The Diary Of West Bengal : ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’च्या निर्मात्यांना चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी पाकमधील आतंकवादी संघटनेकडून धमकी

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सरकारही चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये खोडा घालत असल्याचाही निर्मात्यांचा आरोप

मुंबई – ‘द डायरी ऑफ वेस्ट बेंगाल’ चित्रपट प्रदर्शित करू नये; म्हणून पाकिस्तानमधील आतंकवादी संघटनेकडून धमक्या मिळत आहेत, अशी माहिती चित्रपटाचे निर्माते जितेंद्र नारायण सिंह त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. तसेच बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकार चित्रपटाचे प्रदर्शन राज्यात होऊ नये, यासाठी प्रयत्न करत आहे, असा आरोपही त्यागी यांनी केला.

सौजन्य : Bollygrad Studioz

जितेंद्र त्यागी पुढे म्हणाले की,

१. आम्ही एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट बनवला होता. त्यासाठी पाकिस्तानातील कराची येथील ‘जामिया दारूल उलूम’ या आतंकवादी संघटनेने आमच्या विरोधात फतवा (इस्लामी कायद्यानुसार एखाद्या सूत्रावर इस्लाममधील मान्यताप्राप्त व्यक्ती किंवा संस्था यांनी दिलेला निर्णय) प्रसारित केला आहे. यात चित्रपट प्रदर्शित न करण्याची धमकी दिली आहे. मला सांगा, आता चित्रपट भारतात बनवण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी पाकिस्तानस्थित आतंकवादी संघटनांची अनुमती घ्यावी लागेल का ?

२. ‘बंगालचे ममता बॅनर्जी सरकार पाकिस्तानातील आतंकवादी संघटनेचे लोक चालवत आहेत’, हे आता आपण समजून घेतले पाहिजे का ? कारण त्यांनाच चित्रपट प्रदर्शित होण्यात अडचण आहे आणि येथे ममता बॅनर्जी यांचे सरकार तो प्रदर्शित होऊ देत नाही. या आतंकवाद्यांशी त्यांचे काय संबंध आहेत, असे समजायचे ?

३. अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि चित्रपट बनवण्याचे स्वातंत्र्य आपल्या देशात केवळ साम्यवादी विचारसरणीच्या लोकांनाच उपलब्ध आहे का ? चित्रपट बनवण्याचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांवर आमच्यासारख्या स्वतंत्र विचारसरणीच्या लोकांना काही अधिकार नाही का ?

४. या चित्रपटाच्या माध्यमातून आतापर्यंत आमची जी हानी झाली आहे, त्याची भरपाई कोण करणार ?

५. जर बंगालमध्ये सर्व काही ठीक चालले असेल, तर ममता सरकार आमचा चित्रपट प्रदर्शित का होऊ देत नाही ? ममता बॅनर्जी यांचे सरकार आमच्या मागे का लागत आहे ? चित्रपट बनवून आम्ही गुन्हा केला आहे का ? ममता सरकार कोणतेही स्पष्ट कारण का देत नाही ? ममता बॅनर्जी यांचे सरकार बंगालमधील रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना साहाय्य करत नसेल, तर ते हे उघडपणे का सांगत नाही ?

काश्मीर फाइल्स’, ‘द केरल स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित होतात, तर आमचा चित्रपट का नाही ? – दिग्दर्शक सनोज मिश्रा

चित्रपटाचे दिग्दर्शक सनोज मिश्रा

चित्रपटाचे दिग्दर्शक सनोज मिश्रा म्हणाले की, या चित्रपटामध्ये आम्ही बंगालमधील वाढत्या संघटित गुन्हेगारी आणि लक्ष्यित हिंसाचार यांकडे लक्ष वेधले आहे, आता ही गोष्ट केवळ त्याचे समर्थक असलेल्यांनाच वाईट वाटू शकते, मग आम्ही काय करावे ? ‘मिशन कश्मीर’, ‘हैदर’, ‘उडता पंजाब’, ‘काश्मीर फाइल्स’, ‘द केरल स्टोरी’ सारखे चित्रपट या देशात प्रदर्शित होऊ शकतात, तर मग आमचा चित्रपट प्रदर्शित करण्यात काय हानी आहे ? माझा हा चित्रपट बनवून पूर्ण झाला आहे आणि तो २७ एप्रिलला संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे.

‘द डायरी ऑफ वेस्ट बेंगाल’च्या प्रदर्शनासाठी सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ !

‘द डायरी ऑफ वेस्ट बेंगाल’ चित्रपट केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्डाने) पाहिला असून त्यात त्याला मान्यता मिळाली आहे; मात्र चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी बोर्डाकडून प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे. सेन्सॉर बोर्डाच्या फेर्‍या मारून निर्माता-दिग्दर्शक कंटाळले आहेत. सेन्सॉर बोर्ड या चित्रपटाबाबत काहीही बोलण्याचे टाळत आहे. त्यामुळे निर्मात्यांची आर्थिक हानी होत असल्याचे म्हटले जात आहे.

संपादकीय भूमिका

‘सेन्सॉर बोर्ड केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतांना अशी स्थिती का येते ?’, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उत्पन्न होतो !

काय आहे चित्रपटाच्या विज्ञापनामध्ये (ट्रेलर) ?

‘द डायरी ऑफ वेस्ट बेंगाल’ चित्रपट बंगालच्या राजकीय आणि धार्मिक स्थितीचे चित्रण आहे. बंगालमध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमान यांना तृणमूल काँग्रेस सरकार स्वतःच्या राजकीय लाभासाठी राज्यात पद्धतीशीरमध्ये वसवत आहे. हे मुसलमान येथे हिंसाचार करत असल्याने हिंदूंना तेथून पलायन करावे लागत आहे. हिंदूंवर अत्याचार होत आहेत. ममता बॅनर्जी सरकार मुसलमानांना झुकते माप देत आहे, असे या चित्रपटाच्या विज्ञापनामधून दाखवण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

भारतात एखादा चित्रपट प्रदर्शित करण्यात येऊ नये, यासाठी भारतीय नागरिकाला पाकमधून धमक्या येत असतील, तर ते भारताला लज्जास्पद ! भारताने यावर कठोर उपाययोजना काढणे आवश्यक आहे !