तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !

  • खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंग सर्रासपणे मिसळून नागरिकांच्या जिवाशी खेळणार्‍या भेसळखोरांवर त्वरित कठोर कारवाई होणे आवश्यक !

  • मनुष्यच मनुष्याचा वैरी, हे मनुष्याला लाजीरवाणे !

औषध प्रशासनाने ६८ किलो तळलेल्या वाटाण्यांचा जप्त केलेला साठा

पुणे – खाद्यपदार्थ अधिक आकर्षक दिसावेत यासाठी भेसळखोर पदार्थांमध्ये कृत्रिम रंग मिसळत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाने नर्‍हे येथील फरसाणाच्या दुकानावर तपासणी केली. त्या वेळी तळलेल्या वाटाण्यांमध्ये कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने (‘एफ्.डी.ए.’ने) ७ सहस्र ४८० रुपयांचा ६८ किलो तळलेल्या वाटाण्यांचा साठा जप्त केला, तसेच खेड आणि आंबेगाव तालुक्यात ५ ठिकाणी कारवाई करून १९ लाख रुपयांचा अन्नपदार्थांचा साठाही जप्त केला आहे, अशी माहिती पुणे विभागाचे सहआयुक्त दिगंबर भोगावडे यांनी दिली.

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे ३० सहस्र ३९५ रुपयांचा गुटखा, पानमसाला आणि इतर  प्रतिबंधित पदार्थ, तसेच दुसर्‍या ठिकाणी १० लाख ४९ सहस्र रुपये किमतीचा मैदा, बेसन आणि इतर अन्नपदार्थ यांचा साठा जप्त केला. संबंधितांवर भारतीय न्याय संहिता, तसेच अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यान्वये मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. खेड तालुक्यातही विनाअनुमती, विनानोंदणी व्यवसाय करत असलेल्या ‘उज्ज्वल सुपारी’ या आस्थापनावर कारवाई करून ८ लाख १६ सहस्र रुपयांची सुपारी जप्त केली आहे. अन्नसुरक्षा अधिकारी आणि साहाय्यक आयुक्त (अन्न) यांच्या उपस्थितीत ही कारवाई झाली.