संपादकीय : आम्ही भारतीय सैन्याच्या पाठीशी !

 

पहलगाम येथे धर्म विचारून केलेल्या आतंकवादी आक्रमणाचा सूड भारत ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून घेत आहे. भारताने आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकने स्वतःच्या सैनिकांची हानी झाल्याप्रमाणे चवताळून आणि आततायी कृती करून भारतावर पुन्हा वार केला. भारतही पाकच्या प्रत्येक आक्रमणाला ‘जशास तसे’ उत्तर देऊन ठामपणे सीमेवर उभा आहे. भारतीय सैन्याच्या या रोखठोक कारवायांमुळे देशप्रेमी भारतियांना भारतीय सैन्य आणि भारत सरकार यांच्याविषयी अभिमान वाटत आहे. ‘स्वातंत्र्यापासून गेली अनेक दशके चालू असलेल्या भारत-पाक संघर्षाचा एकदाचा निकाल लागायलाच हवा’, अशी राष्ट्रप्रेमी भारतियांची अपेक्षा आहे. त्यासाठीच राष्ट्रप्रेमी नागरिक सैन्य आणि सरकार यांना आपापल्या स्तरावर पाठिंबा देत आहे.

राष्ट्रप्रेमी भारतीय त्यांच्या सामाजिक माध्यमांवरून सैन्याच्या कारवायांविषयी अभिमान व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे शांतीची मागणी करणार्‍यांच्या लिखाणालाही उधाण आले आहे. पहलगाम आक्रमणानंतर भारताने त्वरित कृती करत पाक सरकार, तेथील वृत्तवाहिन्या यांची सामाजिक माध्यमे यांचे भारतातील प्रसारण रोखले. आतापर्यंत साम्यवादी गटात असलेल्या आणि काळानुसार भारतप्रेमी झालेल्या भारतातील वृत्तवाहिन्यांनाही सैन्य कारवाईचे थेट प्रक्षेपण करण्यापासून रोखले. त्यामुळे भारतियांच्या मनात वैचारिक गोंधळ निर्माण करणार्‍या कोणत्याही घटना पोचू शकत नाहीत, हे लक्षात आल्याने भारतातील सामाजिक माध्यमांवर सक्रीय असलेल्यांची वळवळ वाढली आहे. भारताला शांतीचे संदेश देणारे पहलगाम आतंकवादी आक्रमणानंतर ज्या बिळात लपले होते, त्यांच्या नाड्या आवळल्या गेल्याने आता शेवटचा सामाजिक माध्यमांचा पर्याय वापरायला आरंभ झाला आहे. प्रथमदर्शी देशप्रेमी वाटणार्‍यांना काहींना काही दिवसांनी सहिष्णुतेचा पुळका यायला लागेल आणि शांतीप्रस्ताव पुढे येऊ लागतील, पुरस्कारवापसीही होईल, भारतीय सैन्याच्या कृतींवर आक्षेप नोंदवला जाईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला लक्ष्य करण्यात कोणतीही कसूर सोडली जाणार नाही, असे होण्यासाठी कोणताही मार्ग अवलंबला जाईल, हे निश्चित ! आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी याचा आरंभ केव्हाच केला आहे.

भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी (क्रेडिट: एक्स/स्क्रीनशॉट)

ब्रिटिश वाहिनी ‘स्काय न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना पाकिस्तानने आतंकवाद्यांना दिलेल्या आश्रयाचा पुरावा सादर केला आहे. पाकिस्तान केवळ आतंकवाद्यांच्या मागे उभा नाही, तर त्यांना आश्रय आणि राज्य सन्मानही देतो, हे दाखवणारे पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी आतंकवादी हाफिज अब्दुल रौफच्या मागे उभे असल्याचे छायाचित्र दाखवले. अमेरिकेने आतंकवादी घोषित केलेला हाफिज अब्दुल रौफ हा जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझहरचा भाऊ आहे. भारताच्या आतंकवादाविरुद्धच्या पहिल्याच प्रयत्नात पाकची बाजू उचलून धरणार्‍या अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांची पोलखोल भारतीय करत आहेत. साम्यवाद्यांचा भारताला लक्ष्य करण्याचा कृती आराखडा राष्ट्रप्रेमी सैन्य, सरकार आणि नागरिक जाणून आहेत; म्हणूनच त्याविषयीची गेल्या १० वर्षांत काही प्रमाणात का होईना केलेली सैनिकी, राजकीय आणि नागरिक जागृती आदी पूर्वसिद्धता पहायला मिळत आहे. आतापर्यंतच्या भारताने केलेल्या शत्रूराष्ट्रांच्या संदर्भातील लढायांमध्ये सैन्य स्वायत्ततेचा अभाव, अपुरी सिद्धता, योग्य नेतृत्त्वाचा अभाव, चुकीची आकलनक्षमता यांमुळे भारताची हानी झाली आहे. स्वातंत्र्याच्या वेळी प्राथमिक प्रतिसादात विलंब झाल्याने म्हणजे भारत सरकारने सैन्य पाठवण्याचा निर्णय विलंबाने घेतल्याने ‘पाकपुरस्कृत काश्मीर’ या नावाने पाकिस्तानकडे काश्मीरचा काही भाग कायमचा गेला. ज्या युद्धांमध्ये सैन्याने विजय मिळवला, त्या वेळी आड आलेल्या सहिष्णुतेमुळे, जागतिक दबावामुळे करावा लागलेल्या ‘शिमला करारा’सारख्या करारांमुळे त्याचा भारताला म्हणावा तसा विजयाचा लाभ झाला नाही. आतापर्यंत भारताने प्रत्येकवेळी ‘जाऊ दे, उगाच वाद नको’; म्हणून शत्रूराष्ट्रांच्या संदर्भात ज्या ज्या कृती केल्या, त्यामुळे शत्रूराष्ट्रे भारताच्या मानगुटीवर बसली आणि भारताला प्रत्येक स्तरावर खाली ओढण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला. त्यात त्यांना यशही मिळाले. वर्ष १९९९ मध्ये आयसी-८१४ विमान अपहरण झाले. ‘जैश-ए-महंमद’चा प्रमुख मौलाना मसूद अझहर, अहमद उमर शेख आणि मुश्ताक अहमद झरगर या आतंकवाद्यांना सोडण्यात आले होते, तसेच छोट्या मोठ्या अनेक आतंकवादी कारवायांमध्ये भारताने २ पावले मागे टाकून आतंकवाद्यांची सुटका केली होती; आता मात्र भारताने कच खाऊन चालणार नाही. भारतातील गौरवशाली राजांच्या पराक्रमांचा आदर्श बाळगत भारत आज पाकच्या विरोधात ‘जशास तसे’ उत्तर देत आहे, तेच धोरण कायमस्वरूपी राबवले पाहिजे, मग यात पाकला साहाय्य करणार्‍यांचाही बंदोबस्त करावा लागला, तरी कोणतीही तडजोड केली जाऊ नये, अशीच राष्ट्रप्रेमी भारतियांची अपेक्षा आहे.

युद्ध हेच वीरतेचे प्रमाण आणि शांतीचा मार्ग !

कालमाहात्म्यानुसार भारत पुन्हा विश्वगुरुपदावर आरूढ होण्याचा काळ जवळ आला आहे. धर्म विरुद्ध अधर्म यांच्या लढ्यातील धर्माचा विजय ठरलेला आहेच; परंतु त्यात कोणता पर्याय निवडायचा, हे मात्र प्रत्येकावर अवलंबून आहे. दोन्हीपैकी कोणताही मार्ग न अवलंबण्याचा मध्यम पयार्यही या वेळी उपलब्ध होणार नाही, याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. भारतीय सैन्य सीमांवर, तर सरकार राजकीय स्तरावर लढत आहेच; यात राष्ट्रप्रेमी नागरिक म्हणून भारतियांना सैन्य आणि सरकार यांच्या पाठीशी उभे रहाणे आवश्यक आहे. त्यासाठी भारताला पूरक सूत्रांचा अवलंब करावा लागेल. यातील एक सूत्र म्हणजे भारत सरकारने शत्रूराष्ट्रातील अनेकांची सामाजिक माध्यमांवरील मते भारतात प्रसारित होण्यापासून रोखली आहेत, तरीही भारतातील काही अज्ञात जीव त्यांचे तुणतुणे वाजवत आहेत. त्यांना ओळखणे, वेळीच खडसावणे आणि अशा देशद्रोह्यांची तक्रार करून त्यांना भारताबाहेर हाकलणे, या प्रक्रियेत राष्ट्रप्रेमी भारतियांनी अवश्य सहभागी झाले पाहिजे. भारतियांनो, तुमचे राष्ट्राविषयीचे कर्तव्य आणि प्रेम युद्धाच्या कठीण काळात सैन्य अन् सरकार यांचे मनोबल वाढवण्याचे कार्य करणार आहे. त्यामुळे भारतियांनो, सावध व्हा ! तुमच्या मनात सैन्य आणि सरकार यांविषयी गोंधळ निर्माण करण्यासाठी अनेकजण कार्यरत आहे, हे लक्षात घेऊन स्वतःतील भारताप्रतीची राष्ट्रनिष्ठा कणभरही न्यून होऊ देऊ नका; कारण युद्ध केवळ सीमांवर लढले जात नाही, तर ते वैचारिक, राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक स्तरांवरही लढले जाते. प्रत्येकच स्तरावर भारतियांचा पर्यायाने हिंदूंचा विजय होण्यासाठी प्रत्येक भारतियाला या प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. युद्ध हेच वीरतेचे प्रमाण आहे आणि त्यातून शांतीचा उगम होतो, हे लक्षात घेऊन भारतियांनी युद्धासाठी सज्ज व्हावे !

 

भारतीय सैन्याच्या या रोखठोक कारवायांमुळे देशप्रेमी भारतियांना भारतीय सैन्य आणि भारत सरकार यांच्याविषयी अभिमान वाटत आहे.