Karnataka Muslim Vendors : विजयपूर (कर्नाटक) येथील सिद्धेश्‍वर मंदिराच्या जत्रेत मुसलमानांची दुकाने नकोच ! – हिंदु संघटनांची मागणी

  • अनुमती दिल्यास आंदोलन करण्याची चेतावणी

  • मुसलमान भारतीय कायदे आणि हिंदु संस्कृती यांचा मान राखत नसल्याने विरोध !

विजयपूर (कर्नाटक) – येथील हिंदु संघटनांनी कोप्पल सिद्धेश्‍वर मंदिराच्या जत्रेमध्ये मुसलमान दुकानकारांना दुकाने थाटण्याची अनुमती न देण्याची मागणी केली. ‘मुसलमानांना जर दुकाने थाटण्याची अनुमती दिली, तर आम्ही आंदोलन करू’, अशी चेतावणी या संघटनांनी दिली आहे. कोप्पल सिद्धेश्‍वर मंदिराची जत्रा गेल्या १०० वर्षांहून अधिक वर्षांपासून चालू आहे. प्रत्येक वर्षी मकरसंक्रांतीला येथे जत्रा आयोजित केली जाते. या जत्रेमध्ये सहस्रो भाविक सहभागी होतात. सध्या जत्रेचे नियोजन करण्यात येत आहे.

१. श्रीराम सेना आणि अन्य हिंदु संघटन यांचे म्हणणे आहे की, हिदूंच्या उत्सवात मुसलमानांना सहभागी होण्याची अनुमती दिली जाऊ नये.

२. या संघटनांचे कार्यकर्ते त्यांच्या मागणीसाठी येथील सिद्धेश्‍वर मंदिराबाहेर संघटित झाले होते. या वेळी कार्यकर्त्यांनी सांगितले की, मुसलमान दुकानदार भारतीय कायदे आणि हिंदु संस्कृती यांचा मान राखत नाहीत. मुसलमान सातत्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहेत. गोहत्या, गोमांसाची विक्री, लव्ह जिहाद, हिंदु महिलांशी गैरवर्तणूक आदी प्रकरणे वाढत आहेत. यामुळेच मुसलमान दुकानदारांना हिंदूंच्या उत्सवांत दुकाने थाटण्याची अनुमती देऊ नये. हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांना याविषयी निवेदन देण्यात आले.

३. कर्नाटक मठ-मंदिर महासंघाने म्हटले आहे की, हिंदूंच्या धार्मिक जत्रांच्या ठिकाणी अन्य धर्मियांना व्यापार करण्यास बंदी घातली पाहिजे. या संदर्भात कर्नाटक सरकारकडे यापूर्वीच मागणी करण्यात आली आहे. महासंघाचे अध्यक्ष महेश दास यांनी सांगितले की, कर्नाटक हिंदु धार्मिक संस्थान आणि धर्मार्थ बंदोबस्ती कायद्याच्या कलम ३१ (१२) नुसार मंदिराजवळील भूमी, भवन किंवा अन्य कोणतीही संपत्ती अहिंदूंना भाड्याने देण्यात येऊ नये.

४. याच वर्षी कर्नाटक पोलिसांनी विश्‍व हिंदु परिषदेचे दक्षिण कन्नड जिल्ह्याचे सचिव शरण पंपवेल यांच्यावर त्यांनी मंदिरांच्या उत्सवात दुकाने थाटणार्‍या मुसलमानांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल्यावरून गुन्हा नोंदवला होता.

५. दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्हा धार्मिक जत्रेतील व्यपार्‍यांच्या समन्वय समितीने म्हटले होते की, अनेक हिंदु मंदिरांच्या धार्मिक उत्सवांच्या वेळी मुसलमानांनी दुकानांसाठी जागा मिळण्याची मागणी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका, सण आणि भाविक यांच्यावर मुसलमानांकडून विनाकारण आक्रमणे केली जातात, तसेच शरीयत कायद्यानुसार जो कुणी शरीयतचे पालन करत नाही, तो काफीर मानला जातो.