अल्पसंख्यांकांसाठी पाकिस्तानच्या तुलनेत भारत अधिक सुरक्षित !

गोव्यात नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत भारताचे नागरिकत्व मिळालेले जोसेफ फ्रान्सिस परेरा यांचे विधान

जोसेफ फ्रान्सिस परेरा

फोंडा, ३० ऑगस्ट (वार्ता.) – पाकिस्तानच्या तुलनेत भारत अल्पसंख्यांकांसाठी अधिक सुरक्षित असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आलेल्या जोसेफ फ्रान्सिस परेरा यांनी दैनिक लोकमतच्या प्रतिनिधीने त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीत केले आहे. गोव्याच्या स्वातंत्र्यापूर्वी गोव्यातून शिक्षण आणि नोकरी यांसाठी पाकिस्तानमध्ये गेलेले जोसेफ फ्रान्सिस परेरा आता गोव्यात परतले असून ११ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर त्यांना भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. ते या मुलाखतीत म्हणाले, ‘‘अल्पसंख्यांकांना रहाणे, काम करणे, अभ्यास करणे आणि मुक्तपणे जगणे, यासाठी भारत हे सर्वांत सुरक्षित ठिकाण आहे. इथे प्रत्येकाला त्याच्या धार्मिक आणि जातीय विविधतेचा विचार न करता अधिकार, सुविधा आणि समान संधी दिल्या जातात. त्यामुळे मला भारतीय नागरिक म्हणवून घेण्यात अभिमान आणि आनंद वाटत आहे. परदेशात मला सर्व काही मिळत होते; परंतु माझी मातृभूमी भारत आणि माझे राज्य गोवा यांची मला आठवण येत होती. मातृभूमी, माझे कुटुंब आणि संस्कृती यांविषयी मला असलेल्या तीव्र ओढीमुळे मला भारतीय नागरिकत्व हवे होते.’’

संपादकीय भूमिका 

भारतात अल्पसंख्यांक असुरक्षित असल्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर जो खोटा प्रचार केला जातो, त्याला परेरा यांचे विधान, ही चपराक आहे !