सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सव’ सोहळ्याच्या संदर्भात केलेल्या वैज्ञानिक संशोधनाविषयी सौ. मधुरा कर्वे यांनी विचारलेले बुद्धीअगम्य प्रश्न आणि श्री. राम होनप यांनी सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानाद्वारे दिलेली त्यांची उत्तरे !

‘११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्सव’ सोहळा फार्मागुडी (गोवा) येथील मैदानात पार पडला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने या सोहळ्याचे वैज्ञानिक संशोधन करण्यात आले. या संशोधनाविषयी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सौ. मधुरा कर्वे यांच्या मनात निर्माण झालेले काही प्रश्न आणि देवाच्या कृपेमुळे सूक्ष्मातून प्राप्त झालेल्या ज्ञानाद्वारे मी दिलेली त्यांची उत्तरे पुढे दिली आहेत.             

(भाग २)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/841230.html

‘ब्रह्मोत्सव’ सोहळ्यातील एक क्षण

३. प्रश्न क्र. ३ 

ब्रह्मोत्सवापूर्वी बहुतांश साधकांमध्ये १०० मीटर ते २०० मीटरपेक्षाही अधिक नकारात्मक ऊर्जा आढळून आली. यामागील कारण काय ?

श्री. राम होनप

३ अ. उत्तर

३ अ १. ‘शारीरिक आणि मानसिक ताण अन् मनातील लौकिक विचार’, यांमुळे साधकांवर वाईट शक्तींच्या आक्रमणांचा प्रभाव अधिक होणे : ‘ब्रह्मोत्सवात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याचा साधकांना आध्यात्मिक लाभ होऊ नये’, यासाठी वाईट शक्ती तीव्र प्रमाणात कार्यरत होत्या; परंतु ‘त्यांचा परिणाम साधकांवर किती होणार ?’, हे साधकांच्या आंतरिक स्थितीवर, म्हणजेच साधनेवर अवलंबून असते.

कार्यक्रमाचा सराव रथोत्सवाच्या पूर्वी काही दिवसांपासून करण्यात आला होता. या सरावाच्या वेळी त्यात सहभागी झालेल्या साधकांचे अतीश्रम झाले होते. त्यामुळे रथोत्सवाच्या दिवशी काही साधकांवर शारीरिक ताण आला होता. रथोत्सवाच्या वेळी काही साधकांच्या मनात ‘आपले काही चुकणार नाही ना ?’, याविषयीचा ताण, तसेच अन्य लौकिक विचार होते. त्यामुळे त्या साधकांवर वाईट शक्तींच्या सूक्ष्मातील आक्रमणांचा पुष्कळ परिणाम दिसून आला. साधकांनी सेवा करतांना ‘कुठलाही ताण न घेणे आणि गुरूंप्रती भाव व्यक्त करणे’, यांवर लक्ष केंद्रित केल्यास साधकांवर वाईट शक्तींच्या सूक्ष्मातील आक्रमणांचा परिणाम होणार नाही.

४. प्रश्न क्र. ४

ब्रह्मोत्सवापूर्वी एका साधकामध्ये २१.४० मीटर, म्हणजे सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा आढळून आली; याउलट अन्य साधक-साधिकांमध्ये ती ० ते ३.८६ मीटर एवढी अल्प आढळून आली. यामागील कारण काय ?

सौ. मधुरा कर्वे

४ अ. उत्तर

४ अ १. सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा आढळून आलेल्या साधकाची गुणवैशिष्ट्ये

अ. हा साधक स्वतःतील क्षमतेचा पूर्ण उपयोग करून प्रामाणिकपणे साधना करतो.

आ. त्याच्यात भावनाप्रधानता अल्प आहे.

इ. त्याच्या मनाची स्थिती एकाग्र असून तो तत्त्वनिष्ठ आहे.

या गुणांमुळे परात्पर गुरु डॉक्टरांकडून रथोत्सवाद्वारे प्रक्षेपित होत असलेले चैतन्य त्या साधकाला अन्य साधकांच्या तुलनेत अधिक प्रमाणात ग्रहण करता आले.

५. प्रश्न क्र. ५

ब्रह्मोत्सवानंतर दोन साधिकांच्या तुलनेत त्यांनी डोक्यावर घेतलेल्या मंगल कलशांत पुष्कळ अधिक सकारात्मक ऊर्जा आढळून आली. यामागील कारण काय ?

५ अ. उत्तर

५ अ १. डोक्यावर कलश घेतलेल्या दोन साधिकांची आंतरिक स्थिती : रथोत्सवाच्या वेळी दोन साधिकांनी डोक्यावर मंगल कलश घेतल्यावर त्यांच्या आंतरिक स्थितीत भाव, भावना आणि लौकिक विचार यांचे मिश्रण होते. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांकडून प्रक्षेपित होत असलेले चैतन्य त्या मर्यादित स्वरूपात ग्रहण करू शकल्या.

५ अ २. मंगल कलशाची वैशिष्ट्ये

५ अ २ अ. मंगल कलशांत सूक्ष्म स्वरूपात स्वर्गलोकातील देवता प्रगट होणे : परात्पर गुरु डॉक्टरांचे कार्य अवतारी असून त्यांच्याकडून पृथ्वीवर पुष्कळ धर्मकार्य होत आहे. त्यामुळे स्वर्गलोकातील काही देवता सूक्ष्मातून रथोत्सवाला उपस्थित होत्या. त्यांपैकी काही देवता ब्रह्मोत्सव असलेल्या ठिकाणी सूक्ष्मातून उपस्थित होत्या, तर काही देवता कलशांतील पाण्यात काही क्षण प्रगट झाल्या. त्यामुळे त्या पाण्यात देवतांची शक्ती, गंध आणि सूक्ष्म प्रकाश यांची निर्मिती झाली; परिणामी कलशांतील पाण्यातील सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण वाढले.

५ अ ३. कलशांतील पाण्यात देवता प्रगट होण्यामागील कारणे

५ अ ३ अ. जलासन : स्वर्गलोकातील काही देवतांचे ‘जल’ हेच आसन असते. त्यामुळे त्या पाण्याला देवतांचे ‘जलासन’, असे म्हटले आहे. त्या देवता धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी मंगल कलशातील पाण्यात काही क्षण प्रगट होतात.

५ अ ३ आ. जलनिवासी : स्वर्गलोकातील काही देवतांचे स्थान पाण्यात असते. त्यामुळे अशा देवतांना ‘जलनिवासी’, असे म्हटले आहे.

५ अ ४. स्वर्गलोकातील पाण्याशी संबंधित देवीदेवतांची नावे : ‘भ्रृगा’, ‘भ्रुमा’, ‘काश्यपी’, ‘चंद्रा’, ‘व्रही’ आणि ‘व्राही’.

५ अ ४ अ. स्वर्गलोकातील देवता या उच्च देवतांशी संबंधित असणे : ‘भ्रृगा’, ‘भ्रुमा’ आणि ‘काश्यपी’ या देवी ब्रह्मदेवाशी संबंधित आहेत. ‘व्रही’ हा देव आणि ‘व्राही’ ही देवी विष्णूशी संबंधित आहेत अन् ‘चंद्रा’ ही देवी भगवान शिवाशी संबंधित आहे.

५ अ ४ आ. कलशातील पाण्यात देवता प्रगट होण्याचे महत्त्व : कलशातील पाण्यात काही क्षण देवता प्रगट होतात. त्यामुळे पाण्यात देवतेचा गंध, शक्ती आणि सूक्ष्म प्रकाश उतरतो; परिणामी पाण्यातील दैवी ऊर्जा वाढते. या प्रक्रियेमुळे पाण्याचे बळ वाढते, म्हणजे ‘जलपुष्टी’ होते.

५ अ ५. मंगल कलशाचे महत्त्व : ज्याप्रमाणे मंदिराच्या विशिष्ट रचनेमुळे त्यात देवाचा वास कायम रहाण्यास साहाय्य होते, त्याप्रमाणे कलशाच्या विशिष्ट रचनेमुळे त्यातील पाण्यात स्वर्गलोकातील देवतांना प्रगट होऊन कार्य करणे सुलभ असते.

रथोत्सवात डोक्यावर कलश घेणार्‍या साधिकांच्या आंतरिक स्थितीनुसार त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण न्यूनाधिक होते. याउलट पाण्याचे ‘सकारात्मक ऊर्जा ग्रहण करणे, टिकवून ठेवणे आणि ती वाढवणे’, हे गुणधर्म पालटत नाहीत. त्यामुळे ब्रह्मोत्सवानंतर डोक्यावर कलश घेणार्‍या दोन साधिकांच्या तुलनेत त्यांनी डोक्यावर घेतलेल्या मंगल कलशांत पुष्कळ अधिक सकारात्मक ऊर्जा आढळून आली.

‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी करताना श्री. आशिष सावंत
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या http://goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

६. प्रश्न क्र. ६

ब्रह्मोत्सवानंतर काही साधक-साधिकांमध्ये केवळ १.५० मीटर ते ४ मीटर एवढीच सकारात्मक ऊर्जा आढळून आली; याउलट काही साधक-साधिकांमध्ये ३० मीटर ते ७२ मीटर एवढी सकारात्मक ऊर्जा आढळून आली. याचे कारण काय ?

६ अ. उत्तर

६ अ १. ब्रह्मोत्सवानंतर साधक-साधिका यांच्या आंतरिक स्थितीनुसार सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण न्यूनाधिक होत असणे : ‘ब्रह्मोत्सवानंतर काही साधक-साधिकांच्या मनावर ‘ब्रह्मोत्सवाच्या सेवेत माझे काही चुकले नाही ना ?’, याचा ताण होता, तसेच साधकांच्या मनातील ‘ब्रह्मोत्सवात उपस्थित असलेले साधक माझ्याविषयी काय विचार करत असतील ? तसेच मी ब्रह्मोत्सवात स्वतःच्या क्षमतेनुसार किंवा उत्तम प्रकारे सहभाग घेतला’, अशा स्वभावदोष आणि अहं यांच्याशी संबंधित विचारांमुळे त्यांची भावाची स्थिती न्यून झाली; परिणामी त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत घट झाली. ब्रह्मोत्सवानंतर काही साधक-साधिकांची आंतरिक स्थिती स्थिर होती आणि गुरु किंवा देव यांच्या स्मरणात रंगले होते. परिणामी त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा अधिक आढळून आली.’

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.८.२०२३)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.