हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी मी धर्मसभा घेणारच ! – टी. राजासिंह, आमदार, भाजप

  • चोपडा (जिल्हा जळगाव) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत धर्म आणि राष्ट्र कार्य करण्याचा हिंदूंचा निर्धार !

  • सभेला १४ सहस्र हिंदूंची उपस्थिती !

  • चोपडा येथील गोरक्षकांना पोलीस संरक्षण देण्याची टी. राजासिंह यांची मागणी !

चोपडा (जिल्हा जळगाव) सभेला उपस्थित सहस्रावधी हिंदु धर्मप्रेमी

चोपडा, २३ फेब्रुवारी (वार्ता.) – माझ्या सभा न होण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत; पण मी थांबणार नाही. मी हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी धर्मसभा घेणारच ! ज्या ज्या गडांवर अतिक्रमण झाले आहे, ते मुख्यमंत्र्यांनी पाडण्याचे आदेश द्यावे. चोपडा येथे गायींची कत्तल करणार्‍या धर्मांध मुसलमानांकडून पोलिसांवर आक्रमण करण्यात आले. त्यामुळे गोरक्षण करणार्‍या गोरक्षकांना पोलिसांनी संरक्षण द्यावे, अशा मागण्या भाग्यनगर येथील भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनी केले. २१ फेब्रुवारी या दिवशी चोपडा येथील खानदेश मिल पटांगणात आयोजित ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’त ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे जळगाव समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर आणि समितीच्या अहिल्यानगर येथील समन्वयक कु. प्रतीक्षा कोरगावकर उपस्थित होत्या. ‘सकल हिंदु समाज’ या संघटनेने आयोजित केलेल्या या सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह आजूबाजूच्या गावातील एकूण १४ सहस्र धर्मप्रेमी हिंदू उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन कु. रागेश्री देशपांडे यांनी केले.

आमदार टी. राजासिंह म्हणाले की,

१. तुम्ही आज कपाळावर जो टिळा लावता, ती छत्रपती शिवाजी महाराजांची देण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानावर जो ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला, ती नीती छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहे.

२. जर छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर आपण हिंदु राहिलो नसतो. तेव्हा एकटा औरंगजेब होता. आज देशात अनेक औरंगजेब निर्माण झाले आहेत.

३. औरंगजेबाचे राज्य असतांना हिंदूंचे इस्लामीकरण करण्यात आले. आता हिंदु धर्माचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.
४. छत्रपती शिवरायांनी वयाच्या १२ व्या वर्षी गोमातांचे रक्षण केले होते. तुम्हीही गोरक्षण करा, मोठे पुण्य मिळेल.

हिंदूंनी संघटित होऊन धर्मद्वेष्ट्यांचा वैध मार्गाने विरोध करावा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सद्गुरु नंदकुमार जाधव

हिंदू जी प्रतिज्ञा घेतात, ती पूर्ण करतात, हा इतिहास आहे. प्रभु श्रीरामाने रामराज्याची स्थापना केली. भगवान श्रीकृष्णाने धर्मराज्य स्थापन केले, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिज्ञा करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्याप्रमाणे अयोध्या येथे श्रीराममंदिर निर्माण करण्याचे ठरले आणि ते हिंदूंनी साध्य करून दाखवले. हिंदु धर्म नष्ट करण्याचा घाट घातला जात आहे. हिंदूंनी संघटित होऊन धर्मद्वेष्ट्यांचा वैध मार्गाने विरोध करावा !

उपस्थित मान्यवर

सभेसाठी सर्वश्री आबा देशमुख, महेश पवार, अमृत सचदेव, अधिवक्ता धमेंद्र सोनार, प्रवीण जैन, श्याम सोनार, राजू शर्मा, डॉ. रोहन पाटील यांनी परिश्रम घेतले. या वेळी माजी आमदार कैलास पाटील, राजाराम पाटील, गजेंद्र जयस्वाल, भय्या पवार, नरेश महाजन, शाम परदेशी, यशवंत चौधरी, राजू स्वामी, नीलेश बारी, भगतसिंह पाटील, साक्षी गुजराथी यांसह धारकरी स्वयंसेवक उपस्थित होते. तसेच ‘चोसाका’ या संघटनेचे अध्यक्ष चंद्रहास गुजराथी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, डॉ. केतकी पाटील, पंकज बोरोले यांचीही उपस्थिती लाभली.

हिंदु संघटित झाल्यास रामराज्य येईलच ! – कु. प्रतीक्षा कोरगावकर, हिंदु जनजागृती समिती

कु. प्रतीक्षा कोरगावकर

‘या देशात जिजाऊंचा शिवा पाहिजे’, असे जर सर्वांना वाटत असेल, तर घराघरात जिजाऊ पाहिजे आणि प्रत्येक घरात आई जिजाऊ हवी असेल, तर गावागावांत अशी सभा होणे आवश्यक आहे. हिंदु धर्म टिकवायचा असेल, तर प्रत्येकाने संघटित व्हायला हवे. सर्वजण संघटित झाले, तर रामराज्य यायला वेळ लागणार नाही.

छत्रपती शिवरायांच्या विचारांचा आदर्श घेऊन कार्य करा ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

श्री. प्रशांत जुवेकर

आमदार टी. राजासिंह हे अनेक संकटांवर मात करून आपल्या भेटीसाठी आले आहेत. शासनकर्ते केवळ शब्द देतात आणि निघून जातात; मात्र छत्रपती शिवरायांनी शब्द कधीही मोडला नाही. त्यांनी नेहमीच आदर्श कार्य केले. असे कार्य हिंदूंना करायचे आहे.

सभेच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त !

सभेच्या ठिकाणी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे उपस्थित होते. सभेच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.

न्यायालयाच्या आदेशानंतर सभा पार पडली !

सभेला पोलिसांनी अनुमती नाकारली होती. मनसेचे नेते श्री. अनिल वानखेडे आणि माजी नगरसेवक श्री. राजाराम पाटील यांनी अधिवक्ता धमेंद्र सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली सभेला अनुमती मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात याचिका प्रविष्ट केली. सभा होण्यासाठी मोठ्या कष्टाने प्रयत्न केले. शेवटी न्यायालयाने सभेला अनुमती दिल्याने सभा पार पडली.