(टीप : ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’, म्हणजे युद्धात माहिती, विचार आणि भावना यांचा वापर करून समाजातील लोकांचा विश्वास, निर्णय अन् कृती यांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणे !)
चीनचे भारताविरुद्ध ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’ : भाग १
अमेरिका आणि मित्र राष्ट्रे तैवानची लढण्याची क्षमता वाढवत आहेत. ही क्षमता आता एवढी वाढली आहे की, चीनने तैवानवर समुद्रातून आक्रमण करून त्यावर कब्जा करण्याची शक्यता न्यून होत आहे. चीनने तैवानवर आक्रमण केले, तर त्यांना लढाईत पुष्कळ रक्त सांडावे लागेल, ज्याकरता चिनी जनता कधीही सिद्ध होणार नाही; म्हणून आता चीन वेगळ्या प्रकारच्या युद्धपद्धतीने तैवानवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये एक पद्धत आहे ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’. आजच्या युद्धक्षेत्रात शस्त्रास्त्रांपेक्षा मनावर आक्रमणे करणारी शस्त्रे अधिक प्रभावी ठरत आहेत. या युद्धात माहिती, विचार आणि भावना यांचा वापर करून समाजातील लोकांचा विश्वास, निर्णय अन् कृती यांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यामध्ये ‘एआय’ (‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्ता)सारखे तंत्रज्ञान वापरून शत्रूराष्ट्राच्या मनावर कब्जा करायचा, ज्यामुळे ते असे निर्णय घेतील की, जे चीनच्या बाजूने असतील, म्हणजेच तैवानच्या मनावर विजय मिळवून युद्ध न करता तैवानचे चीनमध्ये विलीनीकरण करायचे.
१. ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’
चीन ‘एआय’चा वापर करून वर्ष २०३० पर्यंत जगातील महाशक्ती बनायचा प्रयत्न करत आहे. या ‘कॉग्निटिव्ह’ युद्धामध्ये चीन त्याच्या लष्कर (मिलिटरी) आणि नागरी (सिव्हिल) या दोन्ही क्षेत्रांचा वापर करून ही लढाई जिंकणार आहे. याचा वापर युद्धभूमीच्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये केला जाईल, ज्यामध्ये ‘इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग’ (माहितीवरील विविध प्रक्रिया), ‘अनमॅन्ड वेपन्स’ (मानवरहित शस्त्र) आणि ‘डिसिजन मेकिंग क्षेत्र’ (निर्णय घेण्याचे क्षेत्र) असतील. ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’चा वापर करून चीन आधुनिक पद्धतीने लढाई लढेल.

‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’ ही एक महत्त्वाची युद्धपद्धत म्हणून पुढे येत आहे. चीनची ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ याचा वापर ‘लँड वॉरफेअर’ (भूमीवरील युद्ध), ‘मेरीटाईम वॉरफेअर’ (सागरी युद्ध), ‘सायबर वॉरफेअर’ (माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील युद्ध), ‘स्पेशल वॉरफेअर’ (विशेष युद्ध), अशा विविध युद्धांत वापर करणार आहे.
२. प्रचंड प्रमाणामध्ये शत्रूराष्ट्रांची माहिती गोळा करून त्याचा शस्त्र म्हणून वापर करणे
हे युद्ध लढण्याकरता चीन प्रचंड प्रमाणामध्ये शत्रूराष्ट्रांची माहिती, नेतृत्वाची वैयक्तिक माहिती, इतर प्रकारची माहिती ही साम, दंड, भेद यांचा वापर करून गोळा करत आहे. नंतर ‘डेटा मायनिंग’ (कच्च्या माहितीचे वैशिष्ट्यपूर्ण माहितीत रूपांतर करणे) केले जाईल आणि मग त्याचे विश्लेषण करून नेमके युद्ध कसे लढायचे, हे ठरवले जाईल.
चीनने अमेरिकेचा ‘डेटा’ मोठ्या प्रमाणामध्ये गोळा केला आहे. वर्ष २०१५ मध्ये अमेरिकेला कळले की, तिच्या सरकारची वेगवेगळ्या क्षेत्रांतील माहिती चोरीला गेली आहे आणि हे केवळ एकदाच झाले असे नाही, तर अनेक वेळा माहिती चोरण्यात आली. आता ही माहिती एक शस्त्र (weaponization of data) म्हणून चीन येणार्या काळामध्ये वापरू शकेल.
३. चीनकडून ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’चा वापर स्वतःच्या सैनिकांवरही !
चीन ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’चा वापर स्वतःच्या सैनिकांवरही करत आहे. चीन संशोधन करत आहे की, त्यांचे सैनिक वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे वागतात वा काम करतात. म्हणून चीन ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या सैनिकांच्या मनगटावर एक ‘स्मार्ट सेंसर ब्रेसलेट’ (संगणकीय प्रणाली असलेले एक इलेक्ट्रॉनिक पद्धतीचे हातकडे) लावून महत्त्वाच्या सैनिकी नेतृत्वाची माहिती गोळा करत राहील, म्हणजे त्यांचे हावभाव, मानसिकता, मनःस्थिती वगैरे. यामुळे त्या सैनिकांचे ‘स्ट्राँग पॉईंट्स’ (मजबूत बाजू) आणि ‘वीक पॉईंट्स’ (कमकुवत बाजू) युद्ध परिस्थितीमध्ये कळतील. ज्यामुळे योग्य सैनिक योग्य कामाकरता अन् योग्य वेळी वापरणे, हे चीनला सोपे जाईल; कारण लढाईचे सर्वांत महत्त्वाचे तत्त्व असते ‘राईट मॅन ॲट राईट प्लेस, ॲट राईट टाईम.’
हे ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’ किती यशस्वी होईल ? सर्वांत महत्त्वाचे की, तुम्ही कशा प्रकारे ‘अल्गोरिदम’ (काम करण्याची कार्यसूची) सिद्ध करता, जे माहितीचे विश्लेषण करतील. तुम्हाला मिळालेली माहिती ही कुठल्या दर्जाची आहे ? कारण चांगली माहिती गोळा केली, तर तुम्हाला चांगले विश्लेषण करता येईल.
४. विश्लेषण करून उपाययोजना
आज चीन प्रचंड प्रमाणामध्ये ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’चा वापर तैवान आणि हाँगकाँग यांच्या विरोधात करत आहे. हाँगकाँग आणि तैवान ही एक प्रयोगशाळा आहे, जिथे चीन ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’ वापरत आहे, याखेरीज चीन या ‘वॉरफेअर’चा वापर अमेरिका आणि युरोप यांच्या विरोधातसुद्धा करत आहे. याचा अभ्यास करून भारताने ‘चीन ही युद्धपद्धत भारताविरुद्ध कशी वापरेल किंवा वापरत आहे’, याचे विश्लेषण करून त्यावर उपाययोजना काढली पाहिजे.
५. चीन भारताच्या विरुद्ध ‘कॉग्निटिव्ह युद्धा’चा वापर कसा करत आहे ?
चीन भारताच्या विरुद्ध ‘कॉग्निटिव्ह युद्ध’ तंत्राचा वापर अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने करत आहे. या तंत्राचा उद्देश भारत सरकार आणि जनता यांची मानसिकता पालटणे, त्यांच्यात संभ्रम निर्माण करणे, हा आहे. चीन या युद्ध तंत्रामध्ये माहिती, प्रचार, मनोवैज्ञानिक तंत्रे आणि सायबर मोहीम यांचा समावेश करून भारताच्या धोरणांवर परिणाम करण्याचा प्रयत्न करत आहे. चीनच्या ‘कॉग्निटिव्ह युद्धा’च्या धोरणांमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे खाली दिले आहेत :
५ अ. माहितीचे शस्त्रीकरण (Weaponization of Information) : चीन भारताच्या विरुद्ध माहिती युद्ध (Information Warfare) तंत्राचा वापर करत आहे. भारताच्या जनतेपर्यंत पोचण्यासाठी सामाजिक माध्यमांचा आणि ‘ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स’चा (संकेतस्थळांचा) वापर केला जातो. चीन खोटी माहिती, ‘प्रोपगंडा’ (प्रचार) आणि खोट्या बातम्या पसरवून भारतीय समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतो. जनमत पालटून चीन भारतीय समाजाचा देशावरील विश्वास न्यून करण्याचे तंत्र वापरतो.
काही दिवसांपूर्वी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी विधान केले होते, ‘चीन भारताकरता एक मोठी समस्या आहे.’ या विधानावर ९ सप्टेंबर २०२४ या दिवशी चीनचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने अग्रलेख लिहिला. ‘डॉ. जयशंकर यांचे चीनच्या विरोधातील परराष्ट्र धोरण हे भारताकरता धोकादायक आहे. त्याचा परिणाम भारताच्या राष्ट्रीय हितावर होईल. हे धोरण अनेक भारतियांना मान्य नाही, जे पूर्ण असत्य आहे.’ याचाच अर्थ ‘ग्लोबल टाइम्स’ भारत सरकारमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे.
५ आ. सायबर आक्रमणे आणि तंत्रज्ञान चोरणे : चीन सायबर आक्रमणांद्वारे भारताच्या सरकारी, सैनिकी आणि आर्थिक संस्था यांवर आक्रमणे करून गुप्त माहिती गोळा करत आहे. सायबर आक्रमणांमुळे भारताच्या सुरक्षिततेवर परिणाम होतो आणि त्यांच्या निर्णयक्षमतेला संभ्रमात टाकले जाते. तंत्रज्ञान चोरणे, हेही ‘कॉग्निटिव्ह युद्धा’चे महत्त्वाचे अंग आहे, ज्याद्वारे चीन भारताच्या विकास धोरणांवर थेट परिणाम करतो.
५ इ. मनोवैज्ञानिक मोहिमा (Psychological Operations) : चीन भारताच्या राजकीय आणि सामाजिक स्थैर्यावर परिणाम करण्यासाठी मनोवैज्ञानिक मोहिमेचा वापर करतो. चीनच्या प्रचारयंत्रणा भारताच्या समाजातील वांशिक, धार्मिक आणि सामाजिक संघर्षांना जसे की, माओवादाला चालना देत आहे. अशा प्रकारे भारतात अंतर्गत संघर्ष आणि असंतोष निर्माण करण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे.
५ ई. संस्कृतीचे प्रभावशाली शस्त्र म्हणून वापर : चीन ‘सॉफ्ट पॉवर’ धोरणाचा वापर करून भारतीय विचारांवर परिणाम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या सांस्कृतिक संस्थांच्या (जसे की, ‘कन्फ्युशियस इन्स्टिट्यूट’ – चीनमधील कन्फ्युशियस धर्माचा उपदेश देणार्या संस्था) माध्यमातून चीन भारताच्या शैक्षणिक संस्था आणि विचारसरणी यांवर प्रभाव टाकतो.
५ उ. ‘प्रोपगंडा’ (प्रचार) आणि माध्यमांवर नियंत्रण : चीन स्वतःच्या प्रोपगंडा यंत्रणेचा वापर भारताच्याच विरोधात करत आहे. चीन स्वतःचे राष्ट्रहित सुरक्षित ठेवण्यासाठी जागतिक माध्यमांवर नियंत्रण ठेवतो आणि त्याद्वारे भारताच्या विरुद्ध चांगली अन् प्रभावी कथा मांडण्याचा प्रयत्न करतो. माध्यमांमध्ये चीनची बाजू अधिक सकारात्मक आणि भारताची नकारात्मक दाखवली जाते.
५ ऊ. वैज्ञानिक सहकार्य आणि माहितीची (डेटाची) चोरी : चीन भारताच्या वैज्ञानिक समुदायाशी सहकार्य वाढवून गुप्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये संशोधन संस्थांचा गोपनीय ‘डेटा’ चोरणे, तंत्रज्ञान हस्तगत करणे आणि भारताच्या धोरणात्मक योजना धोक्यात आणणे यांचा समावेश होतो.
६. भारताने ‘कॉग्निटिव्ह युद्ध’ क्षेत्रात स्वतःची लढण्याची क्षमता वाढवणे आवश्यक !
चीनचे ‘कॉग्निटिव्ह युद्ध’ धोरण हे भारतीय संस्था, समाज आणि निर्णयक्षमता यांवर एक व्यापक आक्रमण आहे, ज्याचा उद्देश भारताला चीनचा प्रतिस्पर्धी म्हणून पुढे येऊ द्यायचे नाही. चीन प्रचंड वेगाने या विषयामध्ये काम करत आहे आणि भारतानेसुद्धा ‘कॉग्निटिव्ह युद्ध’ या क्षेत्रात संशोधन करून स्वतःची लढण्याची क्षमता वाढवली पाहिजे. याकरता आपल्याला आपले शास्त्रज्ञ, खासगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र आणि सगळ्यांच्या ज्ञानाचा वापर करून या क्षेत्रामध्ये प्रगती करावी लागेल.
लेखाच्या पुढच्या भागामध्ये हे युद्ध जिंकण्याकरता भारताने नेमके काय करायला पाहिजे, यावर आपण सविस्तर पाहू.
(क्रमशः)
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे. (१४.१.२०२५)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/878025.html