भारताच्या विजयासाठी गोव्यात शतचंडी यज्ञाचे आयोजन ! – सनातन संस्था

  • ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’नंतर दुसर्‍याच दिवशी होणार यज्ञ

  • यज्ञ सर्व नागरिकांसाठी खुला; देश-विदेशातील नागरिक सहभागी होणार

फोंडा (गोवा) : सध्या चालू असलेल्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताचा विजय व्हावा, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या दुसर्‍याच दिवशी, म्हणजे २० ते २२ मे २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत २५ पुरोहितांद्वारे शतचंडी यज्ञ करण्यात येणार आहे. हा यज्ञ सर्व नागरिकांसाठी खुला असून यात देश-विदेशातील नागरिक सहभागी होणार आहेत, अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

फर्मागुडी, फोंडा गोवा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर सनातन राष्ट्राचा शंखनाद करण्यासाठी १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत महोत्सव होणार आहे. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी शतचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,

१. २० मेच्या दुपारी ४ ते रात्री ८; २१ मेच्या सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० आणि दुपारी ४ ते रात्री ८, तर २२ मेच्या सकाळी ८.३० ते दुपारी १.३० या वेळेत हा शतचंडी यज्ञ होणार आहे.

२. या यज्ञात सहभागी होणारे लोक भारताच्या विजयासाठी प्रार्थना करणार आहेत. देवभूमी, तपोभूमी, अवतारभूमी आणि पृथ्वीवरील एकमेव सनातन राष्ट्र असलेल्या भारताच्या रक्षणासाठी अन् विजयासाठी होणार्‍या शतचंडी यज्ञात सप्तशतीचा सामूहिक पाठ, यज्ञविधी, आहुती आणि पूर्णाहूती आदी असणार आहे.

३. या यज्ञाआधी १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त राष्ट्र-धर्म आणि हिंदु समाजरक्षणासंबंधी महत्त्वपूर्ण प्रतिष्ठिंचे विचारमंथन, संतसभा आणि अन्य जागृतीपर कार्यक्रम होणार आहेत.