पुण्यातील नारायणगाव येथे ८ बांगलादेशी नागरिकांना पकडले !

आतंकवादविरोधी पथकाची कारवाई !

पुणे – नारायणगाव परिसरात अवैध वास्तव्य करणार्‍या ८ बांगलादेशी नागरिकांना राज्य आतंकवादविरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) १४ डिसेंबर या दिवशी पकडले. अवैध वास्तव्य केल्याप्रकरणी ८ बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांची ए.टी.एस्.कडून चौकशी करण्यात येत आहे. प्राथमिक चौकशीत बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात घुसखोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. (बांगलादेशी नागरिकांना आधारकार्ड, शिधापत्रिका आदी कागदपत्रे आपल्याकडीलच भ्रष्ट व्यवस्था उपलब्ध करून देते, हे सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आहे, तसेच घुसखोर खोटी कागदपत्रे बनवून घेतात, याचा पोलीस किंवा प्रशासन यांना थांगपत्ताही लागत नाही, हे संतापजनक आह ! – संपादक) बांगलादेशी नागरिक नारायणगाव परिसरात मजुरी करत असल्याची माहिती अन्वेषणात मिळाली आहे.

मेहबुल शेख, राणा मंडल, गफूर शेख, आलमगीर मंडल, शालोम मंडल, अफजल खान, कबीर मुल्ला, जमातअली मंडल या ८ बांगलादेशी नागरिकांविरुद्ध अवैध वास्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांची ए.टी.एस्.कडून चौकशी करण्यात येत आहे.

बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या आणि आतंकवाद्यांच्या कारवाया यांमुळे सामान्य नागरिकांसाठी असुरक्षित बनलेले पुणे ! 

आठवड्यापूर्वी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) आणि ए.टी.एस्.ने पुणे, ठाणे परिसरात कारवाई करून इसिसच्या आतंकवादी विचारधारेचा प्रसार करणार्‍या १५ जणांना कह्यात घेतले होते. या प्रकरणात कोंढव्यातील दोघांची चौकशी करण्यात आली होती. ३ मासांपूर्वी पुणे पोलिसांनी बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत कारवाई करून बांगलादेशी महिलांसह त्यांच्या साथीदारांना कह्यात घेतले होते. अवैध वास्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

बांगलादेशींची भारतात लक्षावधी संख्या होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? भारतातील गुन्हेगारांत बांगलादेशी घुसखोरांची संख्या लाखोंच्या घरात असेल !  सरकारने त्यांना लवकरात लवकर शोधून देशाबाहेर काढले पाहिजे !