आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून धर्मप्रसार करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा !

पू. संदीप आळशी

१. हिंदु राष्ट्र-स्थापनेकरता ‘आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार व्हावा’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संकल्प कार्यरत होणे

‘धर्माच्या अधिष्ठानावरच ‘हिंदु राष्ट्र’ उभे रहाणार असल्याने हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी सर्वत्र धर्मप्रसाराचे कार्य होणे नितांत आवश्यक आहे. धर्मप्रसाराचे कार्य होण्यामध्ये ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती यांपैकी ज्ञानशक्तीचे योगदान सर्वाधिक आहे. ज्ञानशक्तीच्या माध्यमातून कार्य होण्याचे सर्वांत प्रभावी माध्यम म्हणजे ‘ग्रंथ’ ! थोडक्यात ‘ग्रंथांच्या माध्यमातून धर्मप्रसार करणे’, ही सध्याच्या काळातील श्रेष्ठ साधना आहे. यासाठीच ‘आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार व्हावा’, ही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आत्यंतिक तळमळ आहे. या तळमळीपोटी ते आजही प्राणशक्ती अत्यल्प असल्याने आजारी असतांनाही ग्रंथकार्य गतीने होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ग्रंथकार्यासाठी एकप्रकारे त्यांचा संकल्पच झालेला आहे.

२. भीषण आपत्काळ आरंभ होण्यापूर्वीच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या कार्यात सहभागी होऊन शीघ्र ईश्वरी कृपेस पात्र व्हा !

२ अ. रामराज्यातील प्रजा सात्त्विक होती; म्हणून तिला श्रीरामासारखा आदर्श राजा मिळाला. रामराज्यासम सर्वांगसुंदर आणि आदर्श असे हिंदु राष्ट्र अनुभवता येण्यासाठी आजचा समाजही सात्त्विक होणे अपरिहार्य आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांतील ज्ञानाने समाज सात्त्विक (साधक) होऊन तो हिंदु राष्ट्रासाठी पोषक होणार आहे. यातूनच हिंदु राष्ट्राची जडणघडण होणार आहे.

२ आ. तिसरे महायुद्ध, महापूर इत्यादींच्या रूपांतील महाभयंकर आपत्काळातून वाचलो, तरच आपण हिंदु राष्ट्र पाहू शकू ! आपण साधना केली, तरच आपत्काळातून वाचू शकतो; कारण साधकांवर देवाची कृपा असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांतून सुयोग्य, सध्याच्या वैज्ञानिक युगातील पिढीला सहज पटेल असे वैज्ञानिक भाषेत आणि काळानुसार आवश्यक अशा साधनेचे ज्ञान मिळते. त्यामुळे या ग्रंथांचे महत्त्व असाधारण आहे.

२ इ. प्रत्येकाची प्रकृती आणि आवड यांनुसार त्याला अध्यात्माचे शिक्षण मिळाले, तर त्याच्यात साधनेची आवड लवकर निर्माण होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले विविधांगी विषयांवरील ग्रंथ संकलित करत असल्याने त्या माध्यमांतून अनेक जण आपापली प्रकृती आणि आवड यांनुसार साधनेकडे लवकर वळत आहेत.

२ ई. हिंदु राष्ट्र हे काही सहस्रो वर्षे टिकेल; परंतु ग्रंथांतील ज्ञान अनंत काळ टिकणारे असल्याने जसे हिंदु राष्ट्र लवकर येणे आवश्यक आहे, तितकीच घाई भीषण आपत्काळ चालू होण्यापूर्वी हे ग्रंथ प्रकाशित करण्याचीही आहे.

३. साधकांनो, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी ग्रंथकार्याची पताका फडकत ठेवण्यासाठी ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार काही साधक गेली २० – २५ वर्षे ग्रंथनिर्मितीची सेवा करत आहेत. हे साधक आता बर्‍यापैकी स्वयंपूर्णरित्या ग्रंथ सिद्ध करू शकतात. सनातनचे अनुमाने ५ सहस्रांहून अधिक ग्रंथ अजून सिद्ध करायचे आहेत. सध्या सेवा करत असलेले साधक आणखी २० – २५ वर्षे सेवा करू शकतात. त्यानंतर हे ग्रंथकार्य सांभाळण्यासाठी पुढच्या पिढीने आतापासूनच ग्रंथसेवेतील सर्व बारकावे, दृष्टीकोन, सात्त्विकतेच्या दृष्टीने मुखपृष्ठे आणि चित्रे सिद्ध करणे इत्यादी सखोलपणे शिकून घेणे आवश्यक आहे. साधकांनी आतापासूनच ही सेवा शिकण्यास प्रारंभ केल्यानंतर पुढे १० – २० वर्षांत ते स्वयंपूर्ण होऊ शकतील. सनातनच्या चैतन्यदायी ग्रंथकार्याची पताका फडकत ठेवण्याचे दायित्व आता सर्वस्वी आताच्या पिढीचेच आहे. ग्रंथसेवा ही श्रेष्ठ अशा ज्ञानशक्तीच्या स्तराची सेवा असल्याने शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून देणारीही आहे. यासाठी साधकांनो, आपली आवड आणि क्षमता यांनुसार ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा लाभ करून घ्या ! पालकांनो, तुम्हीही तुमची मुले आणि नातवंडे यांमध्ये असणारे गुण ओळखून त्यांना या नाविन्यपूर्ण साधना-क्षेत्राकडे वळण्यासाठी प्रोत्साहित करा !

४. विविध सेवांमध्ये सहभागी व्हा

ग्रंथसेवेच्या अंतर्गत संकलन, भाषांतर, संरचना, मुखपृष्ठ-निर्मिती, ग्रंथछपाईसंबंधाने करायच्या सेवा इत्यादी विविध सेवांमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी स्वत:ची माहिती सनातनच्या जिल्हासेवकांच्या माध्यमातून पाठवावी. ज्यांना समाजामध्ये जाऊन समष्टी साधना करणे शक्य नाही, ते संकलन आणि भाषांतर या सेवा शिकून घरी राहूनही त्या करू शकतात. त्यासाठी ते सनातनच्या ‘रामनाथी आश्रमात’ येऊन ग्रंथाची सेवा शिकून त्या करू शकतात. ग्रंथांची सेवा करणे हीसुद्धा विशेष महत्त्वाची परिणामकारक समष्टी साधना आहे.

संपर्क क्रमांक : ८१८०९६८६४०, (०८३२) २३१२६६४

इ-मेल : [email protected]

टपालासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, रामनाथी, फोंडा, गोवा ४०३ ४०१.’

– (पू.) संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे संकलक (२८.८.२०२४)