार आणि २ वेळा शिक्षा भोगून कारागृहातून सुटलेला आणि सध्या इस्लामिक स्टेटच्या महाराष्ट्र प्रदेशाचा प्रमुख साकिब नाचन याच्या घरावर ठाणे जिल्ह्यातील पडघा येथील घरावर आतंकवादविरोधी पथकाने धाड टाकली. नाचन ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’साठी (आय.एस्.आय.एस्.साठी) भारतात जाळे निर्माण करत आहे, असे राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हटले आहे.

१. नाचन इस्लामिक स्टेटचा कथित प्रदेश घोषित केलेल्या भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरात गुप्त शस्त्रप्रशिक्षण देत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती.

२. कारागृहातून सुटल्यानंतर त्याने काही तरुणांना कट्टर विचारसरणीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासमवेत अन्य काही जणांच्या घरावरही धाड टाकण्यात आली.

३. महाराष्ट्रात इस्लामिक स्टेटसाठी लागणारे आर्थिक साहाय्य पुरवण्याचे काम नाचन करत असे.

४. २ जूनला सकाळी पडघा गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा आल्याने गावाला छावणीचे स्वरूप आले.

५. यापूर्वी नाचनचा मुलगा आणि इस्लामिक स्टेटशी संबंधित १६ जणांना, तसेच पुण्यातील एका गंभीर प्रकरणात ४ जणांना या गावातून अटक करण्यात आली होती.

६. यापूर्वी आतंकवादविरोधी पथकाने पडघा, भिवंडी, ठाणे, पुणे आणि बेंगळुरू येथे एकाच वेळी टाकलेल्या धाडीत शस्त्रे, भ्रमणभाष, भ्रमणसंगणक, हार्डडिस्क्स, पैसे आणि हमासचे झेंडे आढळले होते.

कोण आहे साकिब नाचन ?

साकिब नाचन पूर्वी लष्कर-ए-तैयबाचा आतंकवादी होता. वर्ष १९९१ च्या आतंकवादी आक्रमणात त्याला प्रथम अटक झाली होती. त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊनही सर्वाेच्च न्यायालयाने त्याची शिक्षा १० वर्षे एवढी केली. त्यामुळे वर्ष २००१ मध्ये सुटला. त्यानंतर झालेल्या ३ साखळी बाँबस्फोटांत १२ जण गेले आणि १२५ जण घायाळ झाले. त्यानंतर परत त्याला १० वर्षांची शिक्षा झाली. वर्ष २०१७ मध्ये तो परत सुटला. बाँब निर्माण करण्यात तज्ञ आणि २००३ च्या बाँबस्फोटांसाठी बाँब निर्माण करणारा नाचन हा कल्याणमधील बोरिवली भागातून नवीन आतंकवाद्यांची भरती करायचा, त्यांना आर्थिक आणि कायदेशीर साहाय्य करायचा; प्रशिक्षण द्यायचा.

संपादकीय भूमिका

अन्य देशांत गंभीर देशद्रोही कारवाया करणार्‍यांची शिक्षा कधी अल्प केली गेल्याचे ऐकिवात नाही; उलट त्यांना कठोर शिक्षा केली जाते. बाँबस्फोटाचा सूत्रधार असणारा आतंकवादी भारतातील न्यायव्यवस्था आणि कायदे यांच्या कचाट्यातून २ वेळा सुटतो, हे दुर्दैवी होय !