इम्तियाज जलील यांनी कोल्हापूर येथे मोर्चा काढल्यास मनसे आणि सकल हिंदु समाज प्रत्युत्तर देईल ! – विनायक आवळे, मनसे

पत्रकार परिषदेत डावीकडून रोहन निर्मळ आणि विनायक आवळे (उजवीकडे)

कागल (जिल्हा कोल्हापूर) – ‘एम्.आय.एम्.’चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी विशाळगड अतिक्रमणाच्या संदर्भात १९ जुलैला कोल्हापूर येथे मोर्चा काढणार असल्याचे समजले. याला आमचा तीव्र विरोध असून जलील आणि त्यांचे सहकारी यांना तात्काळ कोल्हापूर बंदीचा आदेश लागू करावा. त्यातून जर त्यांनी मोर्चा काढला, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सकल हिंदु समाज मोर्चाने प्रत्युत्तर देईल, अशी चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष विनायक आवळे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ उपस्थित होते.

विनायक आवळे पुढे म्हणाले, ‘‘काँग्रेसचे खासदार शाहू महाराज विशाळगडावरील झालेल्या उद्रेकानंतर तेथील ग्रामस्थांची पहाणी करण्यासाठी गेले होते. त्या प्रसंगी त्यांनी शिवभक्तांचा ‘अतिरेकी’ असा उल्लेख केला. याचा आम्ही तीव्र निषेध नोंदवतो आणि शाहू महाराज यांनी तमाम शिवभक्तांची क्षमा मागावी, अशी मागणी आम्ही करतो.’’