परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध प्रसंगांत सांगितलेली काही अनमोल सूत्रे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. वर्ष २००८ मध्‍ये एकदा बोलतांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले म्‍हणाले, ‘‘सनातनचा इतिहास हा अनिष्‍ट शक्‍तींचा आहे. नंतरच्‍या पिढ्यांना याचे महत्त्व समजेल.’’

२. ‘निष्‍काम साधनेचा आरंभ आध्‍यात्मिक पातळी ५० टक्‍के असल्‍यावर होतो’, असे परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे 

वर्ष २००८ मध्‍ये एकदा मी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याशी सेवेसंदर्भात बोलत होते. त्‍या वेळी ‘उच्‍च स्‍वर्गलोकातून आलेले दैवी बालसाधक आणि साधना’ असा विषय चालू होता. त्‍या वेळी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांशी झालेले संभाषण पुढीलप्रमाणे आहे.

परात्‍पर गुरु डॉक्‍टर : दैवी बालसाधकांचे बोलणे वेगळे आहे ना !

मी : सनातनची निष्‍काम साधना असल्‍याने असे उच्‍च लोकातले जीव आपल्‍याकडे येतात का ?

परात्‍पर गुरु डॉक्‍टर : हो. आपली साधना कठीण आहे. निष्‍काम साधनेचा आरंभ ५० टक्‍के आध्‍यात्मिक पातळीला होतो.

मी : मग आपले साधक उच्‍च लोकांतून आलेले जीव असतील ना !

परात्‍पर गुरु डॉक्‍टर : हो !

३. ‘काळानुसार साधकांना होणारा आध्‍यात्मिक त्रास न्‍यून होऊन ते चांगल्‍या गोष्‍टी अनुभवू शकतील’, असे साधकांना आश्‍वस्‍त करणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले ! 

वर्ष २००९ मध्‍ये एकदा मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांशी बोलत होते. त्‍या वेळी साधकांना होणार्‍या आध्‍यात्मिक त्रासांविषयी परात्‍पर गुरु डॉ. म्‍हणाले, ‘‘जसा काळ पुढे पुढे जाईल, तसे साधकांच्‍या आध्‍यात्मिक त्रासांत वाढ होत जाईल. एक काळ असा येईल की, केवळ दिवस ढकलणे अशी स्‍थिती येईल. त्‍यानंतर काळ जसा आणखी पुढे जाईल, तसा साधकांना होणारा आध्‍यात्मिक त्रास न्‍यून होत जाईल आणि साधकांना चांगल्‍या अनुभूती येण्‍यात वाढ होत जाईल. साधक सकारात्‍मक गोष्‍टी अनुभवू शकतील.’’

४. वर्ष २००९ मधे एका प्रसंगात परात्‍पर गुरु डॉ. म्‍हणाले, ‘‘साधनेचे प्रयत्न केले, तर साधकांना अशक्‍य असे काही नाही.’’ 

५. ‘आध्‍यात्मिक पातळी न्‍यून झाली, तरी तिथपर्यंत जाण्‍याचे ठाऊक असल्‍यामुळे पुन्‍हा वेगाने प्रगती होईल’, असे परात्‍पर गुरु डॉक्‍टर आठवले यांनी सांगणे 

वर्ष २०११ मध्‍ये एका साधिकेची आध्‍यात्मिक पातळी उणावली होती. त्‍या वेळी परात्‍पर गुरु डॉक्‍टर तिला म्‍हणाले, ‘‘आता आध्‍यात्मिक पातळी न्‍यून झाली, तरी आधी तू वरची आध्‍यात्मिक पातळी गाठली असल्‍यामुळे तिथपर्यंत कसे जायचे ? हे तुला ठाऊक आहे. तुझी पुन्‍हा वेगाने प्रगती होईल.’’

– एक साधिका , सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.