विश्वबंधुत्वाचा संकल्प करून आनंदवारीत सहभागी होण्यातच सध्याच्या पिढीचे हित !

पंढरीची वारी करतांना वारकरी

सामाजिक प्रसारमाध्यमे आणि दूरचित्रवाणी यांवरील काही अहवालांच्या माध्यमातून वारी जनसामान्यांपर्यंत पोचते, ती एक ‘इव्हेंट’ म्हणून ! लोक कसे ऊन-पावसात चालतात ? ‘पाऊले चालती पंढरीची वाट’, इत्यादी उत्सवी स्वरूपाची गाणी लावून हा सोहळा ‘कव्हर’ करण्याचा सर्वच माध्यमांचा प्रयत्न असतो. वारीच्या मागची तात्त्विक बैठक समजून घेण्याचा प्रयत्न क्वचित्च होतांना दिसतो.

आजच्या व्यसनाधीनतेच्या आणि मनःस्वास्थ्य बिघडलेल्या जगात पंढरीची वारी मोठा संदेश देते. अनेक उच्च विद्याविभूषित आणि चिंतनशील लोकांचा ओढा हल्ली पंढरीच्या वारीकडे लागला आहे. ‘झिंग झिंग झिंगाट’, आदी गाण्याच्या ठेक्यावर बेधुंदपणे व्यसनाधीन होऊन नाचणार्‍या आधुनिक पिढीला ‘ज्ञानोबा, तुकारामांची आर्त साद गुणगुणावी वाटेल, तेव्हा सामाजिक पालट जाणवेल. प्रतीके स्वीकारून आणि विचार हरवून गेलेल्या आजच्या पिढीला वारी हा एक ‘इव्हेंट’ आहे, असे वाटते.

श्रवण, मनन, निदिध्यासन इत्यादी ज्ञानप्राप्तीच्या पायर्‍यांवरून –

हे विश्वचि माझें घर । ऐसी मती जयाची स्थिर ।
किंबहुना चराचर । आपण जाहला ।।

– ज्ञानेश्वरी, अध्याय १२, ओवी २१३

अर्थ : हे विश्वच माझे घर आहे, असा ज्याचा दृढ निश्चय झालेला असतो, सर्व स्थावर-जंगमात्मक जगात मीच एक भासतो, असे ज्ञान ज्याच्या बुद्धीत दृढ झालेले असते.

हा संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा विश्वबंधुत्वाचा (सिटीझन ऑफ द वर्ल्ड) होण्याचा संकल्प करून आनंदवारीत सहभागी होण्यातच सध्याच्या पिढीचे हित सामावले आहे.’

(साभार :  त्रैमासिक ‘सद्धर्म’, जुलै २०१९)