Pakistan Army Chief : (म्हणे) ‘भारत पाकच्या भूमीत घुसून आमचे नागरिक मारत आहे !’ – पाकचे सैन्यप्रमुख

भारताच्या प्रत्येक आक्रमणाला उत्तर देऊ !

पाकचे सैन्यप्रमुख जनरल असीम मुनीर

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारत आपल्या भूमीवर आतंकवाद वाढवत आहे. भारत आता एवढ्या टोकाला गेला आहे की, तो देशात घुसून पाकिस्तानी नागरिकांची हत्या करत आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन ही भारताची सवय होत चालली आहे, असे हास्यास्पद वक्तव्य पाकचे सैन्यप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी केले. ५ फेब्रुवारी या दिवशी पाकमध्ये कथित ‘काश्मीर एकता दिवस’निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मुनीर पुढे म्हणाले की,

१. आता अनेक देश याविरोधात आवाज उठवत आहेत. आमच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही हे कट उधळून लावत राहू.

२. जर कुणी देशावर आक्रमण केले किंवा आमच्या प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन केले, तर सैन्य पूर्ण शक्तीनिशी प्रत्युत्तर देईल.

३. गेल्या ७६ वर्षांत अनेक काश्मिरींनी बलीदान दिले आहे. आज त्यांना आदरांजली वहाण्याची संधी आहे. काश्मीरमध्ये भारतीय सैन्य सातत्याने अत्याचार करत आहे. (जिहादी आतंकवाद्यांचा नायनाट हा पाकसारख्या जिहाद्यांच्या देशाला अत्याचार वाटणारच ! – संपादक) त्याविरोधात तेथील लोक संघर्ष करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • एखाद्या चोराने पोलिसाला ‘चोर’ म्हणणे, हे जेवढे हास्यास्पद आहे, यापेक्षा अनेक पटींनी हास्यास्पद हे जिहादी आतंकवादाचा निर्माता पाक याने आतंकवादाचा नायनाट करण्यासाठी सज्ज असलेल्या भारतावर आरोप करणे होय !
  • पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान हे प्रांत पाकच्या हातातून निसटण्याच्या मार्गावर असतांना पाकने बाह्य आक्रमणांपेक्षा अंतर्गत बंड कसा नियंत्रणात आणता येईल, याकडे लक्ष दिले, तर ते त्याच्यासाठी हितावह असेल !