सनातनच्या ग्रंथांसाठी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी लिहिलेल्या आध्यात्मिक प्रस्तावना वाचतांना पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांना जाणवलेले अद्वितीयत्व !

‘सध्या मी सनातनच्या तमिळ भाषेतील ग्रंथांचे पुनर्मुद्रण करण्याच्या दृष्टीने या भाषेतील अनेक मोठ्या ग्रंथांची मराठी भाषेतील ग्रंथांशी पडताळणी करण्याची सेवा करत आहे. मला त्यासाठी संपूर्ण ग्रंथ प्रथम मराठीत आणि नंतर तमिळमध्ये, असे दोनदा वाचावे लागतात. त्यांपैकी काही ग्रंथ मीच आधी भाषांतरित केलेले आहेत. असे असले, तरी आता श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी लिहिलेली आध्यात्मिक प्रस्तावना वाचतांना त्यातील अद्वितीयत्व मला जाणवले आणि माझी पुष्कळ भावजागृती झाली.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी लिहिलेल्या प्रस्तावना भगवद्गीतेप्रमाणे परिपूर्ण आहेत !

अनेक विद्वान असे मानतात की, भगवद्गीता परिपूर्ण आहे. तिच्यात एकही शब्द जोडण्याची किंवा तिच्यातील एकही शब्द गाळण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक शब्दात सखोल आणि व्यापक अर्थ दडला आहे. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी लिहिलेल्या प्रस्तावनांविषयीही मला असेच वाटते.

२. श्रीराम आणि श्रीकृष्ण या अवतारांच्या भाषेप्रमाणे श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी लिहिलेली प्रस्तावना ही देवभाषाच आहे !

(पू.) सौ. उमा रविचंद्रन्

माझी भाची कु. लास्या हिने एकदा मला विचारले, ‘‘श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यासारखे अवतारी पुरुष कोणत्या भाषेत बोलत होते ?’’ तेव्हा मी तिला सांगितले, ‘‘ते संस्कृतमध्ये बोलत होते. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या काळात ती एकमेव वैश्विक दिव्य भाषा होती.’’ लास्याच्या या प्रश्नाने मला ‘त्या वेळच्या अवतारांचे संभाषण कसे असेल ?’, याचा विचार करायला भाग पाडले. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी लिहिलेली प्रस्तावना वाचून मला असे वाटले, ‘ते श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी वापरलेल्या भाषेप्रमाणेच बोलत असतील.’ प्रस्तावनेतील शब्दांच्या अर्थावर अधिक लक्ष न देता ते वाचले, तरी आपल्याला चैतन्य मिळते आणि आपण एका अद्वितीय आनंदाने भारले जातो. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी लिहिलेली प्रस्तावना ही देवभाषाच आहे.

३. प्रस्तावना संपूर्ण ग्रंथाचा सारांश सांगणारी असून अमृतमय आहे !

वेद हे निसर्गतः सनातन आहेत, म्हणजेच ‘नित्य नूतनः इति सनातनः।’, या उक्तीप्रमाणे पूर्वी वाचलेली प्रस्तावना पुन्हा वाचतांना ती प्रथमच वाचल्यासारखे वाटते आणि त्यातून पूर्वीपेक्षा अधिक गूढ अर्थाची जाणीव होते. प्रस्तावनेतील प्रत्येक शब्दाचा ग्रंथाच्या एका प्रकरणात विस्तार होऊ शकतो. त्यांची प्रस्तावना आपल्याला थोडक्यात संपूर्ण ग्रंथाचा सारांश सांगते. ‘जणू ती अमृताने भरलेली आहे’, असे वाटते, उदा. ‘नामजपाचे महत्त्व’ या ग्रंथात त्या म्हणतात, ‘नाम परम अद्वैत अवस्थेकडे नेईल’, हे गहन विधान टप्प्याटप्प्याने पुढे अधिक स्पष्ट केले आहे. ते वाचतांना कलियुगात या जन्मातच अद्वैत अवस्थेत पोचणे शक्य आहे’, याचा आत्मविश्वास वाचकांना नक्कीच वाटेल. नाम आपल्याला प्रेरणा देते, हात धरून मार्गदर्शन करते, आत्मविश्वास निर्माण करते आणि सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे आपल्यात असलेले भावबीज अंकुरित करण्यासाठी साहाय्य करते.’

४. प्रत्येक प्रस्तावना ही त्या त्या ग्रंथाचा मुकूटमणी असून तो आपल्याला परमात्म्याच्या दिव्य चरणांकडे नेतो !

जर प.पू. गुरुदेवांचे ग्रंथ साक्षात् परमात्मास्वरूप असतील, तर श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी लिहिलेल्या प्रस्तावना त्या त्या ग्रंथाचा मुकूटमणी आहेत, म्हणजेच तो भगवंताच्या मस्तकाची शोभा वाढवणारा रत्नजडित मुकूट आहे. हा मुकूट आपल्याला परमात्म्याच्या दिव्य चरणांकडे घेऊन जातो.

५. श्रीदेवीस्वरूप श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ मातृवात्सल्यभावाने आपल्याला साक्षात् श्रीमन्नारायणस्वरूप प.पू. गुरुदेव यांच्याकडे नेत आहेत !

अनेक संतांनी सांगितले आहे, ‘भगवान नारायणापर्यंत पोचण्यासाठी प्रथम ‘थायर (माता) महालक्ष्मी’कडे जावे लागते.’ त्याचप्रमाणे साक्षात् श्रीदेवीचा अवतार असलेल्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ आपल्याला मातृस्नेहाने, मातृवात्सल्यभावाने साक्षात् श्रीमन्नारायणस्वरूप प.पू. गुरुदेवांकडे घेऊन जात आहेत.

‘हे भगवंता, तुझ्या अखंड कृपेमुळेच आम्हाला श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा सत्संग आणि कृपाशीर्वाद मिळत आहे.’

– (पू.) सौ. उमा रविचंद्रन् (सनातनच्या ७० व्या संत, वय ५९ वर्षे), चेन्नई, तमिळनाडू. (२.२.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक