राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य केलेले थोर संत अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मकुंडल्यांमध्ये आढळलेले समान ग्रहयोग !

‘भारत ही संतांची भूमी आहे. ‘अध्यात्मज्ञान’ हे भारताचे सर्वाेत्तम वैशिष्ट्य आहे. भारतात अनेक थोर संतांनी जन्म घेतला. त्यांनी लोकांना ‘आनंदी जीवन कसे जगायचे ?’, हे शिकवले. त्यांपैकी काही संतांनी अध्यात्मप्रसाराच्या कार्यासमवेत राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचेही महान कार्य केले. गेल्या ४०० वर्षांचा विचार केल्यास १७ व्या शतकात समर्थ रामदासस्वामी, १९ व्या शतकात स्वामी विवेकानंद आणि २० व्या शतकात महर्षि अरविंद या संतांनी लोकांना साधना शिकवण्यासह राष्ट्र-धर्मरक्षणाचे मोठे कार्य केले. या संतांप्रमाणेच सध्याच्या २१ व्या शतकात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे राष्ट्र-धर्मरक्षणाचे कार्य करत आहेत. या ४ संतांच्या जन्मकुंडल्यांचा अभ्यास केल्यावर त्यांच्या जन्मकुंडल्यांतील अनेक ग्रहयोगांमध्ये साम्य असल्याचे आम्हाला आढळले. या ४ संतांच्या जन्मकुंडल्यांतील ग्रहयोगांचे विश्लेषण पुढील लेखात केले आहे, तसेच या अभ्यासातून लक्षात आलेली सूत्रे शेवटी दिली आहेत. (भाग १)

१. संतांच्या जन्मकुंडल्यांतील आध्यात्मिक वैशिष्ट्ये दर्शवणारे योग !

१ अ. ईश्वरप्राप्तीची तळमळ

कुंडलीतील प्रथम स्थानावरून ‘व्यक्तीचा कल जीवनात कुठे आहे ? आणि तिला कोणत्या गोष्टीची आंतरिक तळमळ आहे ?’, हे लक्षात येते. कुंडलीत प्रथम स्थानात आध्यात्मिक स्वरूपाचे ग्रह असणे, प्रथम स्थानाचा स्वामी आध्यात्मिक ग्रहांसमवेत असणे, कुंडलीत गुरु, शनि, केतू आदी आध्यात्मिक ग्रह बलवान असणे इत्यादी योग असल्यास व्यक्तीचा कल अध्यात्माकडे असतो.

१ अ १. समर्थ रामदासस्वामी

१ अ १ अ. लहान वयात गृहत्याग करून १२ वर्षे तपःश्चर्या करणे : समर्थ रामदासस्वामी यांच्या कुंडलीत प्रथम स्थानाचा स्वामी ‘बुध’ ग्रह असून त्याची ‘रवि’ आणि ‘गुरु’ या ग्रहांशी युती आहे. ही युती ‘मीन’ या सात्त्विक राशीत आहे. हा योग सात्त्विक अंतःकरण, निर्मळ मन आणि ईश्वरप्राप्तीची तळमळ दर्शवतो. समर्थ रामदासस्वामी लहान असतांना ईश्वराच्या चिंतनात मग्न असत. त्यांनी वयाच्या १२ व्या वर्षी गृहत्याग केला आणि नाशिकजवळ टाकळी येथे १२ वर्षे तपःश्चर्या केली. तपःश्चर्येच्या अंतर्गत त्यांनी व्यायाम, उपासना, ध्यान आणि श्रीरामाची उत्कट भक्ती केली. त्यामुळे त्यांना वयाच्या २४ व्या वर्षी आत्मसाक्षात्कार झाला.

१ अ २. स्वामी विवेकानंद

१ अ २ अ. लहानपणापासून विश्वामागील सत्य जाणून घेण्याची तळमळ असणे : स्वामी विवेकानंद यांच्या कुंडलीत प्रथम स्थानात ‘रवि’ (सूर्य) आहे, तसेच प्रथम स्थानाचा स्वामी ‘गुरु’ असून त्याचा ‘रवि’ आणि ‘मंगळ’ यांच्याशी योग आहे. हा योग तेजस्वी बुद्धीमत्ता आणि जिज्ञासा दर्शवतो. स्वामी विवेकानंद यांना लहानपणापासून विश्वामागील सत्य जाणून घेण्याची तळमळ होती. त्यांनी युवावस्थेत असतांना भारतीय आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. त्यांनी आधुनिक विचारप्रणालींचाही मागोवा घेतला; पण त्यातून त्यांना समाधान लाभले नाही. शेवटी ते श्री रामकृष्ण परमहंस यांच्या सान्निध्यात आल्यानंतरच त्यांनी सत्याची प्रत्यक्ष अनुभूती घेतली.

१ अ ३. महर्षि अरविंद

श्री. राज कर्वे

१ अ ३ अ. कारागृहात असतांना दिव्य आध्यात्मिक अनुभूती येऊन ईश्वरप्राप्तीची तळमळ पुष्कळ वाढणे : महर्षि अरविंद यांच्या कुंडलीत प्रथम स्थानात ‘मंगळ’, ‘गुरु’ आणि ‘हर्षल’ हे ग्रह आहेत, तसेच ‘रवि’ आणि ‘गुरु’ यांची युती आहे. हा योग तेजस्वी बुद्धी, उच्च आध्यात्मिक अनुभव आणि ईश्वरप्राप्तीची तळमळ दर्शवतो. महर्षि अरविंद यांच्यावर इंग्रजी संस्कृतीचे संस्कार व्हावेत आणि त्यांनी इंग्रजांच्या राजवटीत उच्चपदावरील नोकरी करावी, म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी इंग्लंडला नेले; परंतु महर्षि अरविंद यांना इंग्रजी संस्कृती रुचली नाही, उलट भारतीय संस्कृतीकडे ते आकर्षित झाले. भारतात आल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला. एका प्रकरणामध्ये इंग्रजांनी त्यांना कारावास घडवला; पण हा कारावास महर्षि अरविंद यांचे जीवन पालटणारा ठरला. कारागृहात असतांना त्यांना दिव्य आध्यात्मिक अनुभूती आल्या. त्यामुळे त्यांची ईश्वरप्राप्तीची तळमळ पुष्कळ वाढली. त्यांनी पुढील आयुष्य ‘विश्वामागील सत्य जाणणे आणि ते समाजापर्यंत पोचवणे’ यासाठी समर्पित केले.

१ अ ४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१ अ ४ अ. जिज्ञासेमुळे भौतिक विज्ञानापेक्षा सूक्ष्म आणि व्यापक असे ‘अध्यात्मशास्त्र’ जाणून घेण्याची ओढ लागणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कुंडलीत प्रथम स्थानाचा स्वामी ‘बुध’ याची ‘शनि’ आणि ‘हर्षल’ यांच्याशी युती आहे. हा योग जिज्ञासा, संशोधकवृत्ती आणि ईश्वरप्राप्तीची तळमळ दर्शवतो. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मानसोपचारतज्ञ होते. वयाच्या ४१ व्या वर्षापर्यंत त्यांचा अध्यात्माशी संबंध नव्हता; परंतु त्यांच्याकडे येणार्‍या रुग्णांपैकी काही रुग्ण औषधोपचाराने नव्हे, तर संतांनी सांगितलेले आध्यात्मिक उपाय केल्याने बरे झाल्याचे त्यांना आढळले. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांमधील ‘जिज्ञासा’ या गुणामुळे त्यांनी असे होण्यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना भौतिक विज्ञानापेक्षा सूक्ष्म आणि व्यापक स्वरूप असणार्‍या ‘अध्यात्मशास्त्रा’ची माहिती झाली. त्यांना अध्यात्मशास्त्र जाणून घेण्याची ओढ लागली. अध्यात्माचा अभ्यास करण्याच्या सुमारास त्यांना गुरुप्राप्ती झाली आणि अल्पावधीतच त्यांनी आध्यात्मिक उन्नती साध्य केली.

१ आ. गुरुकृपा आणि गुरुप्राप्ती

कुंडलीतील ‘नवम’ स्थान हे गुरूंशी संबंधित आहे. नवम स्थानात शुभ ग्रह असणे, नवम स्थानाचा स्वामी शुभस्थितीत आणि मित्रग्रहांसमवेत असणे, ‘गुरु’ ग्रहाची स्थिती शुभ असणे इत्यादी काही योग पूर्वजन्मांच्या साधनेमुळे गुरुकृपेचा लाभ दर्शवतात. गुरुकृपेमुळे गुरुप्राप्ती झाल्यानंतर साधकाचा अध्यात्मातील प्रवास योग्य दिशेने आणि अल्प काळात होतो.

१ आ १. समर्थ रामदासस्वामी

१ आ १ अ. समर्थ रामदासस्वामी यांचे गुरु प्रभु श्रीरामच असणे : समर्थ रामदासस्वामी यांच्या कुंडलीत रवि, बुध आणि गुरु यांची ‘मीन’ राशीत युती आहे, तसेच ‘गुरु’ आणि ‘चंद्र’ यांच्यात शुभयोग आहे. हे योग पूर्वजन्मांची साधना आणि गुरुकृपा दर्शवतात. समर्थांचे गुरु साक्षात् प्रभु श्रीरामच होते. समर्थ खडतर तपश्चर्या करत असतांना श्रीरामांनी सीता आणि लक्ष्मण यांच्यासह त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले होते. समर्थांना प्रभु श्रीराम सूक्ष्मातून मार्गदर्शन करत असत.

१ आ २. स्वामी विवेकानंद

१ आ २ अ. श्री रामकृष्ण परमहंस यांच्या शिकवणीमुळे स्वामी विवेकानंद यांना ईश्वरी तत्त्वाची अनुभूती घेता येणे : स्वामी विवेकानंद यांच्या कुंडलीत नवम स्थानाचा स्वामी ‘रवी’ याचा ‘गुरु’ आणि ‘मंगळ’ या मित्रग्रहांशी योग आहे. हा योग गुरुकृपा दर्शवतो. श्री रामकृष्ण परमहंस यांची भेट झाल्यावर स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली. स्वामीजी अगोदर बुद्धीवाद आणि तर्क यांना महत्त्व देत असत; पण श्री रामकृष्ण परमहंस यांनी त्यांना ईश्वरी अस्तित्वाची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यास शिकवले. त्यामुळे स्वामीजींना ईश्वराची दिव्यता, व्यापकता, प्रेममयता आणि पूर्णता यांचा अनुभव आला. श्री रामकृष्ण परमहंस यांच्या शेवटच्या आजारपणांत स्वामी विवेकानंद त्यांच्या सेवेत होते. त्या सुमारास त्यांनी निर्विकल्प समाधी अनुभवली.

१ आ ३. महर्षि अरविंद

१ आ ३ अ. कारावासात असतांना भगवान श्रीकृष्ण आणि स्वामी विवेकानंद मार्गदर्शन करत असल्याची अनुभूती येणे : महर्षि अरविंद यांच्या कुंडलीत ‘मंगळ’, ‘गुरु’ आणि ‘हर्षल’ यांची प्रथम स्थानात युती आहे, तसेच ‘रवि’ अन् ‘गुरु’ यांची युती आहे. हा योग दैवी आशीर्वाद दर्शवतो. महर्षि अरविंद कारावासात असतांना त्यांना ‘भगवान श्रीकृष्ण आणि स्वामी विवेकानंद मार्गदर्शन करत आहेत’, अशी अनुभूती येई. भगवान श्रीकृष्ण आणि स्वामी विवेकानंद यांचे शब्द त्यांना स्पष्ट ऐकू येत. या मार्गदर्शनामुळे महर्षींना ‘जीवनाची सार्थकता कशात आहे ?’, ते कळले आणि ते अधिक सूक्ष्म, व्यापक अन् दूरगामी परिणाम करणार्‍या आध्यात्मिक कार्याकडे वळले.

१ आ ४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१ आ ४ अ. गुरूंना तन, मन आणि धन समर्पित केल्यामुळे गुरूंनी ‘ज्ञान, भक्ती अन् वैराग्य’ यांचा आशीर्वाद देणे : सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कुंडलीत प्रथम स्थानाचा स्वामी ‘बुध’ आणि नवम स्थानाचा स्वामी ‘शनि’ यांची १२ व्या (मोक्ष) स्थानात युती आहे. हा योग पूर्वजन्मांची साधना आणि गुरुकृपा दर्शवतो. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना मध्यप्रदेशमधील इंदूर येथील थोर संत प.पू. भक्तराज महाराज हे गुरु म्हणून लाभले. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी त्यांच्या गुरूंच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करून त्यांना तन, मन आणि धन समर्पित केले. त्यामुळे प.पू. भक्तराज महाराजांनी त्यांना ‘ज्ञान, भक्ती आणि वैराग्य’ यांचा दुर्मिळ आशीर्वाद दिला. प.पू. भक्तराज महाराज यांनी सांगितल्यानुसार सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी भारतात आणि विदेशात अध्यात्मप्रसाराचे कार्य चालू केले.

– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१४.४.२०२५) (क्रमशः)

याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/913657.html