T Raja Singh : आम्हाला एकाही मुसलमानाच्या मताची आवश्यकता नाही ! – आमदार टी. राजासिंह

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांचे विधान  

भाजप आमदार टी. राजासिंह

भाग्यनगर (तेलंगाणा) – मला माझ्या विधानसभा मतदारसंघात रहाणार्‍या एकाही मुसलमानाचे मत नको. आमचा लढा केवळ त्यांच्याशी आहे. तेलंगाणात आम्ही गोहत्येच्या आणि लव्ह जिहादच्या विरोधात लढतो. त्यामुळे मुसलमान मला मत देत नाहीत. मला त्यांची मते मिळणार नाहीत. त्यामुळे मला त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही. मला गायीची हत्या करणार्‍यांचे मत नको. आजही नको आणि भविष्यातही नको, असे विधान येथील गोशामहल मतदारसंघातील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केले. ‘जी ऊर्जा तुम्ही मुसलमानांवर खर्च करता, ती हिंदूंवर खर्च केली, तर अधिक लाभ होईल, ही गोष्ट भाजपच्या नेत्यांनी ध्यानात ठेवावी’, असेही राजासिंह यांनी या वेळी विधान केले. भाग्यनगर येथील लोकसभा मतदारसंघाचे प्रसाराचे दायित्व टी. राजासिंह यांच्याकडे आहे. येथे ६० टक्के मुसलमान मतदार आहेत. येथे सध्या एम्.आय.एम्.चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी खासदार असून ते पुन्हा येथे निवडणुकीत उभे राहिलेले आहेत.

टी. राजासिंह यांनी मुलाखतीत मांडलेली काही सूत्रे

१. मुसलमानांकडून आता काशी, मथुरा आणि तेजोमहाल घेणे शेष आहे. आपला विष्णुस्तंभ टिकला आहे. हे लोक भोजशाळेतील सरस्वतीमातेचे मंदिर तोडून तेथे नमाजपठण करतात. हे सर्व परत घेणे अजून शेष आहे.

२. मी जिथे जातो तिथे धर्माबद्दल बोलतो. ज्यांनी माझा धर्म नष्ट करण्याची योजना आखली, लव्ह जिहादला प्रोत्साहन दिले, लोकांचे धर्मांतर केले, माझे मठ आणि मंदिरे उद्ध्वस्त केली, त्यांचा इतिहास मी नक्कीच सांगेन.

३. आजचा हिंदू मार खाणारा नाही. पूर्वी सरकार हिंदूंच्या बाजूने उभे न राहिल्याने लोक मार खाऊन घरी बसायचे. लोकांना भीती होती की, त्यांनी काहीही सांगितले किंवा केले, तर त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद होईल.

४. निवडणूक प्रचारासाठी मी प्रत्येक राज्यात जातो. भारताला हिंदु राष्ट्र बनवणे हे माझे ध्येय आहे. या संकल्पाने मी मोर्चे, सभा घेतो. आजपर्यंत माझ्या सभेपूर्वी किंवा नंतर एकही दंगल झालेली नाही.

५. आमच्या हिंदु राष्ट्रात देशभक्त मुसलमानांना जागा असेल. जे लोक देशात रहातात आणि देश तोडण्याचे विचार करतात, जे देशात राहून आतंकवाद्यांना साथ देतात, ज्यांची  आतंकवादी मनोवृत्ती आहे, अशा लोकांना हिंदु राष्ट्रात स्थान असू शकत नाही.

६. कर्नाटक असो, केरळ असो वा तेलंगाणा, जिथे काँग्रेसची सत्ता आहे तिथे हिंदूंवर अत्याचार झाले आहेत.

७. असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचा भाऊ अकबरुद्दीन हे शांततेला सर्वांत मोठा धोका आहेत. ज्या ठिकाणी ते भाषण करून परतले तेथील मुसलमानांनी काम सोडून आतंकवाद्यांचा विचार करायला आरंभ केला. कायद्याने ओवैसींच्या सनातन धर्मविरोधी सभांवर बंदी घातली पाहिजे.