‘काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी अचानक १ जानेवारी २०१८ या दिवशी हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्यासाठी लाखो लोक एकत्र आले आणि त्यानंतर काही घंट्यातच संपूर्ण महाराष्ट्रात दंगल उसळली. त्यात जीवित आणि संपत्ती यांची हानी झाली अन् पुढे अनेक दिवस राज्यात अराजकाचे वातावरण होते. जातीय तेढ इतकी वाढली की, आता राज्यभर जातीय दंगली चालू होतात कि काय ? अशी भीती समाजात निर्माण झाली. कोण लोक होते याच्या मागे ? आणि का त्यांनी असे अराजक निर्माण केले ? हे प्रश्न होतेच.
१. देशात अराजकाचे वातावरण निर्माण करण्याचे साम्यवादी आणि अन्य संघटना यांचा प्रयत्न
अ. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देहलीत अराजक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न : शेजारील देशात ज्या हिंदु आणि अन्य अल्पसंख्यांकांवर अत्याचार होतात, त्यांना नाईलाजाने भारतात येऊन वर्षानुवर्षे रहावे लागते अन् निर्वासित असल्याने कोणतेही अधिकार मिळत नाहीत. त्यांना नागरिकत्व देण्यासाठी भारत सरकारने नागरिकत्व कायद्यात सुधारणा करताच देहली आणि अन्य ठिकाणी साम्यवादी अन् मुसलमान संघटना यांनी पुष्कळ महिने आंदोलन करून अराजकाचे वातावरण निर्माण केले.
आ. शेतकरी कायद्यावरून खलिस्तान्यांनी केलेले देशविघातक आंदोलन : शेतकर्यांच्या कल्याणासाठी भारत सरकारने ३ कायदे प्रस्तावित केले, त्यासमवेत पंजाब आणि अन्य भागातील साम्यवादी गटांशी संलग्न अनेक जणांनी स्वतःला शेतकरी म्हणत खलिस्तानी झेंडे हातात घेऊन महिनोन्महिने देहलीच्या आजूबाजूचे रस्ते बंद केले आणि शेवटी त्यांनी लाल किल्ल्यावर १५ ऑगस्टला खलिस्तानी झेंडा फडकावला.

इ. देशातील अन्य भागांतही अराजक निर्मितीसाठी करण्यात आलेले प्रयत्न : मणीपूरमध्ये २ वर्षांनंतरही स्थानिक जमातींमधील अविश्वास तेवत ठेवण्यात येऊन सामान्य जीवन उध्वस्त झाले आहे. कुठून यांना प्रेरणा मिळते ? बस्तरमध्ये अबूजमाड भागात ‘मुक्त प्रदेश’ घोषित करून तिथे देशविघातक चळवळ चालवायची, पोलिसांना ठार मारायचे, त्यांची शस्त्रे पळवायची आणि लोकांचे जीवन अशक्य करायचे.
२. साम्यवाद्यांचे षड्यंत्र
वर सांगितलेली ही काही उदाहरणे आहेत. विविध कारणांनी देशात अराजक माजवायचे, असंतोषाचे वातावरण आहे असे दाखवायचे, कधी धर्माच्या नावाखाली, कधी जातीच्या नावाखाली, कधी आदिवासींच्या गटांमध्ये भांडणे लावून देशविरोधी वातावरण सिद्ध करायचे, विकासात खीळ घालायची. लोकांनी लोकशाही मार्गाने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना ‘ते केवळ हिंदूंचे प्रवक्ते आहेत’, असे खिजवून शासन करू द्यायचे नाही, ही ती प्रवृत्ती आहे. दुर्दैवाने भारतातील अनेक विचारवंत याला भुलले आहेत. त्यातील काही पत्रकार आहेत, काही इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रवक्ते आहेत, काही लेखक आहेत, काही अधिवक्ते आहेत, तसेच काही स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवणारेही आहेत. अनेकांनी अशासकीय संस्था चालवल्या आहेत आणि विशिष्ट मुद्यांसाठी प्रचार यंत्रणा राबवल्या आहेत. परदेशातून त्यासाठी येणारा निधी घोषित केलेल्या उद्दिष्टांसाठी न वापरता धर्म पालटण्यासाठी, लालूच देण्यासाठी वापरायचा आणि ‘अल्पसंख्यांक धोक्यात आहेत’, असे म्हणून हाकाटी पिटायची आणि जगभर भारताची अपर्कीर्ती करायची. ‘भारतात धर्मस्वातंत्र्य धोक्यात आहे’, असे अहवाल सिद्ध करायचे आणि त्याला जागतिक संस्थांमध्ये प्रसिद्धी द्यायची.
जिथे तरुण मिळतील, अशा हुकमी जागा, म्हणजे महाविद्यालये आणि विश्वविद्यालये. त्यातील अनेक भारत सरकारने चालवलेली आहेत, याखेरीज काही खासगी आहेत, तर काही राज्य सरकारने चालवलेली आहेत, त्या ठिकाणी साम्यवादी विचारांचे काहूर माजवून तरुणांना अभ्यास करू द्यायचा नाही आणि ‘तरुण बेरोजगार आहेत’, असे म्हणून आंदोलने करायची. याखेरीज सर्वाेच्च न्यायालयात वारंवार अर्ज प्रविष्ट (दाखल) करून स्वतःच्या बाजूचे आदेश मिळवायचे आणि ते न मिळाल्यास ‘न्यायालये सरकारची रखेल आहेत’, म्हणून कांगावा करायचा.
निवडणुकीच्या वेळी उमेदवारांची माहिती गोळा करून त्यांना आपल्या मतांचा प्रचार करण्यासाठी प्रलोभने दाखवणे आणि निवडणुकीच्या प्रक्रियेवर छाप पाडणे. निदान स्वतःच्या विरुद्ध कुणी काही बोलणार नाही, याची खात्री करणे. समाजमाध्यमांतून राष्ट्रीय राजकीय पक्षांवर खोट्या प्रचाराची राळ उडवून देणे, प्रबोधनाच्या नावाखाली लोकांमध्ये असंतोषाचे वातावरण धुमसत ठेवणे, ही यांची चाल आहे. राज्यघटनेने दिलेल्या विविध स्वातंत्र्यांचा लाभ घ्यायचा आणि स्वतःविरुद्ध विचारांच्या लोकांची पायमल्ली करणे, हा त्यांचा सुप्त डाव आहे.
३. ‘डीप स्टेट’चे षड्यंत्र उद्ध्वस्त करून सनातन धर्म आचरणात आणणे महत्त्वाचे !
थोडक्यात जोपर्यंत आपल्या विचारांचे लोक सत्तेत येत नाहीत, तोपर्यंत सर्व प्रकारे देश खिळखिळा करणे, हेच आंतरराष्ट्रीय उद्योगपती जॉर्ज सोरोस असो किंवा खलिस्तानी पन्नू असो, चीनप्रणीत साम्यवादी असोत किंवा अमेरिका किंवा कॅनडा यांच्या तालावर नाचणार्या स्वयंसेवी संस्था असोत, यांचा खरा उद्देश हाच आहे. भारतीय मतदार जागरूक आहेत; पण त्यांनी या अपप्रवृत्तींपासून सतत सतर्क रहाणे आवश्यक आहे. हीच या ‘डीप स्टेट’ आणि साम्यवादी विचारांचा प्रचार करणार्यांपासून वाचायची गुरुकिल्ली आहे. त्यासाठी बुद्धीपूर्वक, श्रद्धेने स्वमंत्र, स्वयंत्र, स्वतंत्र आणि स्वविद्या प्रकट करणे अन् असाध्य ते साध्य करणे, तसेच ते आचरणात आणणे, हा सनातन धर्माचा आदेश आहे.’
– श्री. प्रवीण दीक्षित, निवृत्त पोलीस महासंचालक, मुंबई.
(साभार : मासिक ‘हिंदुस्थान पोस्ट’, अतिथी संपादकीय, दिवाळी २०२४)