Rohit Pawar Baseless Allegations : इतिहासाचे दाखले देतांना चुकलेली वक्तव्ये त्वरित मागे घ्या !

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराजांच्या विधानावरून शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांचे बिनबुडाचे आरोप !

शरद पवार गटाचे नेते रोहित पवार व प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारी या दिवशी झालेल्या सोहळ्याच्या कालावधीत श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराजांनी आपल्या मार्गदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. त्यांच्या विधानाच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी ट्वीट करत म्हटले, ‘‘आपण इतिहासाचे दाखले देतांना चुकत आहात. प्रभु श्रीराम प्राणतिष्ठापना सोहळ्याच्या एवढ्या मोठ्या पवित्र आणि प्रतिष्ठित व्यासपिठावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल, असे बोलणे योग्य नाही. ते धार्मिक होतेच; पण त्यांनी कधीही सन्यास घेण्याचा विचार केला नाही. त्यांनी केवळ आपल्या कर्तव्याला म्हणजेच स्वराज्य स्थापनेला सर्वोच्च महत्त्व दिले. शिवरायांचे स्वराज्य म्हणजेच रयतेचे राज्य हे रामराज्याला साजेसे असे सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवणारे होते. शेतकरी, बारा बलुतेदार संपन्न होते, महिला-भगिनी सुरक्षित होत्या. द्वेषाला कुठलीही जागा नव्हती आणि या स्वराज्याची प्रेरणा आणि मार्गदर्शक केवळ अन् केवळ माँसाहेब जिजाऊ आणि सर्वसामान्य रयत होती. त्यामुळे आपली वक्तव्ये आपण त्वरित मागे घ्यावीत, ही विनंती !’’

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज म्हणाले होते, ‘‘तप करणे ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. मला एका राजाची आठवण होत आहे, ज्याच्यात हे सर्व गुण होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! ते स्वत: मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी श्रीशैलम् येथे गेले, तेव्हा त्यांनी तीन दिवसांचा उपवास केला. तीन दिवस शिवमंदिरात राहिले. महाराज त्या वेळी म्हणाले होते, ‘मला राज्य करायचे नाही. मला संन्यास घेऊन भगवान शिवाची सेवा करायची आहे.’ त्यांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांची समजूत घातली आणि ‘राज्य करणे ही त्यांची सेवाच आहे’, असे सांगितले.’’

संपादकीय भूमिका

  • संपूर्ण विश्‍वासाठी ऐतिहासिक ठरलेल्या अयोध्या येथील सोहळ्यात व्यासपिठावरून प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराजांसारखी महनीय व्यक्ती दायित्वानेच विधाने करणार, यात शंका नाही !
  • रोहित पवार यांनी बेताल बडबड करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी असे न म्हटल्याचे पुरावे सादर करावेत !