सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी तुमकूर (कर्नाटक) येथील साधकांना आलेल्या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सौ. संगीता शशिधराचार्य

१ अ. ब्रह्मोत्सवाला जाण्यापूर्वी

सौ. संगीता शशिधराचार्य

अ. ११.५.२०२३ या दिवशी आम्हाला ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमासाठी रामनाथी, गोवा येथे जायचे होते. आम्ही सर्व साधक सकाळी ६.३० वाजता जाण्यासाठी सिद्ध होतो. त्या वेळी पाऊस जोरात पडत होता; म्हणून आम्ही सर्वांनी एकत्रित अर्धा घंटा निसर्गदेवतेचा नामजप केला. आम्ही नामजपाला आरंभ केला, तेव्हा पाऊस जोरात पडत होता; परंतु अर्ध्या घंट्यानंतर पाऊस पूर्णपणे थांबला. तेव्हा आम्हा सर्वांनाच गुरुदेवांचे अस्तित्व जाणवले आणि आमची भावजागृती झाली.

आ. आम्ही ज्या वाहनाने जाणार होतो, त्या वाहनाच्या पुढील भागाला मी परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र लावले. त्या वेळी ते छायाचित्र मला जिवंत झाल्यासारखे वाटले. गुरुदेवांचे छायाचित्र पहातांना त्यांच्या ‘मुखावरील हास्यात वाढ झाली आहे’, असे मला जाणवले आणि त्यामुळे माझा भाव जागृत झाला.

१ आ. ब्रह्मोत्सवासाठी जातांना

अ. प्रत्येक वेळी ‘गुरुदेव इथेच आहेत’, असे मला वाटत होते. ‘प्रवासातील आमच्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी गुरुदेव आधीच वाहनात बसले आहेत’, असे मला जाणवले. त्यामुळे संपूर्ण प्रवासात आम्हाला कोणत्याच अडचणी आल्या नाहीत.

आ. आम्ही प्रवास करत असतांना श्री गुरु श्रीकृष्णाप्रमाणे आमच्या पुढे होते. त्या वेळी आम्ही सर्व साधक गोप-गोपींप्रमाणे वाहनात बसलो होतो. आम्ही प्रवास करत असतांना ‘मार्गातील झाडे-वेली, पशूपक्षी आमच्या समवेत बोलत आहेत आणि आपला आनंद व्यक्त करत आहेत’, असे मला जाणवत होते. तेव्हा आमची पुष्कळ भावजागृती झाली.

१ इ. ब्रह्मोत्सवाच्या वेळी

१ इ १. आम्ही ब्रह्मोत्सव असलेल्या पटांगणात प्रवेश केला. त्या वेळी तेथील चैतन्य आणि गुरुतत्त्व अनुभवतांना आमच्या डोळ्यांतून आपोआप भावाश्रू येऊ लागले.

१ इ २. भगवंताच्या दर्शनाने ‘आपले प्रारब्ध आणि त्रास नष्ट होतात’, याची अनुभूती येणे : मला ब्रह्मोत्सवाच्या संदर्भात सेवा दिली. तेव्हा माझ्या शारीरिक अडचणी दूर होण्यासाठी मला नामजप करण्यास सांगितला होता; परंतु तो नामजप माझ्याकडून पूर्ण होत नव्हता. त्यामुळे माझ्या शारीरिक अडचणींची तीव्रता वाढली. मला गुरूंचे दर्शन झाल्यानंतर ३ – ४ दिवसांतच माझा शारीरिक त्रास पुष्कळ उणावला. भगवंताच्या दर्शनाने ‘माझे प्रारब्ध आणि त्रास नष्ट झाले’, याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला.’

२. सौ. चेतन शंकर 

सौ. चेतन शंकर

२ अ. ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमापूर्वी

१. ‘आम्ही ब्रह्मोत्सवासाठी गोव्याला पोचलो. तेव्हा सर्व निर्जीव वस्तू आणि निसर्ग आमच्याप्रमाणेच ‘सच्चिदानंद परब्रह्म  डॉ. आठवले यांच्या दर्शनाची आतुरतेने वाट पहात आहे’, असे मला जाणवले.

२. गुरुदेवांचे छायाचित्र असलेले ‘फ्लेक्स’ ठिकठिकाणी लावले असल्यामुळे वातावरणात शांतता जाणवत होती. त्यांचे छायाचित्र पाहून ‘गुरुदेव तेथेच उभे आहेत’, असे मला वाटत होते.

३. कार्यक्रमाचे नियोजन भावपूर्ण झाले होते. त्यामुळे आम्हाला तेथील स्पंदने चांगली जाणवत होती.

४. कार्यक्रमाच्या आधी गुरुदेवांच्या प्रवचनाची ध्वनीफित लावली होती. ती ऐकतांना माझे गुरुस्मरण चालू झाले. तेव्हा ‘कुणाशीही बोलू नये आणि शांत ऐकत रहावे’, असे मला वाटत होते.

२ आ. कार्यक्रमाच्या वेळी

१. गुरुदेव रथातून येत असतांना मला वातावरणात शांतता आणि आनंद जाणवला.

२. गुरुदेव रथातून साधकांच्या जवळून जात होते, तेव्हा ‘आम्ही कोणतेही तप केले नाही किंवा त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधनेचे प्रयत्नही केले नाहीत, तरीही गुरुदेव आम्हाला दर्शन देत आहेत’, यासाठी कृतज्ञता वाटली.

३. ‘गुरुदेव आम्हा सर्व साधकांवर चैतन्याचा वर्षाव करत आहेत’, असे मला जाणवले.

४. मी रथदर्शनाला गेलो होतो. तेव्हा मी तेथे पडलेली एक गुलाबाची पाकळी उचलून घेतली. त्या वेळी ‘मला गुरुदेवांचा प्रसाद मिळाला आणि आता अन्य काही नको’, असे मला वाटले.

५. गुरुदेवांची प्रकृती ठीक नसतांनाही त्यांनी आम्हाला दर्शन दिले, हे आठवून माझ्या डोळ्यांतून पुनःपुन्हा भावाश्रू येत होते. गुरुदेवांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचितशक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना आध्यात्मिक उत्तराधिकार दिले, तेव्हा ‘आता आपल्याला तीन गुरु मिळाले आहेत’, असे मला वाटले.

‘गुरुदेव, आमच्याकडून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीची सेवा करून घ्या, अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो आणि कार्यक्रमातून चैतन्य मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.’

(सर्व सूत्रांचा दिनांक ३.६.२०२३)


रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या चंडीयागाचे ‘ऑनलाईन’ प्रक्षेपण पहातांना आलेल्या अनुभूती

१४.५.२०२३ आणि १५.५.२०२३ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या रामनाथी आश्रमात चंडीयाग झाला होता. त्या वेळी सौ. चेतन शंकर यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. ‘१४.५.२०२३ या दिवशी चंडीयागाला आरंभ झाला. तेव्हा ‘यागातून सर्वत्र सात्त्विकता पसरत आहे’, असे मला जाणवले.

२. चंडीयाग चालू असतांना माझा नामजप आपोआप होत होता आणि ‘माझ्या शरिरावरील आवरण वेगाने निघत आहे’, असे मला जाणवले.

३. ‘होमाचा धूर माझ्या भोवती पसरत आहे’, असे मला जाणवले.

४. मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या चेहर्‍याभोवती पांढरे वलय दिसत होते.

५. मला चाफा आणि मोगरा या फुलांचा सुगंध येत होता.

मला अंतर्मुख करणारे भगवान श्रीकृष्ण, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) यांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– सौ. चेतन शंकर, तुमकूर, कर्नाटक. (३.६.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक