Pakistani Train Hijack Issue : पाक सैन्याने १ गोळी झाडली, तर १० सैनिकांना ठार मारू !

  • ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ची चेतावणी

  • जाफर एक्सप्रेसची अद्याप सुटका नाही !

  • २१४ ओलीस अद्यापही आर्मीच्या कह्यात

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या बलुचिस्तान प्रांताला पाकपासून स्वतंत्र करण्यासाठी सशस्त्र लढा देणार्‍या ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ या संघटनेने ९ डब्यांच्या जाफर एक्सप्रेसचे अपहरण केल्याला अनेक तास उलटल्यानंतरही पाकचे सैन्य रेल्वे आणि त्यातील प्रवाशांची सुटका करू शकलेले नाही. पाक सैन्याकडून रेल्वेची सुटका करण्यासाठी कारवाई केली जात आहे. सैन्याने दावा केला आहे की, आतापर्यंत १६० जणांची सुटका करण्यात आली असून बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या १६ सदस्यांना ठार मारण्यात आले आहे. अशातच पाकचेही ३० सैनिक ठार झाले आहेत. या रेल्वेमध्ये ४५० जणांना ओलीस ठेवण्यात आल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते; मात्र सध्याच्या माहितीनुसार २१४ जण ओलीस आहेत. आर्मीच्या सदस्यांनी धमकी दिली आहे की, त्यांच्यावर पाकच्या सैन्याने एक जरी गोळी झाडली, तरी पाकच्या १० सैनिकांना ठार मारले जाईल.

पाकिस्तानी अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार क्वेटाहून पेशावरला जाणार्‍या जाफर एक्सप्रेसमध्ये ४०० हून अधिक प्रवासी होते. ही रेल्वे बलुचिस्तानमधील बोलान येथे एका बोगद्यात घुसली, तेव्हा बलुच बंडखोरांनी त्यावर आक्रमण करून तिला कह्यात घेतले. यानंतर रेल्वेतील महिला आणि मुले अशा १८० जणांची सुटका करण्यात आली.

‘रेडिओ पाकिस्तान’च्या वृत्तानुसार पाकिस्तानी सुरक्षा दलांनी १०४ ओलिसांची  सुटका केली आहे. सुटका करण्यात आलेल्यांमध्ये ५८ पुरुष, ३१ महिला आणि १५ लहान मुले यांचा समावेश आहे.

पाक सैन्याला कारवाई करणे कठीण !

ज्या भागात रेल्वे थांबवण्यात आली आहे, ती एक दुर्गम डोंगराळ खिंड आहे, जिथे भ्रमणभाषद्वारे संपर्क आणि संसाधने पोचणे कठीण आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानी सैन्याला कारवाई करणे कठीण होत चालले आहे.

पाक सैन्याचा दावा बलुच लिबरेशन आर्मीने फेटाळला

बलुच लिबरेशन आर्मीने एक निवेदन प्रसारित केले असून ओलिसांच्या  सुटकेविषयी पाकच्या सैन्याने केलेला दावा फेटाळला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन केल्यामुळे महिला आणि मुले यांना सोडण्यात आल्याचे या संघटनेने म्हटले आहे. सध्या आमच्या नियंत्रणात २१४ प्रवाशी असून यातील बहुतेक पाकच्या सुरक्षादलातील सैनिक आहेत, असे या संघटनेने म्हटले आहे. पाकिस्तानी सैन्याने आक्रमण केले असले, तरी ‘आम्ही सर्व सुरक्षित आहोत’, असाही दावाही संघटनेने केला आहे.

पाकिस्तानी सैन्याने केलेले आक्रमण दायित्वशून्य कृत्य आहे. पाकचे सैन्य ओलिसांविषयी चर्चा करण्यास सिद्ध नाही, असे यावरून दिसून येते, असेही या संघटनेने म्हटले आहे.

प्रत्येक तासाला ५ ओलिसांना ठार मारण्याची धमकी

बलुच लिबरेशन आर्मीने ओलिसांच्या बदल्यात बलुचिस्तानमधील राजकीय बंदीवानांची सुटका करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी ४८ तासांचा अवधी देण्यात आला आहे. मागणी मान्य न झाल्यास मुदत संपल्यानंतर प्रत्येक तासाला ५ ओलिसांची हत्या करण्यात येईल आणि हे चक्र शेवटपर्यंत चालू राहील, अशी चेतावणी दिली आहे. असे संघटनेने म्हटले आहे.

‘सीपीईसी’ बंद करण्याचीही मागणी !

चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी, म्हणजेच चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग) प्रकल्प बंद करण्याची मागणीही बलुच लिबरेशन आर्मीने ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात पाककडे केली आहे.

स्वतंत्र बलुचिस्तानच्या निर्मितीची वेळ आली ! –  मेजर जनरल (निवृत्त) जी.डी. बक्षी

मेजर जनरल (निवृत्त) जी.डी. बक्षी

मेजर जनरल (निवृत्त) जी.डी. बक्षी यांनी बलुचिस्तानच्या विषयी त्यांचे मत मांडले आहे. ते म्हणाले की, बलुचिस्तान पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर आहे. अशा स्थितीत बलुचिस्तानमध्ये रेल्वेचे अपहरण होण्याची ही घटना खूप महत्त्वाची आहे. एका रेल्वेमध्ये ४५० ते ५०० प्रवासी असतात. या प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले आहे. अशा कुठल्याही घटनेत ओलिसांची सुटका करण्यासाठी जी कारवाई केली जाते, ती अतिशय नाजूक असते. या कारवाईत झालेल्या एक चुकीची संपूर्ण देशाला शिक्षा भोगावी लागू शकते. या कारवाईच्या वेळी मोठी जीवितहानी होण्याची भीती असते. मला वाटत नाही की, कुठल्याही जीवितहानीविना पाकचे सैन्य ही कारवाई करू शकेल. ओलिसांची सुटका करतांना सैन्य किंवा कमांडो ज्या प्रकारच्या मोहिमा हाती घेतात, त्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एन्.एस्.जी. – नॅशनल सिक्युरिटी गार्ड) ही सर्वोत्तम आहे. एन्.एस्.जी.ने अशा कारवाया अचूक पार पाडल्या आहेत; परंतु पाकिस्तानी सैन्य बर्‍याचदा केवळ दिखाऊपणा करण्यात व्यस्त असतो. अशा वेळी ते ‘आम्ही समोर उभ्या शत्रूला घाबरवू’, या हेतूने मोठी शस्त्रास्त्रेे, तोफखाना घेऊन बाहेर पडतात. आता पाकिस्तानी सैन्य ज्या प्रकारची कारवाई करू पहात आहे, त्यावरून असे वाटते की, यामध्ये मोठी जीवितहानी होऊ शकते. मला वाटते की, आता बलुचिस्तानच्या जन्माची वेळ आली आहे. या घटनेवर आपण (भारताने) काळजीपूर्वक लक्ष ठेवले पाहिजे आणि सतर्क राहिले पाहिजे, कारण पाकिस्तानी सैन्य लक्ष विचलित करण्यासाठी काहीही करू शकते. आपल्याला आपल्या सीमा सुरक्षित ठेवाव्या लागतील. त्यामुळेच सावध रहावे लागेल.