अयोध्येला गतवैभव प्राप्त करून देणारा सम्राट विक्रमादित्य !

सम्राट विक्रमादित्य

अयोध्यानगरीची ७ मोक्षनगरींमध्ये गणना केली जाते. तिचे आध्यात्मिक महत्त्व, तिला गतवैभव प्राप्त करून देण्यामध्ये सम्राट विक्रमादित्य यांनी केलेले दैवी कार्य या लेखाद्वारे येथे देत आहोत. जेणेकरून रामभक्त वाचकांची प्रभु श्रीरामाविषयीची श्रद्धा वाढेल.   

हिंदूंनो, रामजन्मभूमीचा शोध घेणार्‍या सम्राट विक्रमादित्याविषयी कृतज्ञता व्यक्त करूया !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

‘आयुष्यात एकदा तरी श्रीरामजन्मभूमीचे दर्शन घेऊन धन्य व्हावे’, अशी आस प्रत्येक हिंदूच्या मनात असते. सम्राट विक्रमादित्याने अत्यंत तळमळीने आणि देवावर अपार श्रद्धा ठेवून श्रीरामजन्मभूमी शोधून काढली अन् नंतर तेथे विधीवत् राममंदिर उभारले. त्यांनी घेतलेल्या कष्टांमुळेच आज आपण श्रीरामजन्मभूमीचे दर्शन घेऊ शकतो, तसेच श्रीरामाच्या मूळ मूर्तींचेही दर्शन आपल्याला श्री काळाराम मंदिरात होते. त्यामुळे सम्राट विक्रमादित्यांविषयी जेवढी कृतज्ञता व्यक्त करू तेवढी थोडीच ! ‘सम्राट विक्रमादित्यामधील ही तळमळ आणि भाव आमच्यातही निर्माण होऊ दे’, अशी श्रीरामरायाच्या चरणी प्रार्थना !’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ 

१. भारतभरातील ७ मोक्षनगरींमध्ये अग्रस्थानी असलेली अयोध्या !

१ अ. भगवान श्रीविष्णूच्या देहाचे केलेले ऋषींनी वर्णन

यावरून लक्षात येते की, या सप्तपुरी, म्हणजे साक्षात् भगवान श्रीविष्णूचा देह आहे. आपल्या भारतभूमीत साक्षात् भगवंताचा वास आहे. भारतात जन्माला येणे किती भाग्याचे आहे, हे यातून लक्षात येते. या सातही मुख्य मोक्षनगरींमध्ये (जेथे निवास, जन्म आणि मृत्यू मिळाल्याने मोक्षाची अपेक्षा केली जाऊ शकते, अशा नगरींमध्ये) अयोध्यानगरी अग्रस्थानी आहे. जगप्रसिद्ध अशा सूर्यवंशाची उत्पत्ती येथेच झाली, तसेच मोठमोठे धर्मात्मा राजेही येथेच होऊन गेले.

१ आ. अयोध्येचा ३ वेळा उद्धार होणे : या अयोध्यानगरीचा ३ वेळा उद्धार झाला. प्रथम सूर्यवंशी राजा रुक्मानंद याने एकादशीच्या व्रतप्रभावाने अयोध्यानगरीच्या जीवमात्रांना वैकुंठाला नेले होते. काही काळाने याच वंशामध्ये राजा हरिश्चंद्राचा जन्म झाला. त्याने त्याच्या सत्यव्रताच्या प्रभावाने अयोध्येतील प्रजेला वैकुंठाला नेले. त्यानंतर याच श्रेष्ठ रघुवंशात त्रैलोक्याधिपती प्रभु श्रीरामचंद्र अवतरले. त्यांनीही निजधामास जातांना अयोध्यावासियांना शरयू नदीत स्नान करवून दिव्यदेही केले, तसेच सर्वांना स्वत:समवेत घेऊन वैकुंठाला जाण्याची सिद्धता केली. त्यासमयी ते श्री मारुतिरायाला जवळ बोलावून म्हणाले, ‘‘माझ्या पश्चात् अयोध्येचे राज्य तू सांभाळ आणि कल्पपर्यंत (शेवटपर्यंत) अचल राज्य कर.’’ ही आज्ञा देऊन प्रभूंनी मारुतीला अयोध्येच्या गादीवर बसवले. तेव्हापासून श्रीरामचंद्रांची आज्ञा शिरसावंद्य मानून मारुतिराया अजूनही तेथेच बसले आहेत. सांप्रत अयोध्येतील मुख्य देवता श्री हनुमानबली हे जागृत आहेत.

१ इ. प्रभु श्रीरामाचे पुत्र लव-कुश यांनी पुन्हा अयोध्यानगरीचे पुनरुत्थान करणे : श्रीराम निजधामास गेल्यावर पुष्कळ काळ अयोध्यानगरी उदास स्थितीत होती. अयोध्येवर दृष्टी फिरवल्यास जिकडे-ितकडे घनघोर अरण्ये, वानरसेना आणि शरयू नदी या ३ गोष्टी दिसत होत्या. याखेरीज चौथे मारुतीचे स्थान होते. इतर कोणत्याही वस्तू अवशिष्ट (शेष) राहिल्या नाहीत. कालांतराने प्रभु श्रीरामाचे पुत्र लव-कुश यांनी स्वर्गद्वार तीर्थावर श्रीनागेश्वरनाथ महादेवाची स्थापना केली आणि पुन्हा अयोध्यानगरी यथायोग्य बसवली. ही कथा त्रेता आणि द्वापर युगांतील आहे.

२. अयोध्येचा शोध लावून मंदिरांची स्थापना करणारा सम्राट विक्रमादित्य !

२ सहस्र वर्षांपूर्वी उज्जयिनीमध्ये सम्राट विक्रमादित्य राज्य करत होता. एकदा श्रीरामाच्या कृपेने त्याला काही विचार स्फुरले. तो विचार करू लागला, ‘माझा जन्म क्षत्रिय कुळात सूर्यवंशात झाला आहे आणि सूर्यवंशाची मातृभूमी तर अयोध्या आहे. ती प्रभु श्रीरामचंद्रांचीही जन्मभूमी आहे. त्या भूमीचा शोध लावला पाहिजे.’ असा विचार करून सम्राट विक्रमादित्य अयोध्येत आला आणि तेथे उपस्थित असलेल्या लोकांसमवेत श्रीरामजन्मभूमीचा शोध घेऊ लागला; परंतु ‘जन्मभूमी हीच आहे’, असा निश्चयात्मक दाखला त्याला कुठेही मिळाला नाही.

२ अ. सम्राट विक्रमादित्याला एक दैवी पुरुष भेटणे : सम्राट विक्रमादित्य पश्चात्तापयुक्त मनाने शरयू नदीच्या जवळील निर्मली कुंडाच्या ठिकाणी विचार करत बसला. इतक्यात त्याला दिसले की, एक दिव्य पुरुष काळ्या रंगाचा पोशाख घालून आणि काळ्या घोड्यावर बसून तेथे आला. त्याने निर्मली कुंडात स्नान केले, तसेच त्याच्या घोड्यालाही तेथे स्नान घातले. केवळ स्नानमात्रे त्या दोघांची कांती कापरासारखी दिव्य झाली. एकाएकी त्या पुरुषाच्या शरिराचा रंग पालटला. हा चमत्कार पाहून सम्राट विक्रमादित्य फार चकित झाला. ‘हा कुणीतरी दैवी पुरुष आहे’, असा विचार करून राजाने त्याला नमस्कार केला.

२ आ. सदर दैवी पुरुष तीर्थराज प्रयाग असणे आणि त्याने श्रीरामजन्मभूमी शोधण्यासाठी सम्राट विक्रमादित्याला आशीर्वाद देणे : आपला परिचय देऊन राजाने त्याला श्रीरामचंद्रांची जन्मभूमी दाखवण्याची विनंती केली आणि हात जोडून समोर उभा राहिला. राजाची भक्ती पाहून तो पुरुष म्हणाला, ‘‘राजा, तू धन्य आहेस आणि तुझा प्रश्नही उत्तम आहे; परंतु मला येथे कालापव्यय करता येत नाही. त्यामुळे हे राजन, तुझ्या प्रश्नाचे उत्तर काशीक्षेत्री सम्राट विश्वनाथाच्या दरबारात मिळेल.’’ तो स्वत:चा परिचय देत म्हणाला, ‘‘मी तीर्थराज प्रयाग आहे. जनतेच्या पापरूपी काळीमेला नित्य या निर्मली कुंडात धुतो. मग फिरून जगाची पातके ग्रहण करण्यासाठी माझ्या स्थानी जातो. त्यामुळे मला लवकर निघाले पाहिजे.’’ या वेळी त्याने ‘श्रीराम तुझे मनोरथ पूर्ण करोत’, असा राजाला आशीर्वाद दिला आणि तीर्थराज तेथेच अदृश्य झाले.

३. श्रीरामजन्मभूमीचा शोध लागण्यासाठी सम्राट विक्रमादित्याने केलेले तप !

३ अ. राजाचा निग्रह पाहून काशीविश्वेश्वर प्रसन्न होणे : सम्राट विक्रमादित्याने श्रीरामाचे स्मरण केले आणि श्रीकाशीक्षेत्री प्रयाण केले. तेथे त्याने भगवान विश्वेश्वराचे दर्शन घेतले आणि प्रभु श्रीरामाची जन्मभूमी समजण्यासाठी प्रार्थना केली. प्रार्थना करून सम्राट अन्न-जल विरहित, तसेच निश्चयपूर्वक शिवनामाचा जप करत तेथेच शिवद्वारी धरणे धरून बसला. राजाचा हा निग्रह पाहून परम करुणामयी भगवान श्री शंकराने एका वृद्ध व्यक्तीचे रूप धारण केले. एका हाती पुस्तक आणि दुसर्‍या हाती वृद्ध गाय घेऊन ब्राह्मणाच्या रूपात शिवराज त्याच्या समोर येऊन उभे राहिले.

३ आ. विश्वेश्वररूपी वृद्ध व्यक्तीने श्रीरामजन्मस्थान शोधण्याचा मार्ग दाखवणे : ते राजाला म्हणाले, ‘‘ही अन्नपूर्णानगरी आहे. येथे निरव (निराहारी) रहाण्याचा प्रयत्न करू नको. माझ्या वचनावर विश्वास असेल, तर तुझे सर्व मनोरथ पूर्ण होईल. ही कामधेनु आणि ही पोथी घेऊन तू अयोध्येला जा. तेथे शरयू नदीच्या तिरावर या गायीला चरण्यास सोड. जेथे तिच्या आचळातून दुधाची धारा वाहू लागेल, ‘तिथेच मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्रांचा जन्म झाला आहे’, असे निश्चित समज. या पोथीच्या आधाराने अयोध्यानगरीची पुनर्रचना कर. श्री विश्वेश्वर तुझ्यावर प्रसन्न असून तुझा मनोरथ पूर्ण होईल.’’ हे सांगितल्यावर वृद्ध ब्राह्मणरूपी विश्वेश्वर तेथेच अंतर्धान झाले. त्यानंतर राजाने ती पोथी आणि गाय यांच्या समवेत श्री विश्वेश्वराला नमन करून अयोध्येला प्रयाण केले.

४. सम्राट विक्रमादित्याला रामजन्मभूमीचा शोध लागल्यावर त्या जागेची विधीवत् पूजा करणे !

श्रीरामचंद्रांचे ध्यान करत सम्राट मोठ्या आनंदाने शरयूच्या तिरावर येऊन पोचला. तेथे त्याने यथाविधी शरयूमातेचे पूजन केले. त्यानंतर नदीला साष्टांग नमस्कार करून प्रभु श्रीरामाची जन्मभूमी दाखवण्याची गायीला प्रार्थना केली. त्यानंतर ती कामधेनु स्वच्छंदपणे शरयूतिरी हिंडू लागली. राजाही तिच्या मागोमाग फिरत होता. कालांतराने एका ठिकाणी तिच्या आचळातून दुधाच्या धारा वाहू लागल्या. हे पाहून राजाला अतिशय आनंद झाला. ‘आज मी धन्य झालो, कृतकृत्य झालो’, असे म्हणून त्याने त्या भूमीचे आणि कामधेनूचे विधीवत् पूजन केले. मग वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणांना बोलावून त्यांचेही पूजन करून त्यांना संतुष्ट केले. पूर्वी घडलेला सर्व वृत्तांत सांगून त्याने ती पोथी ब्राह्मणांच्या पुढे ठेवली. त्यांना हात जोडून प्रार्थना केली, ‘हे भूदेवांनो, मला या अयोध्यानगरीची पुनर्रचना करण्याची माझी इच्छा आहे, ती पूर्ण करावी.’ यानंतर त्या ब्राह्मणांनी या पोथीच्या आधारे अयोध्येची सीमा आणि सर्व तीर्थस्थाने यांचा शोध लावला. इतर स्थाने आणि जेथे जाताच प्रभूच्या चरित्राची माहिती समजते, अशी मंदिरे अन् मूर्ती स्थापित केल्या.

५. सम्राट विक्रमादित्याने रामजन्मभूमीच्या स्थानी बांधलेली विविध मंदिरे !

सम्राट विक्रमादित्याने सर्वप्रथम ५ मंदिरे उभारून तेथे प्रभु श्रीरामांच्या मूर्तींची स्थापना केली, तसेच पूजा, नैवेद्य यांची व्यवस्था केली.

माता कैकयीने सीतेला सुनमुख पहातांना भेट दिलेला कनक महाल ! राजा विक्रमादित्याने याचीही पुनर्उभारणी केली !
प्रभु श्रीरामचंद्रांचा राज्याभिषेक झाला, ते हे पावन स्थान ! आता ते ‘राजगद्दी’ म्हणून प्रचलित आहे

अ. पहिले मंदिर : हे जन्मस्थळी, म्हणजे ज्या ठिकाणी कामधेनूच्या आचळातून दुधाच्या धारा वाहू लागल्या, तेथे बांधण्यात आले. तेथे एका मोठ्या शाळीग्राम शिळेवर राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न आणि रामाच्या चरणाशी मारुति अशा पाचही मूर्ती कोरल्या. तसेच श्री रामयंत्रासहित मूर्तीची स्थापना केली.

आ. दुसरे मंदिर : येथे रत्नसिंहासन आहे. येथेच श्रीरामचंद्रांचा राज्याभिषेक झाला होता. तेथे पट्टाभिषेक श्रीराम-सीतेची मूर्ती स्थापन केली.

इ. तिसरे कनक भवन : तेथे श्रीराम-जानकीचे विहारस्थान होते. तेथेही श्रीराम-जानकीच्या मूर्ती स्थापित केल्या.

ई. चौथे मंदिर : हे सहस्रधारातीर्थावर आहे. येथे लक्ष्मण बालाजीची चतुर्भूज मूर्ती स्थापन केली.

उ. पाचवे मंदिर : हे आदिशक्तीच्या स्थानावर बांधले आहे. तेथेही एकाच भव्य शिलेमध्ये श्रीमहाकाली, श्रीमहालक्ष्मी आणि श्रीमहासरस्वती या आदिशक्ती त्रिमूर्ती यंत्रासहित स्थापित केल्या. सध्या ‘देवकाली’ या नावाने हे स्थान प्रसिद्ध आहे.’

(संदर्भ : श्री अयोध्या महात्म्य, लेखक : यशवंतराव देशपांडे)