‘प्रत्येक गोष्ट सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आहे’, या भावाने प्रत्येक कृती परिपूर्ण करणारे ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे रामनाथी आश्रमातील श्री. रामानंद परब (वय ४१ वर्षे) !

‘एकदा काही कारणास्तव मला रामनाथी आश्रमात निवासाला असणारे साधक श्री. रामानंद परब (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४१ वर्षे) यांच्या खोलीत जाण्याची संधी मिळाली. तेव्हा मला जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

श्री. रामानंद परब

१. श्री. रामानंद परब यांच्या खोलीत गेल्यावर जाणवलेली सूत्रे

श्रीमती अलका वाघमारे

१ अ. श्री. रामानंद परब यांच्या खोलीत प्रवेश करताच काही क्षण माझे मन निर्विचार झाले.

१ आ. ‘श्री. रामानंद यांच्या खोलीतील वातावरण अत्यंत शांत, शीतल आणि भावमय आहे’, असे मला जाणवले.

१ इ. श्री. रामानंद यांच्या खोलीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवून भाव जागृत होणे : त्यांची खोली न्याहाळत असतांना मला तिथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवले. काही क्षण ‘मी जणू सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या निवासकक्षातच आहे’, असे वाटून माझा भाव जागृत झाला.

२. श्री. रामानंद यांच्यातील नीटनेटकेपणा आणि व्यवस्थितपणा

२ अ. खोलीतील प्रत्येक वस्तू स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवलेली असणे : रामानंददादांनी त्यांच्या खोलीतील प्रत्येक वस्तू अतिशय नीटनेटकेपणाने ठेवली आहे. पलंगावर अंथरलेल्या चादरीपासून ते दारात घातलेल्या पायपुसण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आणि जागच्या जागी नीट ठेवली आहे. ‘वस्तू तिरकी झाली आहे, जागेवरून हलली आहे, वेडीवाकडी ठेवली आहे किंवा चुरगळली आहे’, असे मला कुठेही दिसले नाही. त्यांच्या खोलीतील माळ्यावर ठेवलेले साहित्यही नीट ओळीने लावून व्यवस्थित झाकून ठेवले आहे. माळ्यावरील साहित्य पडद्यामागे आहे; म्हणून कसेही ठेवलेले नाही.

२ आ. बाहेरगावी जातांनाही खोली अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित आवरून ठेवणे : खरेतर त्याच दिवशी पहाटे रामनंददादा बाहेरगावी गेले होते; परंतु त्यांनी खोली अतिशय व्यवस्थित आवरून ठेवली होती. गावाला जातांना ‘घाईने काही साहित्य तसेच ठेवले आहे किंवा काही आवरायचे राहिले आहे’, असे काहीच दिसत नव्हते. खोलीतील सगळ्या वस्तू अगदी नीटनेटक्या, व्यवस्थित आणि जिथल्या तिथे ठेवलेल्या होत्या.

२ इ. श्री. रामानंद यांची खोली प्रतिदिनच स्वच्छ, आवरलेली आणि नीटनेटकी असणे : सध्या आश्रमाच्या काही भागाचे नूतनीकरण चालू असल्याने दिवसभर सगळीकडे बरीच धूळ साचते. निवासकक्षांमध्येही धूळ येते; परंतु रामानंददादांच्या खोलीत कुठेच धूळ दिसली नाही. घरी कुणी पाहुणे येणार असतील, तर आपल्याला खोल्या नीट आवरून ठेवणे, पलंगावरील चादरी आणि पायपुसणी पालटणे, असे करावे लागते; परंतु रामानंददादांची खोली आणि खोलीतील प्रत्येक वस्तू स्वच्छ अन् तिच्या जागेवर व्यवस्थित होती. नंतर मला कळले, ‘रामानंददादांची खोली नेहमीच स्वच्छ, आवरलेली आणि नीटनेटकी असते.’

२ ई. खोलीत श्री. रामानंद आणि त्यांची पत्नी सौ. श्रावणी असे दोघेच रहात असूनही खोलीतील स्वच्छतेच्या सेवांचे नियोजन केलेले असणे : खोलीत श्री. रामानंददादा आणि त्यांची पत्नी सौ. श्रावणी हे दोघेच रहात असूनही त्यांनी खोलीच्या स्वच्छतेमधील ‘कुठली सेवा कुणी आणि कुठल्या दिवशी करायची ?’, याचे नियोजन केले होते. खोलीच्या दारामागे लावलेला सेवेच्या नियोजनाचा कागद पाहून ते माझ्या लक्षात आले.

२ उ. स्वच्छतेच्या नियोजनाचा कागदही नवीन करून लावल्याप्रमाणे नीटनेटका आणि स्वच्छ असणे : स्वच्छतेच्या नियोजनाच्या कागदावर सेवेपुढील रकान्यात सेवा झाल्यावर पेन्सिलीने केलेल्या खुणाही अगदी व्यवस्थित केल्या होत्या. आधीच्या सप्ताहात केलेल्या खुणा खोडरबरने खोडलेल्या असूनही नियोजनाचा कागद अगदी स्वच्छ दिसत होता. खोडल्यामुळे कागदावर पेन्सिलीचा काळसरपणा आला नव्हता. खोडल्याच्या खुणा दिसत नसल्यामुळे ‘जणूकाही नियोजनाची नवीन छापील प्रत काढून लावली आहे’, असे वाटण्याइतका तो कागद स्वच्छ होता.

३. श्री. रामानंद यांना अनेक शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास असूनही खोली स्वच्छतेतील बहुतेक सेवा श्री. रामानंद यांनी करणे : रामानंददादांना तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. काही वेळेला त्रासामुळे त्यांना स्वतःचेही काही करणे शक्य होत नाही. त्या त्रासाच्या निवारणार्थ त्यांना प्रतिदिन काही घंटे नामजपादी उपाय करावे लागतात. त्यांचे शरीरस्वास्थ्यही ठीक नसते आणि त्यांना काही तातडीच्या महत्त्वपूर्ण सेवाही करायच्या असतात. असे असूनही ‘ते खोलीतील अधिकाधिक सेवा करतात’, असे त्या नियोजनावरून माझ्या लक्षात आले.

४. श्री. रामानंद यांच्यातील भाव !

अ. रामानंददादांचे अक्षरही अत्यंत सुंदर आणि रेखीव आहे. त्या अक्षरांतूनही भावाची स्पंदने प्रक्षेपित होतात.

आ. खोली स्वच्छतेच्या नियोजनाचा कागद हाताळण्याच्या त्यांच्या पद्धतीवरूनही त्यांच्यामधील भाव लक्षात येतो. त्यांच्यात असलेला भाव त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवतो.

५. शिकायला मिळालेली सूत्रे

अ. प्रत्येक वस्तू श्री गुरूंनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ.आठवले यांनी) दिली आहे. त्यामुळे तिची हाताळणी किंवा वापर भावपूर्ण करायला हवा. ‘वस्तू हाताळतांना कृतज्ञता असायला हवी’, हेही शिकायला मिळाले.

आ. ‘निवासकक्षाची स्वच्छता हे केवळ पत्नीचे दायित्व आहे किंवा खोलीत निवासाला असणार्‍या दुसर्‍या साधकाचे दायित्व आहे’, अशी कुठलीही अपेक्षा नसावी. ‘ते माझेच दायित्व आहे’, या भावाने कृती करायला हवी.

इ. ‘खोलीच्या स्वच्छतेमध्ये स्वतःचाही सहभाग असायला हवा’, हा तत्त्वनिष्ठ विचार साधनेला पूरक असल्यामुळे पती-पत्नी दोघांचीही किंवा खोलीतील साधकांची सेवा होऊन त्या माध्यमातून साधनाही होते. ‘केवळ आश्रमात नव्हे, तर आपण कुठेही असलो, तरी असेच असायला हवे’, हे मला शिकता आले.

ई. साधनेच्या दृष्टीने ‘नीटनेटकेपणा किंवा साधना म्हणून प्रत्येक गोष्टीकडे पहाणे आवश्यक आहे’, हे माझ्या मनावर बिंबले.

उ. यामुळे ‘एकमेकांना साहाय्य करणे आणि प्रेमभाव’ हे गुण वाढण्यास साहाय्य होते. ‘रामानंददादांमध्ये हे दोन्ही गुण आहेत’, असे माझ्या लक्षात आले.

सर्वांनीच अशा प्रकारे निवासकक्षाची स्वच्छता केली, तर नीटनेटकेपणा आणि त्या अनुषंगाने काही गुण अंगी बाणण्यास साहाय्य होईल. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे अस्तित्वही सर्वत्र जाणवेल, यात शंका नाही.’

– श्रीमती अलका वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.३.२०२३) ॐ

श्री रामानंद परब यांच्यातील साधकत्व आणि भाव सर्वांनाच अंतर्मुख करणारा असणे : ‘रामानंददादांमधील नीटनेटकेपणा, प्रत्येक गोष्टीकडे साधना म्हणून पहाण्याची वृत्ती, त्यांच्यातील साधकत्व आणि भाव सर्वांनाच अंतर्मुख करणारा आहे. दादांना आध्यात्मिक त्रास असूनही दादांची साधनेची तळमळ आत्मसात करण्यासारखी आहे. आजवरच्या सामाजिक जडणघडणीचा किंवा पुरुषप्रधान संस्कृतीचा विचार करता, ‘पुरुष असूनही रामानंददादा पत्नीच्या बरोबरीने किंबहुना तिच्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी खोलीतील सेवांचा वाटा उचलतात आणि सगळे नीटनेटकेपणाने करतात’, हे शिकण्यासारखे आहे. मग ‘ज्या खोल्यांमध्ये केवळ साधिका रहातात, त्यांच्या खोल्या किती नीटनेटक्या असायला पाहिजेत ?’ या सूत्रावर सर्वांनीच अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. पुरुष साधकही याला अपवाद नाहीत.’ – श्रीमती अलका वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.३.२०२३) ॐ
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे
निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.