पहलगामच्या हिंदूंवरील आक्रमणाचा प्रतिशोध घेण्यासाठी भारताने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ६ मेच्या रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथील ९ आतंकवादी ठिकाणांवर आक्रमण करून १०० जिहाद्यांना ठार मारले. या कारवाईतून भारतीय सैन्याचे सर्वत्र कौतुक होत असून ‘जे हिंदूंशी भिडतील, ते मातीत गाडले जातील’, असा सूर ऐकावयास मिळाला. त्यापुढे जाऊन पाकिस्तानने भारतातील सैनिकी तळांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला असता भारताच्या ‘एअर डिफेन्स सिस्टम’द्वारे त्यांना अपयशी करण्यात आले. ८ मेच्या सकाळी पाकमधील कराची, लाहोर, गुजरांवाला, सियालकोट, रावळपिंडी, बहावलपूर आदी शहरांमधील सैन्य तळांजवळ ड्रोनद्वारे आक्रमणे झाल्याची माहिती समोर आली. कराची या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या पाकिस्तानी शहरावरील आक्रमण भारताने केल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. आधीच भुकेकंगाल झालेल्या आणि जिहादी आतंकवादामुळे स्वत: ही होरपळून निघत असलेल्या पाकच्या अडचणी यातून वाढत चालल्या आहेत, असे तूर्तास म्हणण्यास हरकत नाही.
बांगलादेश ते पहलगाम !
पाकपुरस्कृत आतंकवाद्यांनी पहलगाममध्ये केलेले आक्रमण आणि त्यानंतर भारताकडून एकापाठोपाठ एक पाकिस्तानावर लादलेले निर्बंध अन् केलेली आक्रमणे एवढ्यापुरते याकडे पाहून अन् समाधान व्यक्त करून चालणार नाही. जगातील भूराजकीय समीकरणे गतीने पालटत आहेत. जागतिक सत्तेची केंद्रे पारंपरिकरित्या १-२ राष्ट्रांपुरती मर्यादित राहिली नसून ती विविध ठिकाणी विभागली गेली आहेत. ‘ग्लोबल साऊथ’चा नेता म्हणून भारतही गेल्या दशकभरात मोठी अर्थव्यवस्था आणि सैनिकी शक्ती म्हणून नावारूपास आला आहे. लवकरच तिसरी अर्थव्यवस्था होऊ पहाणारा आणि चौथी शक्तीशाली सैनिकी शक्ती असलेला भारत हा अनेकांच्या डोळ्यांत खुपत आहे. यासाठी भारताला गेल्या काही वर्षांपासून सापळा रचून पकडण्याचे प्रयत्न चालवले गेले. त्याचे चालते-बोलते उदाहरण म्हणजे बांगलादेश !
गेल्या वर्षाच्या मध्यात बांगलादेशात गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण करून पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पलायन करण्यास बाध्य करण्यात आले. तेथील सहस्रावधी हिंदूंवर आक्रमण केले गेले, शेकडो हिंदूंच्या सरकारी नोकर्या गेल्या, हिंदु मंदिरांना आग लावण्यात आली. बांगलादेशातील हिंदू होरपळत असल्याचे पाहून ‘भारतातील हिंदूंच्या सरकारने बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणार्थ सैनिकी कारवाई करावी’, या मागणीने जोर धरला. भारताकडून यासंदर्भात सैनिकी कारवाई केली गेली असती, तर जागतिक शक्तींच्या ‘सापळ्या’त भारत चांगलाच फसला असता, असे काही तज्ञांकडून सांगण्यात येते. भारताने सैनिकी कारवाई न करता मुत्सद्देगिरीचा मार्ग अनुसरला. अर्थात् भारताच्या भूमिकेवरही टीका झाली; कारण जगात भारत हाच हिंदूंचे वास्तविक आश्रयस्थान आहे.
‘बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या मार्गान्वये भारताला पेचात टाकता आले नसल्याने जिहादी आतंकवाद्यांना हाताशी धरून त्यांच्या माध्यमातून पहलगाम आक्रमण करवण्यात आले’, असे म्हणण्यास त्यामुळे वाव आहे. दोन्ही तुकडे जोडले, तर हे नियोजित षड्यंत्र असल्याचे चित्र स्पष्ट होते. पहलगाममध्ये भारतियांना ‘हिंदू’ म्हणून ठार मारण्यात आले, यातून हा संशय अधिक बळावतो. पाकपुरस्कृत जिहाद्यांना माध्यम करून निर्णायक खेळी खेळण्याचा भारतविरोधी शक्तींचा मानस आहे, हे यातून लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे येणारे काही महिने हे भारतासाठी किती आणि कशा प्रकारे भयावह ठरू शकतात, हे पहावे लागणार आहे. हे झाले भारताला भूराजकीय व्यूहरचनेच्या स्तरावर अस्थिर करण्यासाठीचे प्रयत्न ! युद्धभूमीवरील हे आव्हान पेलण्यासह अन्य स्तरांवरही आव्हानांना तोंड द्यावे लागणार !
गेल्या ३ वर्षांत जगाने २ मोठी युद्धे पाहिली. पहिले रशिया आणि युक्रेन यांच्यातील अन् दुसरे इस्रायल आणि हमास यांच्यामधील. दोन्ही युद्धांमधील समान दुवा म्हणजे एका बाजूची सत्ता ही कट्टर राष्ट्रवादी शक्तींच्या हातात होती – रशिया अथवा इस्रायल ! दोन्ही युद्धांमध्ये जागतिक स्तरावर या दोन्ही शक्तींनाच लक्ष्य करण्यात आले आणि ‘खलनायक’ ठरवण्यात आले – रशियाला ‘भूराजकीय स्तरावर’, तर इस्रायलला ‘विचारसरणीच्या स्तरावर’ ! अमेरिका, युरोपियन युनियन आणि अन्य काही प्रभावशाली देशांनी रशियावर भयावह आर्थिक निर्बंध लादले, अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यावर आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट जारी करण्यात आला. त्यांना ‘आधुनिक काळातील हुकूमशाह’ म्हणून हिणवले गेले. एवढेच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळ, कला यांच्यासारख्या संस्कृतीच्या क्षेत्रातील कार्यक्रमांनाही रशियाला जागा नाकारण्यात आली.
इस्रायलचे उदाहरण पाहिले, तर ७ ऑक्टोबर २०२३ च्या आक्रमणाचा सूड घेण्यासाठी इस्रायलने हमासचा नायनाट करण्याचा दृढ निश्चय केला. त्यात सहस्रावधी आतंकवादी मारले गेले. यावरून इस्रायलवर ‘नरसंहार’ आणि ‘वर्णभेद’ यांचे आरोप लावण्यात आले. हमासचे समर्थक पूर्ण जगात बसलेले आहेत. आतंकवादाला धर्म असला, तरी हमासच्या समर्थकांना धर्म नाही. ते मुसलमान आहेत, हिंदू आहेत, ख्रिस्तीसुद्धा आणि काही नतद्रष्ट ज्यू लोकही ! अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया येथील विविध प्रथितयश विश्वविद्यालयांतील साम्यवाद्यांचे छुपे गट (होय ‘स्लिपर सेल्स’च) कामाला लागले आणि इस्रायलविरोधी चित्र सिद्ध करण्यात आले. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने नेतान्याहू यांना चक्क ‘युद्ध गुन्हेगार’ ठरवून एका राष्ट्रवादी नेत्याकडून जिहादी आतंकवादाविरोधात पुकारलेल्या राष्ट्रीय युद्धाला अवैध ठरवण्याचा प्रयत्न चालवला गेला.
भारतासमोरील आव्हाने !
भारताकडून चालवण्यात आलेली सैनिकी कारवाई पहाता येत्या काही दिवसांत भारत आणि पंतप्रधान मोदी यांनाही अशा प्रकारे लक्ष्य केले गेले, तर आश्चर्य वाटू नये. जागतिक स्तरावरील षड्यंत्रकारी शक्तींसाठी राष्ट्रवाद आणि राष्ट्रवादी हे कट्टर शत्रू आहेत. राष्ट्रनिष्ठा टिकून राहिली, तर त्या राष्ट्रावर वर्चस्व प्राप्त करणे अत्यंत कठीण गोष्ट ! हेच या नवसाम्यवाद्यांना नको आहे. सध्याच्या युगात युद्ध हे शस्त्रांपेक्षा कथानक, तंत्रज्ञान आणि पैसा यांच्या आधारे अधिक घातकरित्या लढले जाते. रशियाची सक्षम अर्थव्यवस्था आणि इस्रायलींचे अमेरिकेतील अत्यंत प्रभावशाली दबावगट (लॉबी) असूनही त्यांना अशा प्रकारच्या आव्हांनाना तोंड द्यावे लागले आणि युक्रेन अन् पॅलेस्टाईन यांना पीडिताचा दर्जा देऊ करण्यात आला. भारताची लोकसंख्या पहाता आपली तेवढी सक्षम अर्थव्यवस्था नाही कि इस्रायलसम अशी ‘इकोसिस्टम’ही नाही. त्यामुळे अशा आव्हानांना पेलण्यासाठीची परीक्षा भारतियांना द्यावी लागणार ! काहीही झाले, तरी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी नुकताच दिलेला व्हिडिओ संदेश भारतानेही पाकसंदर्भात अंगीकारला पाहिजे. तो असा की – ‘एकच नियम मला मार्गदर्शन करतो : इस्रायल स्वतःचे रक्षण स्वतःच करील – सर्वत्र, कोणत्याही धोक्याविरुद्ध, स्वतःच्या जोरावर !’
युद्धभूमीसह कथानक आणि आंतरराष्ट्रीय निर्बंध यांच्यासारख्या परीक्षांना सामोरे जावे लागण्यास भारतियांची सिद्धता हवी ! |